कुठल्याही व्यक्ती किंवा संघटनेकडून देश सुधारण्याची अपेक्षा नको, सर्वांना मिळून काम करावे लागेल - डॉ. मोहनजी भागवत
27-Aug-2025
Total Views |
मुंबई (प्रतिनिधी) : देश सुधारण्याची किंवा वाचवण्याची जबाबदारी फक्त एका नेत्याची किंवा संघटनेची नाही. कोणीतरी येऊन सर्व काही ठीक करेल हा विचार आता सोडून द्यावा लागेल. दरवेळी राम आणि शिवाजी येऊन देश वाचवतील असे नाही, आपल्याला स्वतःला राम किंवा शिवाजी व्हावे लागेल. असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित "१०० वर्ष की संघ-यात्रा, नए क्षितिज" या विषयावर बोलताना व्यक्त केले.
मोहनजी म्हणाले की, आपल्या देशाची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर आपणच पुढे यावे. ईश्वर पण त्याचीच मदत करतो, जो स्वतः काहीतरी करतो. नेता, पार्टी, सरकार यांनीच सर्व करावे आणि आपण मात्र त्यांच्या चुका काढत बसावे, ही मानसिकता बदलावी लागेल. देशाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
ते पुढे म्हणाले की, जसे आपण आहोत तसेच आपले प्रतिनिधी असणार आहेत, तसेच देशातले पक्ष असणार आहेत आणि तसेच आपले नेते असणार आहेत, त्यामुळे आधी आपल्याला बदलावे लागेल आणि आपल्यालाच देशासाठी करावे लागेल. यासाठी संपूर्ण समाजाचे संघटन आवश्यक आहे.