मुंबई, प्रख्यात लेखिका नीला बर्वे यांचा ' कोवळं ऊन' हा कथासंग्रह नुकतंच प्रकाशित झाला. ज्ञानवृद्ध श्री एन. एन. श्रीखंडे यांच्याहस्ते हा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला तर या समारंभाचे अध्यक्षपद राजीव श्रीखंडे यांनी भूषवले. सदर कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर, लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे, "कुटुंब रंगलय काव्यात" फेम प्रा. विसुभाऊ बापट, कवयित्री सोनाली जगताप, लेखिका अलका भुजबळ, संपादक देवेंद्र भुजबळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
लेखिका अलका भुजबळ यांनी प्रास्ताविक करताना नीलाताईंच्या लिखाणाची प्रेक्षकांना ओळख करुन दिली. एन. एन. श्रीखंडे यांनी कथेचे रसग्रहण सादर केले. तसेच या १६ कथांवर १६ चित्रपट होऊ शकतील असे मत सुकृत खांडेकर यांनी व्यक्त केले. मुकुंद चितळे यांनी यावेळी पुस्तकासाठी लेखिका नीला बर्वे यांना शुभेच्छा दिल्या. कवयित्री सोनाली जगताप यांनी यावेळी नीला बर्वे यांच्या साहित्यातील वेगळेपणावर प्रकाश टाकला. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये राजीव श्रीखंडे यांनी या कथांमधील दुर्दम्य आशावाद, सहज सोपी ओघवती भाषाशैली आणि उठावदार व्यक्तिरेखा यांचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमात सोनाली जगताप यांनी नीला बर्वे यांना शुभंकरोती परिवारातर्फे साहित्यरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी लेखिका नीला बर्वे यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्याला ज्यांचे हात लागले, त्या सगळ्यांचे आभार मानले.