मुंबई : उद्धव ठाकरे यांनीच राज ठाकरेंना पक्षाबाहेर जाण्यास प्रवृत्त केले. शिवसेनेच्या अधोगतीला उद्धव ठाकरेच पूर्ण जबाबदार आहे, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी केली आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना नारायण राणे यांनी मंगळवार, १ जुलै रोजी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांच्यावर निशाणा साधला.
खासदार नारायण राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या, असे म्हणून प्रयत्न करत आहेत. मला आठवते, याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता. पक्षाबाहेर जाण्यास त्यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं, आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत?" असा सवाल त्यांनी केला.
जो बूंद से गई वो हौद से नहीं आती
"राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले. पण त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसवले आणि उद्धव ठाकरेंनी सत्ता घालविली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरेच आहेत. मराठी माणसाने आणि हिंदूंनी त्यांना घरी बसवले. गेलेले परत मिळवण्याची धमक आणि क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही. जो बूंद से गई वो हौद से नहीं आती," अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.