मुंबई : परळ स्थानकात जलद गाडीच्या थांब्यासाठी पाठपुरावा करणार असून जनतेच्या समस्यांचे समाधान होईपर्यंत कार्यरत राहू, अशी ग्वाही कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवार, १६ जुलै रोजी दिली. मुंबईतील एफ दक्षिण विभागात भरवण्यात आलेल्या जनता दरबारात ते बोलत होते.
यावेळी आ. कालिदास कोळंबकर, महापालिका एफ दक्षिण विभागातील सहायक आयुक्त महेश पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासनाच्या विविध बारा विभागांसह रेल्वे प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि विविध कॉर्पोरेट्स कार्यालयांमुळे परळ स्थानकात वर्दळ वाढली आहे. तसेच या भागात अनेक मोठी हॉस्पिटल्स असल्याने या स्थानकात जलद गाडीला थांबा मिळावा अशी जनतेची मागणी असून यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करू. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबवून थेट जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना केली होती. या सूचनेला अनुसरूनच या जनता दरबाराचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवून त्यांचे समाधान होईपर्यंत कार्यरत राहून लोकशाही अधिक बळकट करू, असे त्यांनी सांगितले.
यावेळी नागरिकांनी अनधिकृत पार्किंग केलेली बेवारस वाहने, वाहतूक नियंत्रणाचे प्रश्न, पाण्याचा दाब, शिधा वाटपातील समस्या यासह गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाचे प्रश्न मांडले. या जनता दरबारात तीनशेपेक्षा अधिक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या असून त्यातील २०० हून अधिक नागरिकांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिथल्या तिथे समाधान केले. त्याचबरोबर उर्वरित नागरिकांच्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष न करता समस्यांचे निराकरण करावे, असे आदेश मंत्री लोढा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....