मुंबई : कॉर्पोरेट आणि खासगी संस्थांनी शहरी भागावर लक्ष केंद्रीत न करता दुर्गम आणि मागास जिल्ह्यांमध्ये गुंतवणूक तसेच सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम राबविण्यावर भर द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी केले.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या पाचव्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर, मुख्य सचिव राजेश कुमार, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, व्हीएसटीएफचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीणसिंह परदेशी, टाटा ग्रुपचे अध्यक्ष नोवेल टाटा, जेएसडब्ल्यू ग्रुपच्या संगीता जिंदाल, आयडीबीआयचे व्यवस्थापकीय संचालक राकेश शर्मा, जीआयसी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रामास्वामी नारायणन, यांच्यासह गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "व्हीएसटीएफच्या पहिल्या टप्प्यात अनेक गावांमध्ये राबवलेल्या योजनांचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून त्याच्या मूल्यमापनाचे परिणाम उत्साहवर्धक आहे. या टप्प्यात काही त्रुटी राहिल्या असल्या तरी त्या सुधारून दुसरा टप्पा अधिक प्रभावीपणे राबवून तो यशस्वी करू. ग्राम परिवर्तन उपक्रमाची अंमलबजावणी करताना व्हीएसटीएफचे फेलोज गावातून बाहेर पडल्यावर तेथील परिवर्तनाचा वेग मंदावल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या पुढील काळात गावातच उपलब्ध मनुष्यबळावर आधारित संस्थात्मक संरचना उभी करणे गरजेचे आहे. गावांमध्ये योजनांची अंमलबजावणी करताना प्रत्येक गावाची गरज ओळखून योजनांमध्ये बदल केल्यास परिवर्तनाची गती वाढेल. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनाच्या नव्या टप्प्यात सर्वांनी एकत्र येत व्यापक आणि परिणामकारक परिवर्तन घडवून आणूया."
खासगी भागीदारांचे योगदान मोलाचे"व्हीएसटीएफ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात अनेक खासगी कंपन्यांनी आणि सामाजिक उत्तरदायित्व क्षेत्रातील भागीदारांनी केवळ आर्थिक सहाय्यच नव्हे तर धोरणात्मक बदल, नवीन तंत्रज्ञान, डेटा आधारित प्रक्रिया आणि नाविन्यपूर्ण उपाय सुचवून शासनाच्या प्रयत्नांना बळकटी दिली. हे परिवर्तनाने केवळ योजना राबवणे नव्हे, तर गावात समर्पित व्यक्तींची उपस्थिती, सामाजिक बांधिलकीने काम करणारे फेलोज आणि स्थानिक पातळीवर संस्था उभ्या करण्यावर लक्ष केंद्रीत होते. प्रत्येक खासगी भागीदारांचे योगदान अत्यंत मोलाचे असून सरकारी योजनांची सखोल माहिती आणि सहयोगाने गावोगावी उत्तम परिणाम साधता आला आहे. व्हीएसटीएफ आणि भागीदार असलेल्या खासगी कंपन्यांमुळे ग्राम विकास परिवर्तनात चांगले काम झाले आहे," असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एसटीएल लिमिटेडने तयार केलेल्या जलसंधारण कामाच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच लातूर येथील रावसाहेब पाटील शेतकरी उत्पादक कंपनीच्या वेअर हाऊसचे ई अनावरण करण्यात आले. दर्जा व्यवस्थापनासंदर्भात क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि व्हिएसटीएफ यांच्यात तसेच ‘हरित छत्रपती संभाजी नगर उपक्रम’ राबविण्यासंदर्भात एसटीएल, व्हिएसटीएफ आणि छत्रपती संभाजी नगर महापालिका, सामाजिक वनीकरण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.