लडाखमधील रस्ते विकासाचे बहुआयामी फायदे

03 Aug 2025 12:30:09

लेह-लडाख हा देशाच्या सामरिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रदेश. या प्रदेशाची सुंदरता नेत्रदीपक अशीच! मात्र, दीर्घकाळ या भागामध्ये पायाभूत सुविधांचा विकास न झाल्याने, सैन्य आणि आर्थिक समृद्धी या दोहोंच्या गतीवर मर्यादा येत होत्या. मात्र, मोदी सरकारच्या काळात यावर विशेष काम करत रस्ते बांधणीला महत्त्व दिल्याने आता सैन्याच्या हालचाली आणि पर्यटनातून येणारी समृद्धी या दोघांनीही वेग पकडला आहे. मोदी सरकारने लडाखमध्ये केलेल्या सुधारणांचा घेतलेला आढावा...

भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी कारगिल विजय दिनी, कारगिलच्या द्रासमध्ये दि. २६ जुलै रोजी ‘रुद्र’ नावाची नवीन ऑल-आर्म्स ब्रिगेड्स तैनात केल्याची घोषणा केली. ही ब्रिगेड लष्कराच्या आधुनिकीकरण आणि एकत्रित युद्धतंत्राच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ‘रुद्र ब्रिगेड’मध्ये इन्फन्ट्री, आर्टिलरी, एअर डिफेन्स, ड्रोन युनिट्स यांचा समावेश असून, विविध प्रकारच्या लढाऊ क्षमतांना एकत्र आणण्यात आले आहे. ही ब्रिगेड सीमावर्ती भागांतील धोके ओळखून, पाकिस्तान आणि चीनच्या कारवायांना रोखण्यास सक्षम आहे.

प्रत्येक इन्फन्ट्री बटालियनमध्ये स्वतंत्र ड्रोन प्लाटून असतील, जे अत्याधुनिक पद्धतीने गुप्त माहिती मिळवण्याच्या कामी साहाय्यक ठरणार आहेत. आर्टिलरी युनिट्समध्येही ‘दिव्यास्त्र बॅटरी’ आणि ‘लोइटर म्युनिशन बॅटरी’च्या माध्यमातून लक्ष्यभेदक क्षमतांमध्ये मोठी वाढ झाली आहे. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींनी सुसज्ज असलेली ‘एअर डिफेन्स युनिट्स’, शत्रूच्या हवाई हल्ल्यांना त्वरित प्रत्युत्तर देऊ शकतात. जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले की, "भारतीय लष्कर भविष्यातील युद्धासाठी सज्ज आणि लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी एकत्रित ब्रिगेड्स तयार करत आहे. तसेच, विशेष बलांचे बलही वाढवत आहे.

कारगिल आणि लडाखमधील बदलती परिस्थिती

कारगिल आणि लडाख हा भारतासाठी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा प्रदेश. हा प्रदेश पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या सीमेला लागून आहे. जगातील सर्वांत उंच युद्धभूमी असलेले सियाचीन ग्लेशियरदेखील याच भागात असून, त्यामुळे याचे महत्त्व आणखीच वाढते.

पूर्वीच्या अडचणी

या भागातील दुर्गम भूभाग आणि चीनकडून असलेल्या धोयामुळे, येथील रस्तेबांधणी हे नेहमीच एक आव्हान राहिले आहे. भारतीय सैन्याला देखील येथे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. चीनने आपल्या सीमेपर्यंत उत्तम रस्ते बांधले होते, तर कारगिल आणि लेह-लडाखमध्ये आपले रस्ते खूपच कमी होते. याचा थेट परिणाम आपल्या सैन्याच्या युद्ध क्षमतेवर होत असे. अपुर्‍या रस्त्यांमुळे सैन्याला लवकर पोहोचणे आणि सामग्रीची वाहतूक करणे, कठीण जात असे तसेच, त्यांची लढण्याची क्षमतेवरही त्याचा विपरीत परिणाम होत असे.

आताची परिस्थिती

परंतु, आता परिस्थितीत मोठे बदल झाले आहेत. भारत सरकारने या भागाचे सामरिक महत्त्व ओळखून, कारगिल आणि लडाखमध्ये रस्तेबांधणीला प्राधान्य दिल्याने वेग वाढला आहे. युद्धपातळीवर नवीन रस्ते बांधले जात असून, यामुळे भारतीय सैन्याची या भागात पोहोचण्याची आणि वेगवान हालचाल करण्याच्या क्षमतेत वाढ झाली आहे. हे बदल केवळ सैन्यासाठीच नाही, तर या भागाच्या विकासासाठी आणि स्थानिक लोकांसाठीही महत्त्वाचे ठरतील. या बदलांमुळे भारताची सीमा सुरक्षा अधिक सशक्त होईल आणि कोणत्याही परिस्थितीत सैन्याला त्वरित प्रतिसाद देणेही शय होईल.
लडाख, एक दुर्गम आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा केंद्रशासित प्रदेश असून, गेल्या काही वर्षांपासून पायाभूत सुविधा विकासच्या अभूतपूर्व टप्प्यातून जात आहे. विशेषतः रस्ते कनेटिव्हिटीमध्ये झालेल्या लक्षणीय सुधारणांमुळे, या प्रदेशाची दुर्गमता कमी झाली आहे.

लडाखमधील रस्ते विकास

लडाखमधील रस्ते विकासाचा इतिहास केवळ नागरी विकासापुरता मर्यादित नसून, तो भारताच्या भूराजकीय आणि सामरिक गरजांशी घट्ट जोडलेला आहे. विशेषतः चीनच्या सीमावर्ती पायाभूत सुविधांच्या विकासाला प्रत्युत्तर म्हणून, या प्रदेशातील रस्ते बांधणीला गती मिळाली आहे.

राष्ट्रीय महामार्ग

राष्ट्रीय महामार्ग ३ (NH 3) : हा ५५६ किमी लांबीचा महामार्ग पंजाबमधील अटारीपासून सुरू होऊन, लडाखमधील लेह येथे संपतो. यामहामार्गाचा सुमारे १७० किमी लांबीचा भाग लडाखमधून जातो. हा महामार्ग रोहतांग ट्रॅव्हर्स, नकी ला, लाचुलुंग ला, बरलाचा ला आणि तागलांग ला यांसारख्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या पर्वतीय खिंडीतून जातो. हा महामार्ग सीमावर्ती भागांशी जोडला गेला असून, यामुळे भारतीय सैन्याला या भागात सहज प्रवेश मिळवण्यास मदत होते. तसेच, विविध भागांच्या विकासालाही या महामार्गामुळे चालना मिळते.

राष्ट्रीय महामार्ग १ (NH 1) : सुमारे ५३४ किमी लांबीचा हा महामार्ग श्रीनगरला लेहसोबत जोडतो. हा महामार्ग हिमालयातील दुर्गम भागातून आणि भारत-पाकिस्तान नियंत्रणरेषेच्या जवळून जातो, त्यामुळे त्याचे सामरिक महत्त्व अनमोल आहे. बारामुल्ला, सोनमर्ग, झोजीला, द्रास, कारगिल आणि लेह ही प्रमुख शहरे या महामार्गावर आहेत. हे राष्ट्रीय महामार्ग केवळ वाहतुकीचे मार्ग नाहीत, तर ते आर्थिक, सामाजिक आणि सामरिक एकीकरणाची साधने आहेत. या महामार्गांची दुहेरी भूमिका (नागरी आणि लष्करी) लडाखमधील रस्ते विकासाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ (BRO) चे योगदान : ‘बीआरओ’ने लडाखमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांनी १९ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या उमलिंग-ला खिंडीवर, जगातील सर्वांत उंच गाड्यांच्या वाहतुकीसाठी योग्य रस्ता बांधून जागतिक विक्रमाची नोंद केली.

भारत-चीन सीमेवर १ हजार, २५० किमीपेक्षा जास्त रस्त्यांचे बांधकाम ‘बीआरओ’ने केले आहे. फेज-१मधील १२ पैकी ११ रस्ते पूर्ण झाले असून, फेज-२ मधील चारपैकी एक रस्ता पूर्ण झाला आहे. ‘हिमांक’ आणि ‘विजयक’ प्रकल्पांतर्गत लडाखमध्ये १६ महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. यांची किंमत सुमारे ९४७.४३ कोटी आहे. यामध्ये आठ रस्ते, सहा पूल यांचा समावेश होतो. ‘बीआरओ’ला कठीण भूभाग, मर्यादित कामाचा हंगाम, बांधकाम साहित्याची मर्यादित उपलब्धता आणि मनुष्यबळाची कमतरता यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. अशा अनेअक आव्हानांना तोंड देत केलेली ही प्रगती, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना देते.

प्रमुख बोगदे आणि कनेटिव्हिटी प्रकल्प

अटल बोगदा : ऑटोबर २०२० साली रोहतांग खिंडीमध्ये अटल बोगदा सुरू झाल्यामुळे, हिवाळ्यातही लडाखचा संपर्क कायम राहिला आहे. यामुळे आता वर्षभर पर्यटकांना लडाखला भेट देणे शय झाले.
झोजिला बोगदा : १४.१५ किमी लांबीचा हा बोगदा श्रीनगर आणि लेह (लडाख पठार) दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग १ वरील द्रास आणि कारगिल मार्गे सर्व-हवामान कनेटिव्हिटी प्रदान करेल. हा आशियातील सर्वांत लांब द्वि-दिशात्मक बोगदा असेल. यामुळे प्रवासाचा कालावधी तीन तासावरून केवळ १५ मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. लडाख हा प्रदेश पाकिस्तान आणि चीनच्या सीमेलगत आहे. वर्षातून सुमारे सहा महिने येथील जीवनमान हवाई पुरवठ्यावरच अवलंबून असते.

शिंकुला बोगदा : १५ हजार, ८०० फूट उंचीवर असलेला हा जगातील सर्वांत उंच बोगदा असेल. ४.१ किमी लांबीचा हा ट्विन-ट्यूब बोगदा, ऑगस्ट २०२८ सालापर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. या बोगद्यामुळे मनाली-लेह अंतर ६० किमीने कमी होणार असून, झंस्कर खोर्‍याला वर्षभर कनेटिव्हिटी मिळणार आहे. यामुळे लष्करी हालचाली आणि पर्यटन दोन्हीसाठी त्याचा फायदा होईल. बोगद्यांचे बांधकाम लडाखमधील कनेटिव्हिटीमध्ये एक मूलभूत बदल घडवून आणत आहे, यामुळे या प्रदेशाची दुर्गमताही कमी होत असून, वर्षभर येथून वाहतुक शक्य होणार आहे.

लडाखमधील विकासाचे बहुआयामी फायदे

लडाखमध्ये रस्ते बांधणीमुळे, भारतीय लष्कराची युद्धक्षमता लक्षणीयरित्या वाढली आहे. तसेच यामुळे स्थानिक रहिवाशांचीही दळणवळणाची सोय झाली आहे. या भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला आहे. या गुंतवणुकीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी लडाखमधील नैसर्गिक सौंदर्याचा उपयोग करून, पर्यटनाला चालना देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे.

पर्यटन वाढीमुळे अर्थव्यवस्थेला चालना

पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने, लडाखमधील अनेक दुर्गम जागा पर्यटकांसाठी खुल्या केल्या. यामुळे या भागातील पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढले असून, सरकारने बांधलेल्या रस्त्यांचा फायदा पर्यटकांसाठीही होत आहे. यामुळे लडाखची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. १९७४ साली केवळ ५२७ पर्यटक आकर्षित करणार्‍या लडाखमध्ये, आता वर्षाकाठी पाच लाखांहून अधिक पर्यटक येत आहेत.

सामरिक महत्त्व आणि संदेश

या आर्थिक आणि सामाजिक लाभांव्यतिरिक्त, या पर्यटन वाढीला एक महत्त्वाचा सामरिक पैलूदेखील आहे. सीमेवर तैनात असलेल्या चिनी सैनिकांना हे स्पष्टपणे दिसत आहे की, त्यांच्या बाजूला सीमेवर पर्यटनासाठी कोणीही नागरिक येत नाही, तर भारतीय नागरिक मात्र गलवान, चुशुल आणि सीमेवरील या भागांमध्येही पर्यटनाचा आनंद घेत आहेत. यामुळे चिनी सैनिकांना एक स्पष्ट संदेश मिळतो की, भारतीय नागरिकांना त्यांच्या देशाच्या सीमेपर्यंत मुक्तपणे फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. हे भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि नागरिकांच्या स्वातंत्र्याचे एक प्रतीक आहे.

Powered By Sangraha 9.0