गुजराती व्यापाऱ्याला मारहाण राज ठाकरे म्हणाले, “अजून तर काही...”

    05-Jul-2025
Total Views |

Raj Thackeray on marathi
 
मुंबई: मिरा-भाईंदरमध्ये गुजराती व्यापाऱ्याला मारहाण प्रकरणावर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच मत व्यक्त केलं आहे. समोरच्याला मारताना तो गुजराती निघाला, त्याला करायचं काय? त्याच्या कपाळावर गुजराती आहे, असं लिहीलं होतं का?, सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. वाद झाला त्यात तो गुजराती निघाला, म्हणून सगळेच काही वाईट नाहीत, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. अजून तर काही केलचं नाही, असं म्हणत राज यांनी मिरा-भाईंदरच्या घटनेबद्दल वक्तव्य केलं आहे.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जवळपास वीस वर्षांनी एकाच मंचावर उपस्थित राहिले. यावेळी मराठीचा मुद्दा आणि त्रिभाषा सुत्राच्या मुद्द्यावरुन त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. महाराष्ट्रात राहून मराठी बोलायचा असा अट्टहास धरला, त्यातून वाद झाला आणि त्याला कानशीलात लगावली, यात मराठी-गुजराती हा मुद्दा येतो कुठून?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पुन्हा असं काही दिसेल तेव्हा व्हिडिओ काढू नका, अशी सूचना राज ठाकरेंनीही दिली आहे.
 
मुंबई महापालिका निवडणूकीत गाजणार मराठीचा मुद्दा
 
मुंबई महापालिकांच्या दृष्टीने राज-उद्धव यांची युती महत्वाची मानली जात आहे. महाविकास आघाडीने स्वतंत्र निवडणूका लढविणार असल्याचे संकेत दिल्यानंतर राज-उद्धव यांनी एकत्र येण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, वरळी डोम येथील सभेत काँग्रेसने दूर राहणे पसंत केले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याचा फटका बिहार निवडणूकीत बसण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.