मुंबई : काळाची गरज ओळखून शेतीमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. शेतीसाठी कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रद्यान वापरत उत्पादन वाढवून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करण्यावर शासनाचा भर आहे, असे प्रतिपादन कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.
मंगळवार, १ जुलै रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह येथे स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिनानिमत्ताने 'महाकृषी ए. आय. धोरण' या विषयावर कृषी विभागातर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह उपस्थित होते.
मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, "मानव विरहित शेती, ‘ए आय’ आधारित हवामानाचे अंदाज आणि हवामान अनुकूल पीक पद्धती घेणे, काटेकोर सिंचन पद्धती विकसित करणे, जिल्हास्तरावर शेती प्रयोगशाळा उभारणे, शेतीसाठी मोबाईल व्हॅनची सोय करणे, पीक साठवणूक सुविधा वाढवणे, शेतीसाठी कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रद्यान वापरून उत्पादन वाढवून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करण्यावर शासनाचा भर आहे."
शेतमालाची गुणवत्ता कायम राखणे मोठे आव्हान
"शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना शासन राबवत आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जावी यासाठी शासन महाकृषी ए. आय. धोरण राबवत आहे. काळाची गरज ओळखून शेतीमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. शेतीतील उत्पादन वाढले आहे. मात्र, शेतमालाची गुणवत्ता कायम राखणे हे मोठे आव्हान आहे. फक्त भरमसाठ खत वापरणे हा जास्त उत्पादन घेण्याचा मार्ग नाही. पिकाला आवश्यक तीच खते, योग्य पाण्याची मात्रा देणेसुद्धा आवश्यक आहे. कृषीमध्ये अनेक बदल अपेक्षित आहेत. शेतकऱ्यांना काळानुरुप प्रशिक्षण देणे, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे, शेतकरी केंद्रित आणि शाश्वत विकासच्या योजना राबवणे यावर शासन भर देत आहे. शेतमालाला योग्य हमी भाव मिळवून देणे, हेच शासनाचे धोरण आहे," असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय : कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
यावेळी बोलताना कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले की, "शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांना शेती नुकसानीसाठी सरसकट मदत देण्यात येत आहे. महाकृषी ए. आय. धोरणाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. शेतीमध्ये आज अनेक आव्हाने आहेत. शेतमालाला योग्य बाजारभाव आणि बाजारपेठांची योग्य माहिती असणे आवश्यक आहे," असे त्यांनी सांगितले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....