कहाणी पिठोरीची

20 Aug 2025 22:28:02

आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहात होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई? ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असे सहा वर्षे झाले. सातव्या वर्षीही तसंच झालं, तेव्हा सासरा रागावला. ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं. तिला रानात हाकून लावलं. पुढं जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, ‘बाई बाई, तू कोणाची कोण? इथं येण्याचं कारण काय? आलीस तशी लौकर जा. नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील!’ तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, ‘तेवढ्याकरिताच मी इथे आले आहे.’ झोटिंगाची बायको म्हणाली, ‘बाई बाई, तू इतकी जिवावर उदार का?’ तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, ‘मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजेसासर्याचं श्राद्ध असे. माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी सहा बाळंतपणं माझी झाली. सातव्या खेपेलाही असंच झालं. तेव्हा मामंजींना माझा राग आला. ते मला म्हणाले, ‘माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे सात वर्षे उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो!’ असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथे आले. आता जगून तरी काय करायचं आहे?’ असं म्हणून रडू लागली. तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, ‘बाई, तू भिऊ नको, घाबरू नको. अशीच थोडी पुढं जा. तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल, तिथं एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या साती आसरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि ‘अतिथी कोण आहे’ म्हणून विचारतील. असं विचारल्यावर ‘मी आहे’ म्हणून म्हण. त्या तुला पाहतील. कोण, कोठची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग!

ब्राह्मणाच्या सुनेनं ‘बरं’ म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली. तर बेलाचं झाड पाहिलं. तिथंच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तर जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या आसरांच्या स्वार्यासुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि ‘अतिथी कोण आहे’ म्हणून विचारलं. त्याबरोबर ती खाली उतरली, ‘मी आहे’ म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण, कोठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या-देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा आसरांनी ती दाखविली. पुढं त्यांनी तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढं तिला हे व्रत सांगितलं. चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्युलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिनं विचारलं, ‘यानं काय होतं?’ आसरांनी सांगितलं. हे व्रत केलं, म्हणजे मुलंबाळं दगावत नाहीत, सुखासमाधानांत राहतात. पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली, ती आपल्या गावात आली. लोकांनी तिला पाहिलं, ब्राह्मणाला जाऊन सांगितलं. ‘भटजी भटजी, तुमची सून घरी येत आहे.’ त्याला ते खोटं वाटलं. अर्ध्या घटकेनं पाहू लागला, तर मुलंबाळं दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सूनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला, मूठमर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी सांगितली. पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलांबाळांसुद्धा सुखानं ती नांदू लागली. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
Powered By Sangraha 9.0