मुंबई : आमच्या सहकाऱ्यांकडून चूक झाली असून त्यांच्यावर जी कारवाई झाली त्याला आम्ही कोर्टात सामोरे जाऊ, अशी प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. शुक्रवार, १८ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
गुरुवारी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनात झालेल्या हाणामारीनंतर राजकीय वर्तुळात सध्या संतापाचे वातावरण आहे. सगळ्याच नेत्यांकडून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
गोपीचंद पडळकर याबद्दल बोलताना म्हणाले की, "काल अध्यक्ष महोदयांकडे जाऊन मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली होती. आमच्या सहकाऱ्यांकडून चूक झाली असून त्यांना सक्त ताकीद देऊन योग्य ती कारवाई करा, अशी विनंती मी अध्यक्षांना केली होती. त्यामुळे हा विषय त्यांच्या अधिकारातला आहे. रात्री उशिरा त्यांच्यावर एफआयआर दाखल झाला आहे. शेवटी कायदा सर्वश्रेष्ठ आहे. विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती सर्वोच्च आहेत. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर आमचे कुठलेच मत नाही. आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते असून जी कारवाई झाली त्याला आम्ही कोर्टात सामोरे जाऊ," असे ते म्हणाले.
न्यायालयात आमची बाजू मांडणार!
"नितीन देशमुख माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही. सगळे व्हिडिओ काढा. मी जवळपास १०-१५ मिनिटे तिथे आमच्या कार्यकर्त्यांसोबत फोटो काढत उभा होतो. काल माझी लक्षवेधी असल्याने अख्खा दिवस मी सभागृहात होतो. ज्यापद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला त्याचा आम्ही आदर करतो आणि आम्ही न्यायालयात आमची बाजू मांडू," असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....