मुंबई : ५० वर्षात काँग्रेसने आक्रमकांचा इतिहास जनमानसावर बिंबवण्याचे पाप केले. आमचा खरा पौराणिक हिंदू संस्कृतीचा इतिहास उजळवण्यासाठी खुलताबादचे नाव रत्नपूर करावे, अशी मागणी विधानपरिषदेचे आमदार संजय केणेकर यांनी केली आहे. यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संजय केणेकर म्हणाले की, "आमच्या हिंदुस्थानावर सातत्याने आक्रमकांनी राज्य केले. त्यात आदिलशाही, मोगलशाही, निजामशाही, बाबर, इंग्रज या आक्रमकांनी ५० वर्षे आमच्या देशावर राज्य केले. ५० वर्षात काँग्रेसने यांचाच इतिहास जनमानसावर बिंबवण्याचे पाप केले. आमचा खरा पौराणिक हिंदू संस्कृतीचा इतिहास उजळवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात करायचे असे, असे मी आमदार झालो तेव्हाच ठरवले."
"मालोजीराजे भोसले, शहाजीराजे भोसले, हिंदवी स्वराज्यासाठी लढा देणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्याबरोबर लढणाऱ्या मावळ्यांच्या खुणा पुसून टाकण्याचे काम काँग्रेसने केले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेरूळ घराण्यामधील शहाजीराजांच्या गडीची अवस्था सुधारण्याचे काम करणार आहोत. तसेच आक्रमकांच्या इतिहासाने खुलताबाद म्हटले जाणारे शहर आमच्या पौराणिक हिंदू संस्कृतीत रत्नपूर म्हटले जाते. त्यामुळे या खुलताबादचे नाव रत्नपूर व्हावे. औरंगजेबाच्या खुणा पुसण्यासाठी रत्नपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे विशाल स्मारक व्हावे," अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांना पत्र देणार!
"ज्याठिकाणी आलमगीर औरंगजेबाची पाटी आहे तिथेच छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार आहोत. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी देणार आहे," असेही संजय केणेकर यांनी सांगितले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....