मुंबई : मुंबईत गणेशोत्सवादरम्यान अनेक गणेशभक्त दर्शनासाठी येत असल्याने रात्री उशिरापर्यंत त्यांच्यासाठी लोकल आणि मेट्रो सुरु ठेवण्यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे मुंबई उपनगर सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. सोमवार, ४ ऑगस्ट रोजी महापालिकेच्या ग्रांट रोड येथील डी विभाग कार्यालयात आयोजित जनता दरबारात ते बोलत होते.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त मुंबई परिसरात दाखल होतात. अशावेळी भक्तांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक सुरु असणे अतिशय महत्वाचे आहे. त्यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाशी पत्र व्यवहार सुरु आहे," असे त्यांनी सांगितले.
महिनाभरात २ दोन हजार नागरिकांनी तक्रारी मांडल्या
"गेल्या महिनाभरात दक्षिण मुंबईत झालेल्या पाच जनता दरबारात ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळून सुमारे २ दोन हजार नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. नागरिकांच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी म्हाडा, एस. आर. ए. महापालिका आणि रेल्वेसह बारा विभागांचे अधिकारी एकाच छताखाली आणण्यात आले. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे न मारता जागच्या जागी त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे शक्य झाले," असेही त्यांनी सांगितले.
यावेळी अनेक नागरिकांनी म्हाडा संबंधित पुनर्विकास, दुरुस्ती आणि संक्रमण शिबीरा संदर्भात तक्रारी मांडल्या होत्या. अनेकदा नागरिकांना संक्रमण शिबिराची सोय न करता इमारती रिकाम्या करण्यासाठी सी टूच्या नोटीस देण्यात आल्या होत्या. यासंदर्भात म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जायसवाल यांच्यासोबत लवकरच बैठक घेणार असून संक्रमण शिबीर झाल्याशिवाय रहिवाश्याना घर रिकामे करण्याची नोटीस देऊ नये, अशी सूचना देणार असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. तसेच संक्रमण शिबीर तयार नसल्यास त्वरित इमारतीची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, असेही त्यांनी सांगितले.