राज्यातील आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाला नोकरीमध्ये वाढीव आरक्षण?

02 Jul 2025 16:02:11

मुंबई : राज्यातील आदिवासी बहुल आठ जिल्ह्यांमध्ये नोकरीत आदिवासी समाजाला वाढीव आरक्षण देण्यासंदर्भात नुकतीच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली व रायगड या जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजासाठी आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यावर चर्चा या बैठकित करण्यात आली.

या प्रस्तावानुसार, आदिवासीबहुल जिल्ह्यातील इतर मागासवर्ग (ओबीसी), एसईबीसी व आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) यांच्या आरक्षणात काही प्रमाणात कपात करून ते आरक्षण आदिवासी समाजाला देण्याचा विचार आहे.

मात्र या प्रस्तावाला शिक्षणमंत्री दादा भुसे व अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला. ओबीसी, एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण देण्याची सूचना त्यांनी केली. यावर आदिवासी विकासमंत्री अशोक उईके आणि इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनीही आपले मत मांडले. सर्वांच्या मतांचा विचार करून सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
Powered By Sangraha 9.0