मुंबई : दोन शून्यांची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी त्या गणिताचे उत्तर शून्यच येते, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे बंधूंवर केली आहे. मुंबईतील दी बेस्ट एम्प्लॉइज को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या निवडणूकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचा दारूण पराभव झाला असून यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
केशव उपाध्ये म्हणाले की, "एकाकडे गमावण्यासाठी काही राहिलेले नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काही राहिलेले नाही, अशा ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी त्या गणिताचे उत्तर शून्यच येते, हे शाळा न शिकलेल्या मुलांनाही माहीत असलेले उत्तर ओळखले नाही तर काय होईल? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ‘बेस्ट कामगार पतपेढी’च्या निवडणूक निकालाकडे पाहा. कालपर्यंत दोन शून्ये आपली किंमत जोखण्याचे आव्हान देत होती, आज त्यांनाच त्यांची किंमत कळली आहे," अशी खरमरीत टीका त्यांनी केली.