मुंबई लोकल ताफ्यात लवकरच नव्या ट्रेन, ५२,७२४ कोटी निधी मंजूर!

Total Views |

नवी दिल्ली, मुंबई उपनगरीय भागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि प्रवाशांच्या भविष्यातील मागण्या पूर्ण करण्यासाठी मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प एमयुटीपी II अंतर्गत ८,०८७ कोटी, एमयुटीपी-III अंतर्गत १०,९४७ कोटी आणि एमयुटीपी IIIA अंतर्गत ३३,६९० कोटी खर्चाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. ही माहिती केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवार,दि.२५ रोजी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

MUTP-III मध्ये पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर, विरार-डहाणू मार्गिकेचे चौपदरीकरण, ऐरोली-कळवा उन्नत कॉरिडॉर, अतिक्रमण नियंत्रण आणि रोलिंग स्टॉक खरेदी अशी विविध कामे समाविष्ट आहेत. विरार-डहाणू रोड, पनवेल-कर्जत, ऐरोली-कळवा, पाचवी आणि सहावी लाईन बोरिवली-विरार, तिसरी आणि चौथी लाईन कल्याण-बदलापूर आणि रोलिंग स्टॉक खरेदीची कामे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे केली जात आहेत. रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारअंतर्गत ५०:५० खर्च वाटप आधारावर शहरी रेल्वे वाहतूक प्रकल्प राबविण्यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना करण्यात आली आहे.

चर्चगेट-विरार विभागात, चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ४ लाईन, मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान ८ लाईन आणि बोरिवली ते विरार दरम्यान ६ लाईनसाठी मल्टी ट्रॅकिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, सीएसएमटी-पनवेल विभागात, सीएसएमटी-कुर्ला दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम मंजूर करण्यात आले आहे आणि कुर्ला-परेल विभागात काम हाती घेण्यात आले आहे. याशिवाय, सीएसएमटी-कुर्ला-वसई-पनवेल येथे दोन अतिरिक्त मार्ग देखील आहेत.

उपनगरीय रेल्वे क्षमता वाढविण्यासाठी, एमयूटीपी-III आणि IIIA अंतर्गत १९,२९३ कोटी खर्चाच्या १२ डब्यांच्या एकूण २३८ रेक मंजूर करण्यात आले आहेत. जेव्हा जेव्हा मेट्रो अधिकारी (एमएमआरडीए) रेल्वेशी एकात्मतेसाठी संपर्क साधतात तेव्हा रेल्वे या कामाला सक्रियपणे पाठिंबा देते. सध्या, अंधेरी पूर्व आणि घाटकोपर रेल्वे स्थानके मेट्रो स्थानकांशी एकत्रित केली आहेत. रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील १३२ स्थानकांसह भारतीय रेल्वेवरील १३३७ रेल्वे स्थानकांचा समावेश असलेल्या रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी अमृत भारत स्टेशन योजना सुरू केली आहे. आतापर्यंत, या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील १५ स्थानकांचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.