मुंबई : राज्यभरात सुरू असलेल्या पावसाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात आढावा घेतला. सोमवार, १८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक पार पडली.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन, माहिती व तंत्रज्ञान मंत्री गिरीश महाजन, मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेशकुमार, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, आपत्ती व्यवस्थापन अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.
मागील दोन दिवसांत राज्यात विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. कोकणातील काही नद्यांनी धोकापातळी ओलांडली असून जळगावमध्ये मोठे नुकसान झाले आहे. मुखेडमधील परिस्थिती नियंत्रणात आली असून, विष्णुपुरीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातील ८०० गावे बाधित झाली आहेत. दक्षिण गडचिरोलीत प्रशासन सतर्क आहे. अकोला, चांदूररेल्वे, मेहकर, वाशिम येथे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. विदर्भात प्राथमिक अंदाजानुसार २ लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे.
कर्नाटक सरकारशी चर्चा सुरू
अलमट्टीबाबत कर्नाटक सरकारशी सातत्याने संपर्कात असून सध्या धोका नसला तरी यंत्रणा सतर्क ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अलमट्टीचा धोका कोल्हापूरला होऊ शकतो. त्यादृष्टीने कर्नाटक सरकारशी चर्चा सुरु आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईत सोमवारी सकाळपासून अवघ्या आठ तासांत १७० मिमी पाऊस झाला आहे. शहरात पाणी तुंबल्यामुळे दोन ठिकाणी वाहतूक प्रभावित झाली. रेल्वे, मेट्रो आणि इतर वाहतूक सुरळीत सुरू आहे. पुढील १० ते १२ तास मुंबईसाठी अत्यंत महत्वाचे असून प्रशासनाने काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच उद्याच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शाळांना सुटी जाहीर करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासन आणि महापालिकांना देण्यात आला आहे.
एसएमएस अलर्ट पाठवताना वेळेचा अचूक उल्लेख करावा, येणारे अलर्ट गांभीर्याने घ्यावेत, स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. तसेच तातडीच्या मदतीसाठी मंत्रालय गाठण्याची गरज नाही, स्थानिक पातळीवरच निधी आणि अधिकार देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. घरांच्या पडझडीसाठीची मदत, पंचनामे योग्य पद्धतीने करा. पर्यटकांच्या ठिकाणी पोलिसांनी सतर्क रहावे, दरडी कोसळणाऱ्या भागात आधीच यंत्रणा कार्यरत करावी, तसेच निवारा केंद्रात भोजन, शुद्ध पाणी आणि पांघरूण यांची पुरेशी सोय करावी, असेही निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
"गेले दोन दिवस राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी होत असून १८ ते २१ ऑगस्टदरम्यान विविध भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. जवळपास १५ ते १६ जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये योग्य प्रकारे सुविधा व्हाव्या, यादृष्टीने प्रयत्न सुरु आहे. आवश्यकता असेल तरच लोकांनी घराबाहेर पडावे. नदी आणि नाल्यांच्या किनाऱ्यांवर लोकांनी काळजी घ्यावी."
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राची अस्मिता सांगणाऱ्या पक्षांनी सी. पी. राधाकृष्णन यांना समर्थन द्यावे
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना एनडीएने उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. सी. पी. राधाकृष्णन हे मुळचे तामिळनाडूचे असले तरी ते महाराष्ट्राचे राज्यपालही आहेत आणि महाराष्ट्राचे मतदारसुद्धा आहेत. विधानसभेच्या निवडणूकीत त्यांनी महाराष्ट्रात मतदान केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही विशेष आनंदाची बाब आहे. महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी आपल्या महाराष्ट्रातील माणूस उपराष्ट्रपती होत असल्याने त्यांना मतदान केले पाहिजे. विशेषत: महाराष्ट्राची अस्मिता सांगणारे पक्ष जसे उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांनी सी. पी. राधाकृष्णन यांना समर्थन दिले पाहिजे. मी निश्चितपणे त्यांना निवेदन करेन. महाराष्ट्रातील एक मतदार उपराष्ट्रपती होतो आहे त्यासाठी त्यांना सगळ्यांनी मदत केली पाहिजे," असेही ते म्हणाले.