नवी दिल्ली : भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडीसाठी मतदान ९ सप्टेंबर रोजी होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणीही होईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केले आहे.
उपराष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस २१ ऑगस्ट आहे. २५ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. २१ जुलै रोजी पावसाळी संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आरोग्याच्या कारणास्तव जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपतीपद रिक्त झाले होते. गुरुवारी, निवडणूक आयोगाने माहिती दिली की त्यांनी आगामी उपराष्ट्रपती निवडणूक २०२५ साठी तयारी पूर्ण केली आहे आणि मतदार यादी अंतिम केली आहे.
उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य एकल हस्तांतरणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व प्रणालीनुसार करतात. त्यासाठी गुप्तमतदान घेतले जाते.