फळांचा गर खाल्ल्यानंतर धनेशाने फेकलेल्या बिया गोळा करून त्याद्वारे वनीकरणाचा अनोखा प्रयोग कोकणात राबविला जात आहे. या प्रयोगाची माहिती देणारा हा लेख...
महाधनेश (Great Hornbill) च्या परिचालनात महत्त्वाचा वाटा आहे, तो फळझाडांवरील अवलंबित्वामुळे. महाधनेश बीजप्रसारक म्हणून जैवसाखळीचा एक अत्यावश्यक दुवा मानला जातो. त्यामुळे महाधनेश पक्ष्यांच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन हे केवळ एका पक्ष्याच्या संवर्धनापुरते मर्यादित न राहता, ते संपूर्ण परिसंस्थेच्या पुनरुज्जीवनाचा पाया ठरू शकते. धनेश प्रजातींच्या अधिवास पुनर्निर्मितीमधील सर्वांत महत्त्वाचा टप्पा हा धनेश पक्ष्यांना घरटी करण्यासाठी आणि खाद्यासाठी आवश्यक असणार्या वृक्ष प्रजातींची माहिती गोळा करणे. यासाठी धनेशांच्या अनोख्या आणि विलक्षण असणार्या प्रजोत्पादन प्रक्रियेचा उपयोग होतो.
विणीचा हंगाम आला की, साधारण डिसेंबर-जानेवारी महिन्यांत धनेशाच्या जोडीचे मिलन होऊन मादी बेहडा, आंबा, सातवीन, शेवर, चांदफळ अशा आकाराने मोठ्या वृक्षांची ढोली शोधते. धनेश पक्षी हे एकपत्नी व्रत पाळणारे आहेत. त्याचबरोबर अनेकदा एकाच झाडाची ढोली ते विणीसाठी वर्षानुवर्षे वापरत असतात. एकदा का ढोली निवडून झाली की, मादी ढोलीत प्रवेश करते आणि आपली विष्ठा, फळांचा गर, काही प्रजातींमध्ये माती यांचा वापर करून ढोलीचे तोंड फक्त आपली चोच बाहेर येईल, एवढी जागा ठेऊन बंद करून घेते आणि त्यात अंडी देते. एक प्रकारची कैद स्वीकारून अंड्यांना आणि पिल्लांना यामुळे संरक्षण प्राप्त होते. सर्वसाधारणपणे पिल्ले अंड्यातून बाहेर येऊन उडण्यायोग्य होण्यासाठी तीन महिने लागतात. या सर्व कालावधीमध्ये नर जंगलातून वेगवेगळ्या ठिकाणांहून अनेक प्रजातींची फळे आणून मादीला आणि पिल्लांना भरवतो. यासाठी नराच्या मानेखाली एक स्नायूंची पिशवी असते आणि तिचा वापर करून गळ्यातून आणलेली फळे बाहेर काढून तो मादीला भरवतो. मादी अनेकदा ही फळे स्वीकारून त्यांचा गर, रस खाऊन त्यांच्या बिया ढोलीच्या बाहेर उडवते. त्याचबरोबर तिच्या विष्ठेद्वारादेखील अनेक फळांच्या बिया ढोलीखाली पडत राहतात. या बिया झाडाखाली जाळी बसवून गोळा केल्या जातात. बर्याच वेळेला मोठ्या झाडाखाली पडणार्या या बिया उंदीर, झुरळे, मुंग्या यांच्या भक्षस्थानी पडत असतात. त्याचबरोबर सावली, पाणी आणि पुरेसे पोषण न मिळाल्यामुळे यातील अनेक रोपे रुजून कालांतराने मारून जातात. त्यामुळे खाद्यवृक्ष ओळखणे आणि त्यांचे संगोपन करणे यासाठी ‘नेटिंग पद्धती’ अतिशय उपयुक्त ठरते.
किड्या-मुंग्यांसाठी त्यांचा वाटा ठेऊन ५०-६० टक्के बिया तीन ते चार दिवसांच्या कालावधीने धनेश मित्रांच्या मदतीने घरट्याला कोणत्याही पद्धतीने उपद्रव होणार नाही याची काळजी घेत, गोळा केल्या जातात. या बियांमध्ये मुख्यतः ‘फिग’ कुळातील अनेक बीजांचा बारीक चुरा आढळतो. नंतर या बिया रोपवाटिकेत आणून ट्रे आणि वाफ्यांच्या साहाय्याने रुजवल्या जातात. उगवण क्षमता वाढल्यामुळे यातून अनेक खाद्य वृक्षांची रोपे सहजतेने तयार होतात. ही रोपे दोन ते तीन वर्षे रोपवाटिकेमध्ये वाढवली जातात.
अधिवास पुनर्निर्मितीचा दुसरा टप्पा म्हणजे धनेशांच्या खाद्य वृक्षांची लागवड. धनेश पक्षी मिलन काळात साधारण चार ते पाच किमी आणि इतर वेळी साधारण दहा ते १२ किमी खाद्य शोधण्यासाठी भ्रमंती करतात असा अभ्यास आहे. त्यामुळे ढोली असणार्या झाडाच्या साधारण पाच ते दहा किमी परिसरात जिथे खाद्य वृक्षांची घनता कमी आहे आणि अधिवास विखंडित झाला आहे, अशा जागा पुनर्निर्मितीसाठी निवडल्या जातात. यातील बहुतांश जागा या खासगी मालकीच्या असल्यामुळे स्थानिक लोकांचा या संवर्धन कार्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग फार मोलाचा ठरतो. त्याचबरोबर डॉ. रोहित नानिवडेकर आणि सहकार्यांनी प्रकाशित केलेले कोकणातील स्थानिक वृक्षवैविध्याचे बदलत्या स्वरूपाविषयीचे संशोधन हे या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी मानले जाते. या संशोधनानुसार गेल्या काही दशकांमध्ये कोकणातील सदाहरित वने आणि वृक्ष प्रजाती यांची तोड होऊन त्यांची जागा आता ऐन, किंजळ अशा पानझडी वृक्षांच्या वनाने घेतलेली दिसत आहे. परंतु, २०० ते ३०० वर्षे जुन्या असणार्या आणि लोकांनी राखून ठेवलेली देवरायामध्ये मात्र अनेक दुर्मीळ सदाहरित प्रजाती सहजतेने दिसून येतात. त्यामुळे गावातील देवराई आणि तिथल्या प्रजाती या संदर्भ मानून त्याप्रमाणे लागवडी योग्य झाडांची निवड करण्यात येते. जागा मालकांशी दीर्घ मुदतीचा करार करून मग अशा जागी खाद्य वृक्षांची लागवड केली जाते. अशा प्रकारचे अधिवास पुनर्निर्मिती प्रकल्प कुडाळ, कुडासे आणि मोरडे गावात सुरू करण्यात आले आहेत. येत्या काळात चिपळूण आणि गुहागर इथेदेखील असे प्रकल्प कार्यान्वित होतील.
धनेश अधिवास पुनर्निर्मितीमधील साधायचा महत्त्वाचा अडथळा म्हणजे स्थानिक जमीन मालकांचा या लागवडीमध्ये सहभाग असणे आणि या खाद्य वृक्षांच्या रोपांची उपलब्धता. दुर्मीळ होत चाललेले हे वृक्ष शोधणे, त्यांच्या बिया गोळा करणे आणि त्या नर्सरीमध्ये वाढवणे, यासाठी अनेक संस्था पुढे येत आहेत. ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’, ‘वेस्टर्न घाट नर्सरी’ यांच्या माध्यमातून ‘एनसीएफ’ संस्थेच्या सहकार्यातून अशा रोपवाटिका रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथे कार्यरत झाल्या आहेत. दोन्ही ठिकाणी मिळून वर्षाला साधारण दहा ते १२ हजार रोपे निर्मिती करण्यात येत आहेत. धनेश पक्ष्यांच्या ढोल्या असणार्या वृक्षांच्या खाली जाळी बसवून खाद्य वृक्षांची माहिती आणि बिया गोळा करण्याचे कार्य ‘धनेश मित्र निसर्ग मंडळ’ अनेक संस्था आणि धनेश मित्रांच्या सहभागातून केले जात आहे. तर कोकणातील दोन्ही जिल्ह्यात विविध ठिकाणी अधिवास पुनर्निर्मितीसाठी डॉ. रोहित नानिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खाद्यवृक्ष लागवड सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमात मिलिंद पाटील, अभिजित पाटील, प्रवीण देसाई यांसारख्या स्थानिक लोकांचा वाढता सहभाग आशेचा किरण निर्माण करत आहे. येत्या काळात वन विभाग, स्थानिक महाविद्यालये आणि पर्यावरणप्रेमी संस्था आणि व्यक्तींना बरोबर घेतल्यामुळे रोपे निर्मितीची प्रक्रिया वेगवान होईल अशी अपेक्षा आहे. दिवसाकाठी होणारी वृक्षतोड थांबवणे, अधिवास संरक्षित करणे आणि धनेश पक्ष्यांच्या विणीवर लक्ष ठेवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच धनेश पक्ष्यांच्या पुढच्या पिढीला सुरक्षित अधिवास निर्माण करणे हे अनिवार्य आहे. अन्यथा सरासरी ५० वर्षे जगणारा, आपले संपूर्ण आयुष्य जंगल निर्मितीला वाहून घेणारा सह्याद्रीच्या जंगलांचा निर्माता काळाच्या ओघात कधी नष्ट होईल हेही कळणार नाही आणि मग सह्याद्रीच्या सदाहरित जंगलांना लागलेली उतरती कळा स्वीकाराण्याव्यतिरिक्त आपल्या हातात काहीच उरणार नाही.
प्रताीक मोरे
(लेखक कोकणात धनेश पक्षी संवर्धनाचे काम करत असून ‘आययुसीएन’च्या ‘हॉर्नबिल स्पेशालिस्ट ग्रुप’चे सदस्य आहेत.)