
मुंबई : असंसदीय भाषा आणि अयोग्य वर्तनामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवार, दि.१ जुलै रोजी काँग्रेस आमदार नाना पटोले यांचे दिवसभरासाठी निलंबन केले आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली, ज्यामुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाला आणि सभागृह पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
सभागृहात शेतकरी मुद्द्यावर चर्चेदरम्यान नाना पटोले यांनी सत्ताधारी पक्षातील लोणीकर आणि कृषिमंत्र्यांवर शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप केला. पटोले हे आक्षेपार्ह वक्तव्य करत म्हणाले, “लोणीकर आणि कृषिमंत्री सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करतात. त्यांनी जाहीर माफी मागावी. मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही”, असे असंसदीय वक्तव्य त्यांनी केले.
त्यावर विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारची भाषा सभागृहात अपेक्षित नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतरही विरोधकांनी घोषणाबाजी सुरू ठेवली. नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी “माफी मागा, शेतकऱ्यांची माफी मागा!” आणि “ह्या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, शेतकरीविरोधी सरकारचा धिक्कार असो!” अशा घोषणा दिल्या. यामुळे सभागृहात गोंधळ वाढला आणि दुपारी १२ वाजता सभागृह पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही विरोधकांची घोषणाबाजी थांबली नाही. यावेळी पटोले यांनी सभापतींच्या दिशेने धाव घेतली आणि राजदंडाला स्पर्श केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आक्षेप नोंदवत, अध्यक्षांवर धावून जाणे अयोग्य असल्याचे स्पष्ट केले.
अध्यक्षांनी यापूर्वी राजदंडाला स्पर्श केल्याच्या घटनांवर कारवाईचा दाखला देत पटोले यांना इशारा दिला, “पटोले यांनी मला पुढील कारवाईसाठी बाध्य करू नये”, असेही त्यांनी सांगितले. यानंतरही गोंधळ सुरू राहिल्याने अध्यक्षांनी नाना पटोले यांना संपूर्ण दिवसासाठी निलंबित करण्याची घोषणा केली.