महाराष्ट्राच्या विविध भागांत मानव- वन्यजीव संघर्ष टिपेला पोहोचलेला आहे. या समस्येवरील उपाय, भावना आणि आदर्शवादातून नव्हे, तर वैज्ञानिक मार्गाने कसे शोधता येईल, याविषयी विवेचन करणारा हा लेख...
सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वी चीनमध्ये एक महत्त्वाकांक्षी आणि अद्भुत प्रयोग केला गेला. सरकारला देशाचे कृषी उत्पादन वाढवायचे होते. त्यासाठी अनेक धोरणे आखली आणि राबविली गेली. त्यातले एक होते चिमण्यांचा नायनाट. चिमण्या धान्य खातात. कणसात दाणे तयार होऊ लागले की, मोठ्या संख्येने शेतावर जमतात. त्यांना हाकलण्यासाठी अख्खा दिवस बसावे लागते. त्यापेक्षा चिमण्याच मारून टाकल्या तर? झाले, सरकारने लोकांना आदेश दिले. जिथे दिसतील तिथे चिमण्या मारा! ही जातच नाहीशी करून टाका म्हणजे शेती उत्पादन वाढेल. काही वर्षे लोकांनी चिमण्या आणि इतर पक्षी भसाभस मारले. याचा परिणाम मात्र एकदम उलटा झाला. कीटक वाढले. त्यांना खाणारे पक्षी नसल्यामुळे त्यांच्यावर कसलेच नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे ओळींनी तीन वर्षे मोठा दुष्काळ पडला. मग चीनने अडीच लाख चिमण्या आयात करून देशभर सोडल्या. याच्याबरोबर उलट प्रयोग भारतात झाला आणि होत आहे. या प्रयोगामुळे शेतकर्यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आपण वेळेवर जागे झालो नाही, तर 1959 सालच्या चीनच्या दुष्काळासारखीच परिस्थिती आपल्यावर ओढवेल. पण, कारण मात्र चीनच्या बरोबर उलट असेल.
भारतात विसाव्या शतकाच्या मध्याला जंगले आणि वन्य प्राण्यांची अपरिमित हानी झाली. अनेक जाती नामशेष होण्याच्या कड्यावर आल्या. त्यानंतर 70च्या दशकात वन्यजीव संरक्षणाचा कायदा आला. त्यात सुधारणा होत आणि अंमलबजावणी कडक होत गेली. त्यामुळे आधी या जाती नामशेष होण्यापासून वाचल्या, मग वाढू लागल्या आणि मग पसरूही लागल्या. शेतांमध्ये घुसून पिके खाऊन टाकू लागल्या. पण, त्यांची संख्या वाढली हे याचे एक कारण झाले. दुसरे त्याहून महत्त्वाचे कारण म्हणजे आता कित्येक पिढ्या शिकारीला तोंड द्यावेच न लागल्यामुळे त्यांना माणसांप्रति असलेली भीती वेगाने नाहीशी होत चालली आहे. शेतावर दिवस-रात्र बसून राखण पूर्वीही करावी लागत होती. पण, जोवर माणसाची भीती होती, तोवर राखण करणे सोपे होते. जरा हुर्र केल्यावर ते पळून जात होते. इथे माणूस आहे, एवढी जाणीव त्यांना दूर ठेवायला पुरेशी होती. आता तशी परिस्थिती राहिली नाही. फटाके फोडले तरी थोडेसेच दूर पळतील, परत येतील. अनेक भागांत ही समस्या इतकी गंभीर झाली आहे की, अनेकांनी शेती सोडूनच दिली आहे आणि जे कसतात त्यांच्या हातात फार कमी पीक येते. पण, वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान नक्की किती आहे, याची माहिती कुठेही उपलब्ध नाही. कारण, कृषी विभाग म्हणतो, ही समस्या वन खात्याची आहे, आमची नाही! वन खात्याला शेतीच्या उत्पादनाशी काय देणे घेणे? नुकसान भरपाई द्यावी असे कागदोपत्री असले, तरी नुकसान कसे मोजायचे इथपासून कुणालाच काहीच माहिती नाही. त्यामुळे भरपाई कागदावरच राहते. शेतकर्याच्या हातात काहीच पडत नाही.
बरं, फक्त पिकं खाणारे प्राणी एवढीच समस्या नाही. रात्र रात्र जागून पिकाची राखण शेतकरी करतोच. पण, आता वाघ, बिबटे, अस्वले यांचे माणसावर हल्ले होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आता स्वतःच्याच शेतावर जायची भीती वाटू लागली, तर नवल नाही. राखण तरी कशी करणार?
आपण निसर्गाचे संतुलन हा शब्द वापरतो. तेव्हा त्यात दोन्ही टोकाच्या भूमिका टाळणे अभिप्रेत आहे. संतुलन हे सुवर्णमध्य साधण्यात आहे. सरसकट शिकार करून प्राणी जाती संपवणे, हे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे, हे चीनमधल्या प्रयोगांनी दाखवले आहे. आता शिकार पूर्णपणे बंद केली, तरी समतोल ढासळतो हे भारत देश जगाला दाखवून देत आहे. माणूस मूळचा शिकारी प्राणी आहे आणि माणसाने केलेली शिकार हा काही लाख वर्षांपासून निसर्ग संतुलनाचा एक भाग बनला आहे. माणसाच्या समाजरचनेच्या विकासाबरोबर कामाच्या वाटण्या झाल्या. त्यात काही समाज प्रामुख्याने शिकारी राहिले. काहींनी शिकार सोडली. जे शिकारी समाज होते, त्यांची शिकारीची काही पारंपरिक तत्त्वे होती. शिकार कधी कुठे करावी, कधी करू नये, कोणते प्राणी मारावेत, कुठले नाही याचे नियम होते. गाभण मादी मारली, तर पाप लागते यासारख्या समजुती होत्या. त्यामुळे शिकारीवर आपोआप मर्यादा राहत असे. शिकारींमुळे माणसाची भीती राहत असल्यामुळे प्राणी सर्रास शेतीत किंवा वस्तीत घुसण्याचे प्रमाण अगदी कमी होते. त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष अगदी कमी होता. ज्या ज्या वेळेस शिकारीचा आणि जंगलतोडीचा अतिरेक झाला, तेव्हाही संघर्ष वाढला आणि आता शिकार थांबवल्यामुळेही गंभीर समस्या निर्माण होत आहे.
पण, म्हणून एकदम सरसकट शिकारीला परवानगी देणे हा त्यावर उपाय नाही. कारण, परत लंबक दुसर्या टोकाला जाऊ शकतो. मधल्या काही दशकांत पारंपरिक शिकारी समाजांचा आणि त्यांच्या संस्कृतींचा र्हास झाला आहे. तेव्हा त्यांच्यावर परत विसंबता येणार नाही. सर्वांच्या हाती बंदुका आल्या, तर आधीच धर्म, जात आणि इतर प्रकारे विभागलेल्या समाजात काय घडेल, हे सांगता येत नाही. तरी विशिष्ट प्रकारे नियंत्रण असलेली आणि राबवायला सोपी, भ्रष्टाचार मुक्त, अपघात रोखणारी अशी काही शिकार व्यवस्था निर्माण करता येईल का, याचा विचार केला पाहिजे. हे काम संशोधकांचे आहे. आजवर वन्यजीव संशोधकांनी या प्रश्नाकडे लक्षच दिले नव्हते. पण, आता यावर काही काम सुरू झाले आहे. योग्य आणि नियंत्रित पद्धतीने शिकार परत आणण्याखेरीज या समस्येवर दीर्घकालीन प्रभावी असा दुसरा मार्ग नाही. नुकसान भरपाई आवश्यक आहे. पण, तो अंतिम उपाय नाही. प्राण्याचे निर्बीजीकरण करणे इत्यादी उपाय बोलायला आणि आम्ही काहीतरी करतो आहोत हे दाखवायला ठीक असले, तरी त्यांनी समस्या सुटल्याचे जगात एकही उदाहरण नाही.
ब्रिटिश आणि संस्थानिकांच्या काळात झालेली अनियंत्रित शिकार आणि त्यानंतर झालेली संपूर्ण बंदी हे दोन्ही वेगळ्या प्रकारे निसर्गाचे संतुलन बिघडवणारे आहेत. आता अभ्यास, संशोधन आणि योजनापूर्वक संतुलनाचा विचार करण्याखेरीज गत्यंतर नाही. फार उशीर होण्यापूर्वीच वन्यजीवप्रेमींनी त्यांची मानसिकता बदलायला हवी. उपाय, भावना आणि आदर्शवादात नाही, तर विज्ञानात शोधायला हवा.
डॉ. मिलिंद वाटवे
(लेखक ज्येष्ठ संशोधक आहेत.)