मुंबई : (Vasai-Virar Heavy Rainfall) गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांत जोरदार पाऊस सुरू आहे. वसई- विरारमध्येही सोमवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विरार पश्चिम येथील युनिटेक सोसायटीमधील जवळपास ३५ ते ४० इमारती पाण्याखाली गेल्या आहेत.
युनिटेक कॉम्प्लेक्समधील इमारतींच्या तळमजल्यावर गुडघाभर पाणी भरले आहे
युनिटेक कॉम्प्लेक्स मधील १ ते ३७ नंबरच्या सर्व सोसायट्यांमधील इमारतीच्या तळ मजल्यात गुडघाभर पाणी साचले आहे. पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. महानगरपालिकेने पाणी उपसण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे, सक्शन पंपाने पाणी काढण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबईत पावसामुळे कुठे, काय स्थिती आहे?
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. दहिसर टोल नाक्याजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाणी साचले आहे. मालाड सबवेमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. जोगेश्वरी पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ पाणी साचण्यास सुरुवात झाली. वडाळा, कुर्ला आणि दादर पारसी कॉलनी येथे गुडघाभर पाणी साचले आहे. मुंबईत संततधार पावसामुळे चुनाभट्टी विभागातील चुनाभट्टी रेल्वे स्टेशन, आंबेकर नगर, समर्थ नगर, भक्ती धाम रोड, धावजी केणी मार्ग, भाजी मार्केट, वि.एन.पूर्व मार्ग येथे पाणी साचले आहे.परळ हिंदमाता, सायन गांधी मार्केट परिसरातही पाणी साचलं आहे.