मुंबई : सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही, शांतता आणि अहिंसा या मुल्यांना प्राधान्य द्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. लातूरमध्ये पक्षाचे नेते सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला केलेल्या मारहाणीवर त्यांनी निषेध व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता आणि बंधुत्वाच्या विचारांवरच उभी आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही, शांतता आणि अहिंसा या मुल्यांना प्राधान्य द्या," अशा सूचनाही अजित पवारांनी दिल्या आहेत.