मुंबई : देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार वरुण सरदेसाई, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, शहीद सैनिकांचे कुटुंबीय, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक आदी यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते दक्षिण आफ्रिकेतील ८९ कि.मी. अंतराची The ultimate Human race नावाने ओळखली जाणारी खडतर मॅराथॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करून सिल्वर मेडल मिळविल्याबद्दल तहसीलदार युवराज बांगर यांचा तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी गुणवत्ता यादीत राज्यात नववा क्रमांक मिळाल्याबद्दल आणि मुंबईतून पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल मुंबादेवी विद्या निकेतन, बोरीवली (प) शाळेतील कु. स्नेहजा प्रसाद बापट हिचा सत्कार करण्यात आला.
तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई भाजपा कार्यालय वसंत स्मृती येथून तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमलेल्या या रॅलीमध्ये तरुण कार्यकर्ते आणि पदाधिकारी उत्साहाने सहभागी झाले. यासोबतच वांद्रे पश्चिम मतदारसंघातील सांताक्रूझ पश्चिम भागातूनही तिरंगा यात्रा काढण्यात आली. या तिरंगा यात्रेत माजी नगरसेविका हेतल गाला, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.