मोदीपर्वात मारुतीची निर्मिती, तर लालूंच्या जंगलराजमध्ये मारुतीची लूट! - मतचोरीचे आरोप करणार्यांकडूनच विवाहासाठी चोरीचा ऐवज

29 Aug 2025 17:26:04

मुंबई, शाश्वत ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये प्रगती करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच गुजरातमधील हंसलपूर येथे अनेक हरित उपक्रमांचे उद्घाटन केले. यामध्ये मारुती सुझुकी कंपनीच्या इ व्हिटारा या गाडीच्या प्लांटचा समावेश आहे. येथे निर्माण होणारी इलेक्ट्रिक वाहने १०० देशांत निर्यात होणार असल्याचेही मोदी यांनी यावेळी म्हटले. त्यामुळे मोदीपर्वात मारुती गाड्यांच्या निर्मितीला वेग आला आहे, तर लालूंच्या जंगलराजमध्ये याच मारुती गाड्यांची पाटण्यामध्ये लूट करण्यात आली होती.

२००२ मध्ये राजदचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मिसा भारती यांचा पाटणा येथे भव्य विवाह सोहळा संपन्न झाला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी प्रमुख पाहुण्यांना आणण्यासाठी पाटणा शहरातील अनेक दुकानांवर छापे टाकून नव्या कोऱ्या ४५ गाड्या पळवल्या होत्या. या कृत्याला ज्यांनी विरोध केला, त्यांना मारहाण करण्यात आली होती, तसेच त्यांच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही लालूंच्या कार्यकर्त्यांनी केले. याव्यतिरिक्त, डझनभर दुकानांमधून १०० सोफा सेट आणि इतर फर्निचर वस्तू, रेमंडच्या विशेष शोरूममधून सात लाख रुपये किमतीचे डिझायनर सूट आणि कपडे, सुमारे ५० किलो सुकामेवा आणि हजारो रुपयांच्या इतर किराणा आणि मिठाईच्या वस्तू संबंधित व्यवसाय मालकांकडून जबरदस्तीने काढून घेण्यात आल्या होत्या.

त्यामुळे आज बिहारमध्ये मतचोरीच्या नावाखाली अपप्रचार करणार्यांकडूनच कन्येच्या विवाहासाठी असा चोरीचा ऐवज कसा जमविला होता, ते अद्याप बिहारची जनता विसरलेली नाही.


Powered By Sangraha 9.0