नवी दिल्ली: डीजीसीए (नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने) केलेल्या जुलैमधील ऑडिटमध्ये एअर इंडियाची पोलखोल झाल्याचे माहिती उघडकीस आली आहे. डीजीसीएला एअर इंडियाच्या कामकाजात जवळपास ५१ सुरक्षा त्रुटी आढळून आल्या आहेत. ज्यात एअर इंडियाच्या काही वैमानिकांसाठी पुरेसे प्रशिक्षण नसणे, मान्यता नसलेले सिम्युलेटर वापरणे आणि विमानातील खराब रोस्टरिंग सिस्टम या मुख्य सुरक्षा त्रुटीसंह अन्य त्रुटींचा समावेश आहे.
टाटा समूहाची मालकी असलेल्या'एअर इंडिया' या एअरलाइन कंपनीला डीजीसीएच्या विविध चेतावणीसह अन्य गोष्टींचा सामना करावा लागत आहे. डीजीसीएने नुक्त्याच केलेल्या ऑडिटमध्ये एअर इंडियाच्या तब्बल ५१ विविध सुरक्षा त्रुटींचे दाखले देत कंपनीला चांगलेच फटकारल्याचे दिसून आले. “कंपनीने विमानांची उपकरणे न तपासता विमानांना प्रवासांसाठी वापरणे, इंजिनचे खराब भाग वेळेवर न बदलणे, खोटे रेकॉर्ड तयार करणे आणि क्रू व्यवस्थापनचा पगार वेळेवर न देणे.” असे डीजीसीएने आपल्या ऑडिटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या सध्या वापरात असलेल्या ३१ ऑपरेशनल विमानांची तपासणी आणि ऑडिट करण्याचा निर्णय डीजीसीएने घेतला होता, याच ऑडिटमध्ये डीजीसीएला या ५१ सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. याबाबत डीजीसीएचे अधिकारी म्हणाले कि, “एअर इंडियाने आखून दिलेल्या अनिवार्य नियतकालिक मूल्यांकनापूर्वी त्यांनी त्यांची देखरेख कर्तव्ये पूर्ण करणे गरजेचे होते पण कंपनीने तसे केले नाही.” असे एअर इंडियाचे अधिकारी म्हणाले.
डीजीसीएने मिळालेल्या ५१ सुरक्षा त्रूटीसंबधी एअर इंडिया कंपनीला कडक इशारा देत, विमानांचे निरीक्षण करणाऱ्या अकार्यक्षम असणाऱ्या सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.