गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाचे ऐतिहासिक यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत अल्प कालावधीत विक्रमी जलसाठा

30 Jul 2025 20:23:36

मुंबई : गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारण क्षेत्रात गडचिरोली जिल्ह्यात ऐतिहासिक यश प्राप्त केले आहे. अल्प कालावधीत विक्रमी जलसाठा निर्माण करत गडचिरोलीने संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श निर्माण केला असून जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी समन्वय आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे मोठे यश मिळाले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गडचिरोली जिल्ह्याने जलसंधारण क्षेत्रात जे यश मिळवले आहे, ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. ही केवळ आकडेवारी नाही, तर ग्रामीण भागातील जलसुरक्षेच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ९७ गावांमध्ये जलसाठे उभारले गेले असून २०२५-२६ या वर्षात ६४.५ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यात आली. यामुळे हजारो नागरिकांसाठी पाण्याची उपलब्धता निश्चित झाली आहे. विशेष बाब म्हणजे याच वर्षात तब्बल ६ लाख ४४ हजार ६०१ घनमीटर गाळ काढून टाकण्यात आला, जो मागील दोन वर्षांच्या एकत्रित कामगिरीपेक्षा आठपट अधिक आहे. या कामांमध्ये विविध सामाजिक संस्था, संघटना यांचेही महत्त्वाचे योगदान आहेत."

एकत्रित काम केल्यास कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही

"या कामगिरीत जिल्हा प्रशासन अर्थात गडचिरोली जिल्हाधिकारी यांचा मोठा सहभाग आहे. जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायती, स्थानिक यंत्रणा आणि जनतेने एकत्रितपणे काम केल्यास कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही. नियोजनबद्ध पद्धतीने आणि तांत्रिक मार्गदर्शनाने जलसुरक्षेसाठी मोठी झेप घेता येते, हे गडचिरोली जिल्ह्याने दाखवून दिले आहे. या यशस्वी मॉडेलचा अभ्यास करून संपूर्ण राज्यात अशा उपक्रमांची अंमलबजावणी केली जाईल. जलसंधारणाच्या माध्यमातून शेती, जनजीवन आणि पर्यावरण यांना स्थैर्य मिळेल," असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
Powered By Sangraha 9.0