मुंबई: धो-धो कोसळणाऱ्या पावसाने मुंबईची तुंबईची झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुसळधार बरसणाऱ्या पावसाचा फटका मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवेलाही बसलेला दिसून येत आहे. रेल्वेसेवा विस्कळीत झाली असून गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने चाकरमान्यांना केले आहे.
चाकरमान्यांनी नेहमीप्रमाणे, ऑफिसला जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दी केली आहे. पण, सततच्या कोसळणाऱ्या पावसाने विस्कळीत झालेल्या रेल्वेसेवेचा फटका चाकरमान्यासह मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. हर्बर लाईनवरील लोकल २० ते २५ मिनिटे तर मध्य आणि पश्चिम रेल्वे १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
मुंबईला सकाळपासूनच पावसाने चांगलच झोडपलेल पाहायला मिळतेय. दरम्यान, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून मुलुंड टोल नाक्यावर वाहनांच्या २-३ किलोमीटरपर्यंतच्या रांगा दिसून येत आहेत, उपनगरातील अंधेरी सबवेतील पाणि पातळी वाढल्याने सबवे वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर शिवाजी पार्क मैदानासह मुंबईच्या बऱ्याच ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळत आहे.