मुंबई : (Maharashtra Rain Update) गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा जोरदार आगमन केले आहे. मुंबईत शुक्रवारपासून संततधार पाऊस कोसळत आहे. सलग तिसऱ्याही दिवशी पावसाचा जोर कायम आहे. मुंबईसाठी भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. मध्य भारतावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून त्याच्या प्रभावामुळे पुढचे दोन दिवस म्हणजेच १८ ते १९ ऑगस्ट दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई शहर तसेच उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत सरासरी २३.८१ मिमी, पूर्व उपनगरात २५.०१ मिमी आणि पश्चिम उपनगरात १८.४७ मिमी पाऊस पडला, काही ठिकाणी ४०-४५ मिमी पाऊस पडला. सोमवारी सकाळी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस सुरुच असल्याने मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं असून त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. लोकल सेवा उशिराने सुरु असून रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
दुसरीकडे मुंबई महापालिकेने मुसळधार पाऊस आणि भरतीचा इशारा दिला आहे.
पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही भागात कमी वेळात अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता देखील आहे.त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
राज्यभरात आज पावसाचा इशारा कुठे?
अतिमुसळधार पाऊस - मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली
अतिवृष्टीचा इशारा - रत्नागिरी, रायगड, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर
मेघगर्जनेसह पाऊस - धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्या नगर, अकोला भंडारा, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ