मुंबई : कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने शुक्रवार, २५ जुलै रोजी वरळी येथे ‘राजा छत्रपती समस्या समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यात ३२२ तक्रारींचे १०० टक्के निवारण करण्यात आले.
परळ आणि भायखळानंतर आता वरळीमध्ये हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ३२२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात पाणीपुरवठा, गटारसफाई, पुनर्विकासातील अडचणी, स्वच्छता, शासकीय दाखले, रेशन कार्ड, स्थानिक पायाभूत सुविधा अशा मूलभूत विषयांचा समावेश होता. शिबिरासाठी निश्चित केलेला वेळ संपल्यानंतरही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे लक्षात घेता मंत्री लोढा यांनी शिबिराला २ तास अधिक वेळ दिला आणि प्रत्येक तक्रारीवर प्रत्यक्ष संवाद साधून त्याचे निराकरण केले.
या शिबिरात महापालिका आणि विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व तक्रारी नोंदवून त्यावर तातडीने कार्यवाहीचे आदेश देण्यात आले. तसेच पुढील दिवसांत मुंबईतील अन्य विभागांमध्येही 'राजा छत्रपती समस्या समाधान शिबिर' राबवण्यात येणार असून अधिकाधिक नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
ही केवळ सेवा नव्हे तर जबाबदारीयावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, "इथे येणाऱ्या तक्रारी म्हणजे जनतेचा सरकारवर असलेला विश्वास आहे. नागरिकांनी वारंवार कार्यालयांच्या फेऱ्या न मारता, एका ठिकाणी त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवणं, हाच खरा लोकाभिमुख प्रशासनाचा हेतू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर समस्या समाधान शिबिरे संपूर्ण मुंबईमध्ये राबवत आहोत. माझ्यासाठी ही केवळ सेवा नव्हे, तर लोकांच्या अडचणी समजून घेण्याची जबाबदारी आहे," असे ते म्हणाले.