मुंबई : कृषीपदवी अभ्यासक्रम प्रवेश अटीत शिथिलता करण्याचा निर्णय घेत कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विशिष्ट गुणांची अट शिथिल करत खुल्या प्रवर्गासाठी ४५ टक्के आणि आरक्षित प्रवर्गासाठी ४० टक्के गुण आवश्यक असल्याचा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेतल्याची माहिती कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.
कृषी विद्यापीठातील बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी, उद्यानविद्या, बीएफएससी, वनशास्त्र, बी.टेक. कृषी अभियांत्रिकी, अत्रशास्त्र, जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि सामुदायिक विज्ञान अशा एकूण ९ पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आतापर्यंत खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी इयत्ता १२वी (विज्ञान) मध्ये ५० टक्के गुणांची अट होती. महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेची ११८ वी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सदर अट शिथिल करत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५ टक्के आणि आरक्षित प्रवर्गासाठी ४० टक्के गुणांची अट लागू करण्यात आली आहे.
अर्ज कुठे करणार?
या अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जासाठी २७ जुलै २०२५ पर्यंत अंतिम मुदत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कृषीमुळे वाढणार बारावीचे टक्के!
"केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२ वी (विज्ञान) अभ्यासक्रमात ‘कृषी (८०८)’ हा विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी पदवी प्रवेशात अधिभार मिळत नव्हता. आता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या ११५ व्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार या विषयाला १० गुण अधिभार देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात आणण्यासाठी हे सकारात्मक पाऊल आहे. प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचा आनंद आहे," असा विश्वास मंत्री कोकाटे यांनी यांनी व्यक्त केला.