मुंबई : बेस्टच्या निवडणूकीमुळे महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडला नाही तर हिंदुत्वाच्या स्टँडला स्थान आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे, अशी टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवार, २० ऑगस्ट रोजी केली. बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीत झालेल्या ठाकरे बंधूंच्या पराभवावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
नवनाथ बन म्हणाले की, "गेल्या ९ वर्षांपासून मुंबईतील बेस्टवर ज्यांचे वर्चस्व होते ते अखेर संपुष्टात आले आहे. भाजप आणि शशांक राव यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोरच्या पॅनलला एकही जागा जिंकता आलेली नाही. सर्वसामन्य मुंबईकर हा भाजपच्या नेतृत्वाबरोबर आहे, हे पुन्हा सिद्ध झाले. मी विश्वप्रवक्ते संजय राऊत यांची पत्रकार परिषद ऐकली. त्यावेळी ते मला याविषयी कल्पना नाही, असे म्हणाले. पण खरेतर चार दिवसांपूर्वी संजय राऊत याच मुद्दावर पोपटपंची करत होते, भरभरुन बोलत होते. आता मात्र, त्यांची दातखिळी बसली आहे का? ते मूग गिळून गप्प बसलेत का?" असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "आता त्यांच्याकडे बोलायला ईव्हीएमचा, मतचोरीचा, षडयंत्राचा मुद्दा नाही आणि आता बॅलेट पेपरवर मुंबईकरांनी ही निवडणूक भाजपच्या माध्यमातून विजयी केली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ठाकरे बंधूंचा टायर या निवडणूकीत पंक्चर झाला आहे. यापुढे महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा ब्रँड चालणार आहे आणि ठाकरे ब्रँड पंक्चर होणार आहे. महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडला नाही तर हिंदुत्वाच्या स्टँडला स्थान आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. यापुढे मुंबईमध्ये जो कुणी हिंदुत्वाचा स्टँड घेईल तोच विजयी होणार, हे या निवडणूकीने दाखवून दिले."
सहकारात राजकारण आणल्याने मुंबईकरांनी चपराक दिली"ही निवडणूक एका बेस्टच्या पतसंस्थेची होती. या निवडणूका पक्षीय पातळीवर घेऊ नये, असा आमचा प्रयत्न होता. परंतू, संजय राऊत, उबाठा आणि मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक या निवडणूकीत राजकारण आणण्याचा प्रयत्न केला. सहकारामध्ये राजकारण आणल्याने सर्वसामान्य मुंबईकरांनी त्यांना चपराक दिली आहे. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणूकीतही तुमचा ब्रँड उभा राहणार नाही," असेही ते म्हणाले.