मुंबई : महाराष्ट्र शासन विकासासाठी कटिबद्ध असून खासगी क्षेत्रासोबत भागीदारीतून ‘तिसरी मुंबई’ घडवण्यासाठी कार्यरत आहे. मुंबई महानगरक्षेत्राच्या विकासासाठी रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई विकसित करण्यात येत आहे. ही तिसरी मुंबई म्हणजे आर्थिक विकासाचा नवा अध्याय असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १८ ऑगस्ट रोजी केले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वरळी येथे गोल्डमन सॅक्स या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकेच्या नव्या विस्तारित मुंबई कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गोल्डमन सॅक्ससारख्या जागतिक वित्तसंस्थेचे नवे कार्यालय महाराष्ट्रात उघडणे ही राज्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. यामुळे महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळ, भक्कम बाजारपेठा आणि गुंतवणूक-अनुकूल वातावरणाची पुष्टी होते. ही घटना महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील नेतृत्वाला अधोरेखित करणारी आहे. महाराष्ट्र शासन विकासासाठी कटिबद्ध असून खासगी क्षेत्रासोबत भागीदारीतून ‘तिसरी मुंबई’ घडवण्यासाठी कार्यरत आहे. तिसऱ्या मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची केंद्रे उभारण्यात येत आहेत. मुंबई आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. वैद्यकीय महाविद्यालये उभारली जाणार असून या ठिकाणी इनोवेशन हब होणार आहे. त्यामध्ये संशोधनासाठीच्या सर्व सुविधा असतील. तसेच क्वांटम कम्प्युटिंग क्षेत्रातील संशोधन आणि ‘एआय’ आधारीत व्यवस्था असेल."
तिसऱ्या मुंबईची कनेक्टिव्हिटी उत्तम असणार
"तिसऱ्या मुंबईची सध्याच्या मुंबईसोबत कनेक्टिव्हिटी उत्तम असेल. कोस्टल रोड, अटल सेतू सोबतच सध्या काम सुरू असलेला वरळी-शिवडी लिंक रोड असेल. मुंबईच्या विकासाला आणखी गती देण्याचे काम ही तिसरी मुंबई करेल. या क्षेत्राच्या विकासामध्ये खासगी गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा. खासगी आणि सरकारी भागीदारीतूनच चांगला विकास होतो. येथे येणाऱ्या गुंतवणूकदारांना लागणाऱ्या सर्व मंजुऱ्या देण्याचे काम शासन स्तरावरून जलद पूर्ण करण्यात येईल. महाराष्ट्र गुंतवणूक स्नेही राज्य आहे. कोणतीही अडचण आल्यास ती तत्परतेने सोडवण्यात येत आहे. त्यामुळे तिसऱ्या मुंबईच्या विकासात गुंतवणूकदारांनी योगदान द्यावे," असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....