बंगळुरू : (Bengaluru Stampede) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयानंतर चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आता एक नवीन अपडेट समोर येत आहे. डीसीपी एमएन करिबासवन गौडा यांनी कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारला पत्र लिहून लोकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. विधानसौधा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावरही आक्षेप घेतला होता.
डीसीपी गौडा यांनी ४ जून रोजी कर्नाटकच्या कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाच्या सचिवांना पत्र लिहून १० महत्त्वाचे मुद्दे मांडले होते. ज्यात सुरक्षेच्या मुद्दाही उपस्थित केला होता. गौडा यांनी डीपीएआरच्या सचिल जी. सत्यवती यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, विधानसौधा येथे लाखो चाहते येण्याची शक्यता आहे. तिथे सुरक्षा कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे योग्य सुरक्षा व्यवस्था राखणे कठीण होईल." त्यामुळे अतिरिक्त पोलिस दल बोलवण्याची गरज आहे. तसेच सार्वजनिक प्रवेश पास रद्द करण्याची शिफारसही डीसीपींनी पत्रात केली होती. तसेच या पत्रात सीसीटीव्ही कव्हरेज आणि परिसराच्या संवेदनशीलतेबद्दलही चिंता व्यक्त केली होती.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या सर्व सांगितल्यानंतरही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चेंगराचेंगरीच्या काही तास आधी, जी. सत्यवती यांनी चाहत्यांना विधानसौधाऐवजी स्टेडियममध्ये जाण्याचे आवाहन केले. माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, अंतिम सामन्याच्या २४ तासांपेक्षा कमी कालावधीत आरसीबीच्या विजयाचा उत्सव कोणत्याही सुरक्षा प्रोटोकॉलशिवाय पार पडला.
भाजपकडून प्रश्न उपस्थित
कर्नाटकमधील विरोधी पक्षाचे नेते आर. अशोक यांनी सिद्धरामय्या सरकारवर निशाणा साधत टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, विधानसभा पोलिसांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून कळवले होते की, हा कार्यक्रम खूप घाईगडबडीमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यांनी असेही म्हटले आहे की "जर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यात सत्तासंघर्ष सुरु नसता, तर त्या मुलांना आपला जीव गमवावा लागला नसता."