विवेकानंद शिलास्मारकाचे निर्माते एकनाथजी रानडे

    21-Aug-2025
Total Views |

एकनाथ रानडे आणि कन्याकुमारीचे स्वामी विवेकानंद स्मारक या दोघांचा स्वतंत्र विचार करणे तसे अवघडच. एखादा सामान्य वाटणारा माणूस देशभक्तीने आणि समाजप्रीतीने भारला गेला, तर केवढे मोठे कार्य उभे करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथ रानडे आणि त्यांनी उभारलेले कन्याकुमारी येथील ‘विवेकानंद शिला स्मारक!’ आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त या शीलास्मारकाच्या उभारणीतील त्यांच्या योगदानाचे स्मरण करणारा हा लेख...

बंगालमध्ये जन्मलेल्या विवेकानंदांचे स्मारक तामिळनाडूमध्ये कशाला उभारायचे, असा प्रश्न विचारणार्‍या मुख्यमंत्री भक्तवत्सलम् यांच्यासह सर्वांना बरोबर घेऊन एकनाथ रानडे यांनी ज्या पद्धतीने ते भव्य शिलास्मारक उभारून दाखवले, ते खरोखरच लोकविलक्षण. ती मोहीम यशस्वी करून दाखवताना त्यांनी जे संघटनाचातुर्य दाखवले, ते पाहून लालबहादूर शास्त्रींनी असे सहज उद्गार काढले होते की, "मला दोन एकनाथ रानडे मिळाले, तर मी काँग्रेसचे भवितव्य बदलवून दाखवीन.” तथापि, एकनाथ रानडे यांचे सारे गुणवैभव एखाद्या राजकीय पक्षाच्या विस्तारासाठी किंवा एखाद्या प्रभावी क्षेत्राच्या परिवर्तनासाठी वापरले जावे, असा नियतीचा संकेतच नव्हता मुळी. ते झाले होते पूर्ण देशाला समर्पित असे जीवनव्रती!

रानडे कुटुंबाचे पूर्वज कधीकाळी कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुयामधल्या विल्हे गावात राहत असले, तरी परिस्थितीच्या रेट्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ते विदर्भात स्थायिक झाले. रेल्वेची नोकरी करणारे रामकृष्णराव रानडे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई यांच्या पोटी जन्मलेले आठवे अपत्य म्हणजे एकनाथ. निम्न मध्यमवर्गातील कुटुंबात त्या काळात होई, तसेच एकनाथचे संगोपन आर्थिक अडचणींतून पण शिस्तीत सुरू होते. शीघ्रकोपी, रागीट वडिलांकडून मार खाऊन पहाटे ५ वाजेच्या आत उठायची सवय, जशी एकनाथला लागली होती, तसेच थोरल्या बहीणभावांचे प्रेमही त्याला भरपूर लाभत होते. तथापि, त्याच्या आयुष्याला नकळत पण निश्चित दिशा मिळाली, ती तो बाराव्या वर्षी थोरल्या बहिणीच्या सासरी राहण्यासाठी गेला असताना, रा. स्व. संघाच्या शाखेवर जाऊ लागल्यामुळे.

संघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असणारे अण्णाजी सोहोनी हे एकनाथच्या थोरल्या बहिणीचे यजमान होते. संघाच्या शारीरिक शिक्षण विभागाची जबाबदारी त्यांच्याकडेच होती. त्यांच्या प्रोत्साहनामुळे एकनाथ शाखेवर जाऊ लागला. खुद्द डॉ. हेडगेवारांच्याही तो संपर्कात आला. त्याला शाखेवर जाणे, संघाच्या कार्यक्रम-उपक्रमांतून भाग घेणे आवडू लागले. वडिलांचा विरोध न जुमानता तो संघात जात राहिला आणि तो केव्हा, कसा संघमय होऊन गेला हे त्याचे त्यालाही कळले नाही.
रा. स्व. संघाचे संस्कार तनामनात मुरवत, एकनाथ रानडे सर्वार्थाने विकसित होत गेले. एकीकडे शारीरिक कसरतीच्या मार्गाने मिळवलेली शक्ती अरेरावी करणार्‍या ब्रिटिश सैनिकांविरुद्ध वापरून रेल्वेच्या डब्यातील आपली आणि आपल्या बरोबरच्या स्वयंसेवकांची जागा परत मिळवण्याइतपत तो धट्टाकट्टा झाला होता; तर दुसरीकडे उपनिषदांपासून ‘गीतारहस्या’पर्यंत अनेक धर्मग्रंथांचे वाचन-मनन करून मिळवलेले ज्ञान महाविद्यालयातील बायबलच्या तासाला वापरून, ख्रिस्ती मिशनरी प्राध्यापकांकडून केली जाणारी हिंदू धर्माची निंदानालस्ती थांबवण्याइतका तो वादपटूही झाला होता. ‘तत्त्वज्ञान हा विषय घेऊन नागपूर विद्यापीठामधून ‘एमए’ पदवी मिळवताना त्याने विवेकानंद साहित्याचे अनेकदा वाचन केले. स्वामीजींच्या कार्याचा, संदेशाचा त्याच्यावर खूप खोलवर परिणाम झाला. त्या कार्याशी-संदेशाशी संघकार्याचा गाभा सुसंगत असल्याचे त्याला त्यावेळीच जाणवले आणि घरच्यांचा लग्नाचा आग्रह डावलून तो रा. स्व. संघाचा प्रचारक झाला.

१९३८ सालापासून महाकोशल प्रांतात प्रचारक म्हणून दाखल झालेल्या एकनाथजींनी ब्रिटिश कायद्याचा ससेमिरा चुकविण्यासाठी सागर विद्यापीठात कायद्याच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. महाविद्यालयात कधीही न जाता बाहेरून अभ्यास करून ते एलएलबीची परीक्षा १९४५ साली पहिल्या वर्गात उत्तीर्णही झाले. मध्यंतरीच्या काळात आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचे १९४० साली निधन झाले होते आणि माधव सदाशिव गोळवलकर तथा गुरुजी हे सरसंघचालक झाले होते. त्यांच्याशीही एकनाथ पूर्णपणे समरस झाले होते. इतके की, पुढे जानेवारी १९४८ साली गांधी यांची हत्या झाल्यावर केंद्र सरकारने रा. स्व. संघावर बंदी घालण्याचा जेव्हा निर्णय घेतला आणि गुरुजींसह अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली, तेव्हा एकनाथ यांना भूमिगत होऊन संघकार्य पुढे चालविण्याची जबाबदारी दिली गेली. अन्याय्य संघबंदीविरुद्ध सत्याग्रहाचे माध्यम वापरून शासनाच्या न्यायबुद्धीला आव्हान करण्याचे काम एकनाथ यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले. त्यांच्या अंगच्या संघटन कौशल्याचा प्रभाव पडून अखेरीस शासनाने संघप्रतिनिधींशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली.

तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्याशी संघाच्यावतीने वाटाघाटी करणार्‍या प्रतिनिधींमध्ये एकनाथ यांचाही समावेश होता. "गांधीजींची हत्या ज्या वातावरणात झाली, ते वातावरण संघाने तयार केलेले होते. त्यामुळे संघाला कुणी दोष दिला, तर ते स्वाभाविक आहे,” असे वल्लभभाई म्हणाले. ते खोडून काढताना एकनाथ यांनी एखाद्या निष्णात वकिलाच्या भूमिकेत शिरून सरळ प्रतिप्रश्नच विचारला. "काँग्रसने १९४२ साली ‘चले जाव’ची जी चळवळ केली, ती दडपण्यासाठी ब्रिटिशांनी अनन्वित अत्याचार केले. त्या अत्याचारांना कारणीभूत ठरलेले वातावरण काँग्रेसने तयार केले होते, असे म्हणून त्या अत्याचारांचा दोष काँग्रेसच्या माथी मारायला हवा का?” वाटाघाटींवेळी उपस्थित असणार्‍या जी. डी. बिर्ला यांच्यासारख्या उद्योगपतींनी एकनाथ यांना अडवायचा प्रयत्न केला, पण एकनाथ यांनी तो जुमानला नाही. वल्लभभाईंनी जरी लगेच प्रत्युत्तर दिले नाही, तरी नाराजीही प्रकट केली नाही. उलट पुढील वाटाघाटींमध्येही एकनाथ यांची स्पष्ट, ठाम भूमिका वल्लभभाईंनी गुणग्राहकतेने समजून घेतली. गांधीहत्येत संघाचा हात असल्याचा कोणताही स्पष्ट, ठोस पुरावा सरकारला प्रयत्न करूनही मिळाला नव्हता आणि हजारो स्वयंसेवक सत्याग्रही मात्र संशयामुळे देशामधील विविध तुरुंगांत खितपत पडलेले होते; ही वस्तुस्थिती सरकारसमोर ठेवण्यात एकनाथ यांनी कोणतीही कसूर ठेवली नाही. म्हणूनच वल्लभभाई चर्चेच्या दरम्यान एकदा असे म्हणालेदेखील की, "लोक मला ‘लोहपुरुष’ म्हणतात. पण, एकनाथ रानडे हे तर ‘पोलादी पुरुष’ आहेत!” केवढे मोठे प्रशस्तिपत्र होते ते! अशा एकनाथ यांना संघवर्तुळात त्या काळात ‘भूमिगत सरसंघचालक’ म्हणून ओळखले जाई, यात आश्चर्य मानण्याजोगे काही नाही.

पुढे यथावकाश संघावरील बंदी उठली. संघटनेचे काम पूर्वीप्रमाणे पुन्हा सुरू झाले. एकनाथ यांच्याकडे पूर्वांचलाचे (ईशान्य भारताचे) प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली. १९५३ साली अखिल भारतीय प्रचार प्रमुख म्हणूनही त्यांचीच नियुक्ती करण्यात आली. त्या जबाबदारीचा एक भाग म्हणून त्यांनी द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचा ५१वा वाढदिवस देशभर धूमधडायात साजरा करण्याची योजना आखली. प्रारंभी अशा व्यक्तिगत गौरवसोहळ्याचे आयोजन करू देण्यास गुरुजी तयार नव्हते. तथापि, एकनाथ यांनी त्यांचे मन वळवले. देशातून २५ लाख रुपयांचा प्रचंड निधी संकलित करण्यात आला. तो गुरुजींना जरी अर्पण करण्यात आला, तरी त्यातील पै न् पै संघकार्यासाठीच खर्च होणार, आर्थिक अडचणीत असणारी संघटना थोडीफार निश्चिंत होणार, याची सर्व संबंधितांना खात्री होती. या मोहिमेच्या निमित्तानेही एकनाथ यांचे संघटनकौशल्य दिसून आले. साहजिकच १९५८ साली तत्कालीन सरकार्यवाह भय्याजी दाणी अपरिहार्य कौटुंबिक कारणांसाठी त्या पदावरून काही काळापुरते बाजूला झाले, तेव्हा एकनाथ यांच्यावरच ती जबाबदारी सोपवण्यात आली.

१९६२ ते १९६३ साली रा. स्व. संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख म्हणून काम करीत असताना एकनाथ यांच्या मनात स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दीचा विचार आला. ती साजरी करण्याचा सर्वांत योग्य मार्ग कोणता, या प्रश्नाचा विचार करताना, कन्याकुमारीला ‘शिलास्मारक’ उभारण्याची कल्पना सूचली. स्वामी हे सर्वधर्म परिषदेसाठी अमेरिकेला जाण्यापूर्वी ज्या शिलाखंडावर ध्यानस्थ बसले होते, त्याच शिलाखंडावर स्वामी यांचे भव्य स्मारक उभारण्याची ती कल्पना महत्त्वाकांक्षी होती. पण, तिच्या पूर्ततेच्या मार्गात प्रचंड अडथळे होते. समस्या केवळ आर्थिक स्वरूपाची नव्हती, प्रशासकीय मंजुरी मिळवण्यापासून उभारावयाच्या भव्य स्मारकाची सुंदर रचना ठरण्यापर्यंत असंख्य टप्पे पार करावे लागणार होते. तथापि, एकनाथ हे कच्च्या गुरूचे चेले नव्हते. त्यांनी सरसंघचालक गोळवलकर गुरुजींशी सविस्तर चर्चा केली. संघकार्याची जबाबदारी सांभाळून विवेकानंद शिलास्मारकाच्या उभारणीचे कामही पूर्ण करणे कठीण असल्यामुळे स्मारक उभारणीच्या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करण्याची परवानगी घेतली आणि एका सुनियोजित व्यूहरचना आखून ते कामाला लागले.

स्वतंत्र भारताच्या आजवरच्या वाटचालीत सोमनाथच्या मंदिराचा जीर्णोद्धार होताना किंवा अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी ढाँचा वाद चर्चिला जात असताना, वातावरणात जी कटुता निर्माण झाली, तिचा मागमूसही विवेकानंद शिलास्मारकाच्या उभारणीवेळी दिसला नाही.

प्रा. हुमायून कबीर त्यावेळी केंद्रीय सांस्कृतिकमंत्री होते. कन्याकुमारीला ‘शिलास्मारक’ उभारण्यास पर्यावरणाच्या कारणास्तव त्यांचा विरोध होता. त्यांच्या त्या विरोधाकडे बोट दाखवून तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री भक्तवत्सलम् स्मारकाच्या प्रकल्पाला परवानगी नाकारत होते. एकनाथ यांनी परिस्थितीचा तपशीलवार अभ्यास केला. त्यांच्या लक्षात आले की, प्रा. कबीर कलकत्ता शहराच्या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. कलकत्त्याला जाऊन ‘रामकृष्ण मिशन’च्या सहकार्याने एकनाथ यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि प्रा. कबीर विरोध करीत असल्यामुळे कन्याकुमारीला विवेकानंदांचे स्मारक उभे राहू शकत नाही, ही आपली तक्रार त्यांनी तेथे मांडली. बंगाली जनमत कबिरांविरुद्ध चांगलेच तापले. त्या झळा लागल्यावर प्रा. कबीर वठणीवर आले आणि एकनाथ यांना भेटीला बोलावून, "आपण त्या स्मारकाच्या विरोधात नाही,” असे त्यांनी सांगितले. नंतर भक्तवत्सलम् तयार झाले; पण समुद्रातील खडकावर स्मारक न उभारता किनार्‍यावर ‘१५ ु १५’ असे ते बांधले जावे, असा त्यांचा हेका होता. तथापि, एकनाथ यांनी केंद्रीय गृहमंत्री असणार्‍या लालबहादूर शास्त्रींशी संपर्क साधला. ते स्मारकाला अनुकूल असले, तरी त्यांनी थोडे थांबायला एकनाथ यांनी सांगितले. विवेकानंद जन्मशताब्दीच्या वर्षातच स्मारकाच्या प्रकल्पाला मान्यता मिळविणे एकनाथ यांच्या दृष्टीने आवश्यक होते. त्यांनी ती निकड स्पष्ट केल्यावर शास्त्रीजींनी त्यांना खासदारांच्या मान्यतादर्शक सह्या मिळविण्याचा मार्ग सूचवला. एकनाथ यांनी ते आव्हान स्वीकारले आणि अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत लोकसभेच्या तब्बल ३२३ खासदारांच्या मान्यतादर्शक सह्या मिळवल्या. सर्व पक्षांचे खासदार त्या यादीत समाविष्ट होते, हे विशेष!

असा सर्वपक्षीय पाठिंबा मिळवून दाखवल्यामुळे भक्तवत्सलम् यांनी किनार्‍यावरच स्मारक उभारण्याचा आपला हेका सोडला आणि भर समुद्रात ‘त्या’ ऐतिहासिक शिलेवर स्मारक उभारण्यास परवानगी दिली. तथापि, ते स्मारक ‘१५ ु १५’ याच आकाराचे असावे, असा आग्रह मात्र त्यांनी कायम ठेवला. एकनाथ त्या मुद्द्यावर घासाघीस घालत बसले नाहीत. "स्मारकाचा आराखडा तयार करूया आणि किमान सहा प्रतिष्ठित मान्यवरांना तो दाखवून त्याला अंतिम स्वरूप देऊया,” असे ते म्हणाले. भक्तवत्सलम् यांनी विचारल्यावर एकनाथ यांनी त्या सहा मान्यवरांची नावे सांगितली. पंतप्रधान पंडित नेहरू, गृहमंत्री लालबहादूर शास्त्री, राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, सांस्कृतिक खात्याचे केंद्रीय मंत्री एम. सी. छागला, ‘रामकृष्ण मिशन’चे अध्यक्ष आणि कांची कामकोटी पीठाचे परमाचार्य ही सहा नावे, विशेषतः परमाचार्यांचे नाव ऐकल्यावर भक्तवत्सलम् यांनी तत्काळ होकार दिला. ते परमाचार्यांचे शिष्य होते. राजकारणाव्यतिरिक्त सर्व बाबींत ते आचार्यांचे म्हणणे मानत असत, हे एकनाथ यांनी माहिती करून घेतले होते.

‘शिलास्मारका’चे स्थापत्य रचनाकार एस. के. आचारी यांना बरोबर घेऊन एकनाथ यांनी परमाचार्य श्री चंद्रशेखर सरस्वती यांची भेट घेतली. उभारायचे शिलास्मारक रूढार्थाने मंदिर नसले, तरी त्याची रचना मंदिरासारखीच असावी, असे परमाचार्यांचे मत होते. त्यानुसार प्रारूप तयार झाले, त्यांची संमतीही मिळाली. मग एकनाथजींनी भक्तवत्सलम् यांची भेट घेतली. परमाचार्यांनी मंजूर केलेले प्रारूप पाहून मुख्यमंत्र्यांनीही हिरवा कंदील दाखवला. तेव्हा हळूच एकनाथ म्हणाले, "स्मारकाचा आकार जरा मोठा आहे.” भक्तवत्सलम् यांनी "किती मोठा आहे,” विचारण्याऐवजी सरळ सांगून टाकले, "असू दे. तुम्ही काम सुरू करा.” प्रारूप होते जरासे मोठे म्हणजे, १३०.५ द ५६ एवढे मोठे. जसे एकनाथ यांना हवे होते, तसे स्वामी यांच्या दिगंत कीर्तीला साजेल, असे भव्य!

त्यानंतर स्मारकाच्या उभारणीत एवढेच नव्हे, तर देवी कन्याकुमारीचे पदचिन्ह असणार्‍या ठिकाणी उभारायच्या मंडपाच्या बांधकामातही सर्व समाजघटकांचे उत्तम सहकार्य मिळत गेले आणि मूळ प्रकल्पाप्रमाणेच इतर उपप्रकल्पही यथायोग्य प्रकारे मार्गी लागले. तथापि, एकनाथ केवळ स्मारक उभारून झाले की, धन्यता मानणार्‍यांपैकी नव्हते. ते स्मारक जिवंत ऊर्जास्रोत बनावे म्हणून त्यांनी विवेकानंद केंद्र स्थापन केले. विवेकानंदांना अभिप्रेत असणारा भारत घडविण्यासाठी आपले संपूर्ण जीवन व्रतस्थ भावनेने ‘मातृचरणी’ अर्पण करणारे भारतीय तरुण पुढे यावेत, यासाठी त्यांनी त्या केंद्रातर्फे ‘जीवनव्रती’ कार्यकर्त्यांची कल्पना मांडली. तसे कार्यकर्ते मिळवले आणि त्यांच्या समग्र प्रशिक्षणाचीही व्यवस्था केली. अरुणाचल प्रदेशसारख्या सीमावर्ती प्रांतात विवेकानंद केंद्राच्यावतीने शाळा चालवण्याच्या प्रकल्पासारख्या विधायक प्रकल्पांची तपशीलवार आणखीही केली. ‘विवेकानंद शिलास्मारक प्रकल्पा’मागील भूमिका, त्यासाठी घ्यावी लागलेली मेहनत, या प्रकल्पाला विविध पक्षीय राजकीय नेत्यांनी दिलेला बरा-वाईट प्रतिसाद यावर एकनाथ यांनी नंतर, ‘द स्टोरी ऑफ विवेकानंद रॉक मेमोरियल अ‍ॅज टोल्ड बाय एकनाथ रानडे’ हे पुस्तक लिहिले आहे. एकनाथ रानडे यांचे दि. २२ ऑगस्ट १९८२ रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या स्मृतीस शतशः प्रणाम.

(संकलन आणि लेखन : विश्व संवाद केंद्र, पुणे)