कोणत्याही कलाकृतीमधून मानवी जीवनाचा अविष्कार प्रतिबिंबित होतो. मानवी जीवनातील अनेक घटना, मूल्ये यांचे दर्शन घडते. मानवी जीवनातील पैलूंवर भाष्य करणारे चित्रपटच दीर्घकाळ लक्षात राहातात. असाच एक जगप्रसिद्ध जपानी चित्रपट म्हणजे ‘राशोमान’ ज्याच्या प्रदर्शनाला आज तब्बल ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या चित्रपटात दिग्दर्शक आकिरा कुरोसावा यांनी अक्षरश: सर्व कौशल्य पणाला लावले. त्यामुळेच इतक्या वर्षांनंतरही या चित्रपटाची जादू रसिकमनावर आहे. या चित्रपटाच्या सौंदर्याचा घेतलेला मागोवा...
दि. २४ ऑगस्ट १९५० या दिवशी जपानमधील चित्रपटगृहात ‘राशोमान’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. तेव्हा कुणाला वाटलेही नसेल की, हे प्रकरण जगभरातील चित्रपट विश्वात खळबळ माजवेल. पण, १९५१ साली इटलीच्या ‘व्हेनिस’ महोत्सवात या चित्रपटाने थेट ‘गोल्डन लायन’ पुरस्कारावरच नाव कोरले आणि तमाम चित्रपटप्रेमींची पाऊले हा चित्रपट पाहण्याकडे वळली. १९५२ साली तर सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचा ‘ऑनररी’ पुरस्कार देऊन ‘ऑस्कर’ने याला मानाचा मुजरा केला. चित्रपट पाहून परीक्षक तर चक्रावून गेलेच, पण एका पौवार्त्य देशात चित्रपट निर्मितीच्या पारंपरिक पद्धतीला छेद देणारा चित्रपट तयार व्हावा आणि तो अफलातून निघावा, याचेच अनेकांना कौतुक वाटले. आकिरा कुरोसावा हे नाव सिनेप्रेमींच्या आणि अभ्यासकांच्या ओठावर मग कायमच विराजमान झाले. गेली ७५ वर्षे हा चित्रपट चर्चेत आहे. फिल्म स्कूल्समध्ये हा चित्रपट जगभर शिकवला जातो आहे, त्यावर परिसंवाद घडत आहेत. एखादा चित्रपट कालातीत आणि वैश्विक असतो म्हणजे काय, याचे हे एक उत्तम उदाहरण.
‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ म्हणजेच ‘एफटीआयआय’, हे आम्हा प्रसारमाध्यम शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी एक तीर्थस्थळच होतं. तिथल्याच छोट्या थिएटरमध्ये मी पहिल्यांदा ‘राशोमान’ हा चित्रपट पाहिला. सिनेमा हा विषय शिकणारे विद्यार्थी आणि सतीश बहाद्दूर यांसारखे चित्रपट विषय शिकवणारे जाणकार अभ्यासक, यांच्या समवेत हा सिनेमा पाहणे म्हणजे एक पर्वणीच. चित्रपटानंतर त्यावर झालेली चर्चा हा तर एक मास्टर लासच! सिनेमा असाही असतो, ही वेगळी दृष्टी देणारी कलाकृती म्हणून आजही ती माझ्या भावविश्वात अढळ स्थान राखून आहे.
अतिशय नैसर्गिक शैलीचा दिग्दर्शक म्हणून, आकिरा कुरोसावा हा जपानच्या सिनेसृष्टीतील तळपता तारा होता. सत्यजित रायसारखा दिग्दर्शकही या चित्रपटाच्या प्रेमात पडला होता. ओळीने सलग तीन दिवस त्यांनी ‘राशोमान’ पाहिला आणि त्या प्रभावाने ते भारावून गेले. दिग्दर्शकाची सिनेमाच्या प्रत्येक अंगावर पकड असते म्हणजे काय, याचा त्यांना हा चित्रपट वस्तूपाठच वाटला होता. आपल्या ‘अवर फिल्म्स देअर फिल्म्स’ या पुस्तकात, आकिरा कुरोसावा या दिग्दर्शकाचे अतिशय हृद्य व्यक्तिमत्त्व राय यांनी साकारले आहे.
स्टीव्हन स्पिलबर्ग हा हॉलिवूडचा प्रख्यात दिग्दर्शक, आपल्यावर कुरोसावाचा प्रभाव असल्याचे जाहीररित्या मान्य करतो. या चित्रपटाविषयीच्या आठवणी लिहिताना कुरोसावाने सांगितलेला एक प्रसंग सांगावासा वाटतो. या चित्रपटाची पटकथा वाचल्यानंतर त्याचे तिन्ही साहाय्यक याच्याकडे आले आणि म्हणाले, "आम्हाला कथानक समजलेले नाही.” हा म्हणाला, "नीट वाचा म्हणजे समजेल.” तरीही न समजल्यामुळे, शेवटी त्यांना हे कथानक समजावून सांगितले. दोघांचे समाधान झाले. पण, तिसरा म्हणाला, "या कथेत चार साक्षीदार, त्यातील तिघे त्या घटनेचेच भाग आणि चौथा प्रत्यक्षदर्शी यांनी सांगूनही नेमके काय घडले, हे गुलदस्त्यातच राहते हे कसे काय?” कुरोसावाच्या या साहाय्यकाचा प्रश्नच या सिनेमाची कथा आहे आणि मध्यवर्ती कल्पनाही. दिग्दर्शकाने ती आगळ्यावेगळ्या शैलीत सांगितली आहे.
कथा संक्षिप्तात अशी, जंगलामध्ये एकाचा संशयास्पद मृत्यू होतो. सोबत असलेल्या त्याच्या पत्नीवर बलात्कार होतो. जंगलातीलच एका युद्धात उद्ध्वस्त झालेल्या स्तंभाच्या दरवाज्यापाशी बसून, एक लाकूडतोड्या आणि एक धर्मगुरू या घटनेविषयी बोलत असतात. तिथे पावसात आडोश्याला आलेला एक वाटसरूही कथा ऐकत असतो. मृत पावलेला, मृत झालेला (भूत बनून), मृत झालेल्याची बायको आणि एक प्रत्यक्षदर्शी (लाकूडतोड्या) असे प्रत्येकजण हा मृत्यू कसा झाला, तिथे काय काय घडले हे सांगत असतात.
विशेष म्हणजे यात कुणातही एकवायता नसते. तिघांचे म्हणणे हा खून आहे असे असते, तर मृत पावलेला आत्मा सांगतो की, त्याने आत्महत्या केली आहे. पण, प्रत्येकजण इतया सुसंगतपणे याबद्दल बोलत असतात की, प्रेक्षक म्हणून आपल्याला कुणीही खोटे बोलते आहे असे वाटत नाही. इथे आपल्याला सत्य हा प्रकार किती बुचकळ्यात टाकणारा आणि गुंतागुंतीचा असतो, याचे दर्शन घडते. कुरोसावा आपल्या पटकथेच्या माध्यमातून, छायाचित्रणाच्या नेमकेपणातून, संकलनाची कात्री अतिशय कलाकुसरीने ‘नेमके सत्य काय हे कधीच समजत नाही’ याचा सर्जनशील आविष्कार साकारतोे.
‘स्टोरी बोर्ड’ म्हणजे टिपायचे दृश्य कसे असावे, दिसावे याची केलेली ड्रॉईंगज्. कुरोसावा यात माहीर होता. हा चित्रीकरण स्थळ बघून आला की, स्टोरी बोर्ड करायचा, आपल्या टीमला दाखवायचा आणि बरहुकूम चित्रीकरण करायचा. याचा अतिशय चांगला परिणाम निर्मिती मूल्यांवर झालेला, आपण या चित्रपटात अनभवू शकतो. फ्लॅशबॅक हे तंत्र आपण सर्रास अनेक चित्रपटात पाहतो. जुन्या आठवणी, आधी काय घडले हे सांगण्यासाठी याचा वापर केला जातो. ‘राशोमान’ या चित्रपटात, मात्र फ्लॅशबॅक हाच संपूर्ण चित्रपटाचा आत्मा आहे.
काय घडले हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न ही दृश्ये करतात. पटकथेचा भाग म्हणून त्याचे महत्त्व आहेच; पण यांची हाताळणी करणे हा यातला सर्वांत अवघड असा भाग होता. कारण, ही दृश्ये टिपताना, त्यांची चित्रपटात बांधणी करताना, कथासूत्राशी प्रामाणिक राहणे ही तारेवरची कसरत होती. प्रेक्षकांनाही जे दाखवतो आहे ते खरे आहे हा प्रत्यय देण्यासाठी, त्या त्या दृश्यांची परिणामकारकता चहू अंगाने सांभाळणे हा यातला कळीचा मुद्दा होता. कुरोसावा यांनी ही दृश्यमालिका तर सुविहितपणे बांधलीच; पण परस्परविरोधी कथनाला ही एक परिपूर्ण कथानकाचा एकसंघ हिस्सा बनवले, ही त्याची मोठी कमाल म्हणावी लागेल.
संगीत हे एखाद्या दृश्याची परिणामकता वाढवण्यास मदत करते, हे आपल्या अनेक चित्रपटात पाहिले आहे. इथे मात्र दिग्दर्शकाने दृश्यामधील भरलेल्या जागा भरण्याची, दृश्यांचा अर्थ समजून सांगण्याची आणि दृश्य भाषेला वाचा फोडण्याची जबाबदारीही, या संगीताच्या गळ्यात टाकली आहे. संगीतानेही ती समर्थपणे पार पाडली आहे. या चित्रपटातील पाऊसही अक्राळ-विक्राळ भासतो. त्याचा वेग-आवेग, त्याच्या कोसळाणार्या धारांची आक्रमकता हा गोष्टीतील भयसूचकता-रहस्यमयता वाढवणारा आहे. कृष्णधवल रंग या संपूर्ण कथानकाला कमालीचा शोभून दिसतो. पावसात सुरू असलेल्या धर्मगुरू, लाकूडतोड्या यांच्या गप्पा कानात प्राण आणून, त्या ऐकणारा वाटसरू आणि मध्ये मध्ये दाखवली जाणारी फ्लॅशबॅक दृश्ये असे चित्रपटाचे स्वरूप आहे. यात जुन्या प्रसंगातून वास्तव दृश्यात येताना, प्रत्येक वेळी पावसाचा आवाज आपल्याला बदलेला जाणवतो. साऊंड पर्स्पेक्टिव्हचा तर यात विचार आहेच; पण कथानक कोणत्या वळणावर आहे, हेसुद्धा या नादब्रह्मातून दिग्दर्शक सूचित करतो तेव्हा आपण त्याला मनोमन सलाम करतो.
लाकूडतोड्या जंगलातून चालत जात असताना, त्याला काही वस्तू आणि मृतदेह दृष्टीस पडतो. कथेबरोबर कॅमेराने कसे चालायचे असते, याची ही एक उच्च शिकवणीच आहे. ते त्याचे जंगलातून चालत घटना स्थळापर्यंत पोहोचण्याचे दृश्य म्हणजे, कॅमेराने गायलेली ठुमरीच वाटते. दृश्यांचा कोन, आकार, कॅमेरा ठेवण्याच्या जागा, घनदाट जंगलातील झाडांचा सन्मान करत वेगवेगळ्या उंचीवरून टिपलेले क्षण, ही यातील छायाचित्रण, संकलन आणि कथेचे दृश्य भाषांतर करण्याच्या कौशल्याची परिसीमा आहे. कुरोसावाचे वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे अतिशय तंत्रबद्धरितीने तो चित्रपटाला हात घालायचा. छायाचित्रणाचे स्थळ निवडताना त्याचे आपण सांगत असलेल्या गोष्टीशी त्याचे सहज नाते जुळावे, असा त्याचा प्रयत्न असे आणि तेवढ्याच उत्तुंग प्रतिभेचे आविष्करण तो कलावंत कॅमेरा हाताळताना करत असे. चित्रीकरणाचा दृश्य टिपण्याचा आराखडा म्हणजे, त्याची ब्लू प्रिंट पाहण्यासारखी असे. ‘राशोमान’मध्ये वापरलेली ही केमिस्ट्री या चित्रपटाला एक वेगळी उंची देऊन गेली. यातील कथानकात एकाच मृत्यूबद्दल आणि बलात्काराबद्दल वेगवेगळ्या कहाण्या ऐकायला मिळतातच पण, त्याचबरोबर मनुष्य स्वभावाचे अनेक कंगोरेही यात पाहायला मिळतात. दोन पुरुषांमध्ये झुंज लावणारी स्त्री, पौरुषत्वावरून त्यांना आव्हान देणारी स्त्री, वेळप्रसंगी धाडसी निर्णय घेणारी स्त्री यात पाहायला मिळते. नवरा-बायको या नात्यातील अनेकविध कंगोरे दाखवत, हा चित्रपट आपल्याला अंतर्मुख करतो. तांत्रिक बाजू, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संगीत या सर्वच बाबतीत ही भट्टी अशी जमून आली आहे की, यात डावे-उजवे करण्यात वावच उरला नाही. एक सांघिक कामगिरी आणि सर्वंकष अनुभव म्हणूनच ‘राशोमान’कडे पाहिले जाते. चित्रपट म्हणून याला उदंड यश मिळालेच. ते यश एक आगळा-वेगळा विषय समर्थपणे हाताळण्याचे होतेच.पण, याचबरोबर या कलाकृतीने सिनेमा या माध्यमाला आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांना जोडण्याचे अभूतपूर्व काम केले. न्यायव्यवस्थेला या चित्रपटाने सत्याचा मार्ग किती खडतर असतो, याची जाणीव करून दिली. प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार, जबाब या न्यायालयातील नित्याच्या बाबींना एक नवा आयाम देत, या सिनेमाने या मुद्द्यांबद्दल एक प्रामाणिक प्रश्नचिन्ह उभे केले आणि तेही सज्जड पुरावे देऊन.
जगामध्ये सत्य हे व्यक्तिसापेक्ष आहे तसेच, दुर्मीळही आहे, या निराशावादाने चित्रपट झाकोळून जातो की काय असे वाटतानाच, चित्रपटाने एक आशेचा किरण यात दाखवला आहे. एका अनाथ तान्ह्या बाळाची जबाबदारी निरपेक्षपणे घेणारा माणूस जेव्हा लाकूडतोड्याच्या रूपात आपल्याला यात शेवटी भेटतो, तेव्हा कथानक एक सकारात्मक पण अनपेक्षित वळण घेते. सत्य-असत्याच्या झगड्यातही माणुसकी, सहानभूती, चांगूलपण या गोष्टीच टिकतात हा संदेश देत, ‘शाश्वत मूल्येच चिरंतन असतात’ याचा जयघोष ‘राशोमान’ करतो. विज्ञानाच्या परिक्षेत्रातील सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा उल्लेख केला की, अल्बर्ट आईनस्टाईन याचे नाव आपसूकपणे आपल्या ओठांवर येते. पण, आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या ‘सत्य’ या संकल्पनेच्या सापेक्षवादाच्या सिद्धांताचे श्रेय मात्र, आकिरा कुरोसावा आणि ‘राशोमान’च्या संपूर्ण टीमला द्यावे लागेल. दाट जंगलात चित्रीकरण करताना तेथील ताणेबाणे कुशलपणे फिल्मवर उतरवणार्या या चित्रपटाने, सूर्यालाही आपल्या कवेत घेतले. सूर्याचे असे थेट चित्रीकरण करणारा ‘राशोमान’ हा त्यावेळी चर्चेचा विषय झाला होता.
सूर्य पाहिलेला माणूस म्हणून आपण सॉक्रेटिसला ओळखतो. कुरोसावा यानेही सूर्य स्वतः पाहिला आणि जगालाही दाखवला. म्हणजे एका अर्थाने भौतिक आणि पार भौतिक अशा दोन्ही शाखांचा सुंदर मेळ घालत, सॉक्रेटिस आणि आईनस्टाईन या दोघांच्या जीवनतत्त्वाला ‘राशोमान’ने एका मुशीत टाकले. सत्य हे सापेक्ष असते, हे त्रिकालाबाधित सत्य इतया कलात्मकरितीने आणि अधिकारवाणीने क्वचितच कुणी दृश्य-ध्वनी माध्यमातून दाखवले असेल.
डॉ. केशव साठवे
९८२२१०८३१४