मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे वन महोत्सव अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील जेवळी (ता. लोहारा) व कास्ती बुद्रुक येथे २० हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ पालकमंत्री तथा परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आज मोठ्या उत्साहात करण्यात आला.
जेवळी (ता. लोहारा) येथे आयोजित या कार्यक्रमाला माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी दत्तू नवले, जेवळीच्या सरपंच श्रीमती महानंदा पणुरे, उपसरपंच बसवराज कारभारी आदी उपस्थित होते.
जुलै महिन्यात साजरा होत असलेल्या वन महोत्सव निमित्ताने 'म्हाडा'तर्फे राज्यभरात मुंबईसह सर्व विभागीय मंडळांमध्ये वृक्षारोपण मोहिमेला उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकीच्या तत्त्वावर गृहनिर्मिती करणाऱ्या 'म्हाडा'ने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारत दोन लाख झाडांची लागवड करण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुषंगाने राज्यभरात वृक्ष लागवडीला सुरुवात झाली आहे.
म्हाडातर्फे पहिल्या टप्प्यात मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) क्षेत्रात सुमारे ५०,००० झाडे लावण्याचे काम सुरू आहे. मुंबई मंडळातर्फे ५०,००० व कोकण मंडळातर्फे २५,००० झाडे म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या आवारात लावली जात आहेत. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती या विभागीय मंडळांनी प्रत्येकी २५,००० झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे निमोण (ता. चांदवड, जि. नाशिक) येथील जैवविविधता उद्यानात १५,००० झाडे लावण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत उभारण्यात आलेल्या सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी येथील रे नगर गृहनिर्माण प्रकल्प परिसरात पुणे मंडळातर्फे २० हजार वृक्षांचे रोपण करण्यास सुरुवात झाली आहे.