कोकण किनाऱ्यांचे भविष्य काय

    05-Jun-2025
Total Views | 11
kokan Biodiversity

कोकण किनारपट्टीवरील जैवविविधतेचे मापन करणारा ‘प्रोजेट कोस्टल २.०’ हा प्रकल्प नुकताच पार पडला. या प्रकल्पाच्या माध्यमातून उलगडलेल्या कोकणातील किनारी जैवविविधता आणि किनारी प्रदेशात राहणार्‍या समुदायांच्या सहसंबंधाविषयी ऊहापोह करणारा लेख...


कोकण नाव उच्चारताच निळ्याशार सागर, सोनेरी वाळू आणि डोलणारी नारळ-पोफळीची झाडं डोळ्यांसमोर साकारतात. मुंबईपासून गोव्यापर्यंत हिरवाईने नटलेला हा प्रदेश सह्याद्रीच्या रांगांपासून अरबी समुद्रापर्यंत पसरलेला असून, समृद्ध सागरी जैवविविधतेने नटलेला निसर्गप्रेमींसाठी एक अनमोल खजिना आहे. सुगंधी हापूस आंबा आणि गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत ताजी फडफडीत मासळी यांसारख्या पारंपरिक कोकणी चवींमुळे येथील स्थानिक खाद्यसंस्कृतीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. सांस्कृतिक समृद्धतेने नटलेल्या कोकणात सागरी जैवविविधतेचे अनमोल भांडार दडलेले आहे. किनार्‍याच्या निळ्याशार लाटांमध्ये अद्भुत जीवसृष्टी नांदते, तर खोल समुद्राच्या गर्भात नैसर्गिक संपत्तीचा अपार साठा आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारे, निसर्गरम्य खाड्या, खडकाळ किनारे आणि हिरवीगार खारफुटीची जंगले सागरी जीवांसाठी आदर्श अधिवास ठरतात. असंख्य माशांच्या जाती, समुद्री कासव, दुर्मीळ समुद्री जीव, शिंपले, प्रवाळ, समुद्री शेवाळ आणि सूक्ष्म जीवांनी हा सागर समृद्ध आहे. स्थानिक मच्छीमार जीवन आणि पारंपरिक शेतीही या परिसंस्थेशी अतूट जोडलेली आहे.

सागरी परिसंस्थेवरील वाढता धोका


गेल्या काही दशकांत कोकणातील समुद्रकिनार्‍यांवर पर्यटन व्यवसाय झपाट्याने वाढला असून रिसॉर्ट्स, हॉटेल्स, पार्किंगची जागा, खाण्याचे स्टॉल्स आणि इतर सुविधा उभारण्यासाठी नैसर्गिक खडकाळ आणि वाळूचे किनारे सपाट केले जात आहेत. या विकासामुळे अनेक दुर्मीळ समुद्री प्रजातींचे अधिवास नष्ट होत आहेत. त्यासोबतच प्रदूषण हादेखील एक मोठा प्रश्न बनला आहे. किनारी गावे आणि शहरांमधून सोडण्यात येणारे सांडपाणी, तेल प्रदूषण, प्लास्टिकचा बेसुमार वापर आणि किनार्‍यांवर फेकला किंवा जाळला जाणारा कचरा यांमुळे सागरी परिसंस्था गंभीरपणे बिघडत आहे. अति मासेमारी, विशेषतः समुद्राच्या तळाशी जाळे टाकण्याच्या (बॉटम ट्रॉलिंग) पद्धतीमुळे सागरी अन्नसाखळीही विस्कळीत होत आहे. त्यात भर म्हणजे जागतिक हवामान बदल, स्थानिक समुदाय व पर्यटकांची पर्यावरणाबद्दलची अनास्था यामुळे कोकणातील निसर्गसंपत्तीवर मोठा धोका निर्माण झाला आहे.
‘प्रोजेट कोस्टल २.०’

२०२३-२४ या कालावधीत ‘इकोलॉजिकल सोसायटी, पुणे’ने राबवलेला ‘प्रोजेट कोस्टल २.०’ हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील २२ किनार्‍यांवर समुद्री जैवविविधतेचा सखोल अभ्यास आणि पर्यटनाच्या परिणामांचे मूल्यांकन करण्यात आले. या अभ्यासात ५०० हून अधिक समुद्री प्रजातींची नोंद झाली असून यांतील अनेक प्रजाती महाराष्ट्रात प्रथमच आढळल्या. या प्रकल्पामुळे कोकणातील जैवविविधतेची स्थिती नव्याने उलगडली. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शास्त्रीय संशोधनासोबतच स्थानिक समाजाचा सक्रिय सहभाग. मच्छीमार, शेतकरी, रिसॉर्ट्स व होम-स्टे चालक, महिला मंडळे, शाळकरी विद्यार्थी आणि पर्यटक अशा विविध घटकांना सहभागी करून ‘संवेदनशील समुद्रकिनारे’ या संकल्पनेला सामाजिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व सहभागातून केवळ नोंदवही तयार करण्यापलीकडे जाऊन शाश्वत पर्यटन आणि सामूहिक सहभागाच्या माध्यमातून जैवविविधतेचे संरक्षण साध्य करणे, हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट ठरले.

आपण काय करू शकतो?


जबाबदारीने पर्यटन करा : प्लास्टिक टाळा, स्थानिक संस्कृतीचा सन्मान करा आणि कचरा समुद्रकिनारी टाकू नका.
किनारपट्टी स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा : स्थानिक गावांमध्ये होणार्‍या किनारा स्वच्छता उपक्रमांना हातभार लावा.
संरक्षण उपक्रमांना साथ द्या : आर्थिक मदत, स्वयंसेवक म्हणून सहभाग किंवा इतर माध्यमातून सहकार्य करा.
हक्कांसाठी आवाज उठवा : सरकारी धोरणांमध्ये समुद्र पर्यावरण रक्षणाचा समावेश करण्यासाठी पाठपुरावा करा.
स्थानीय बाजारपेठा आणि होम-स्टेना प्राधान्य द्या : त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थाही मजबूत होते.
प्रशासन व सामाजिक माध्यमांद्वारे आपल्या चिंता व्यक्त करा : ठिकठिकाणी शय असेल, तिथे पर्यावरणविषयक जनजागृती घडवा.

समाजाचा सहभाग


‘प्रोजेट कोस्टल २.०’च्या अनुभवांवर आधारित काही महत्त्वाच्या शिफारसी पुढीलप्रमाणे :
शैक्षणिक उपक्रम आणि जनजागृती : स्थानिक शाळांमध्ये समुद्र परिसंस्थांवर आधारित शिक्षण देणे, माहिती पुस्तिका आणि माहितीपट तयार करणे.

संरक्षण आधारित पर्यटन (कॉन्झर्वेशन टुरिझम) : किनार्‍यांवर पर्यटकांनी ठराविक मार्गाने फिरणे, प्लास्टिक प्रतिबंध, जैवविविधतेविषयी माहिती फलक लावणे आणि स्थानिक मार्गदर्शक, निसर्ग पथदर्शने आणि शाश्वत गृहवसती (होम-स्टे) यांद्वारे टिकाऊ पर्यटन वाढवणे.

धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वे : राज्य व केंद्र सरकारला सल्ला देण्यासाठी जैवविविधतेच्या संवेदनशील क्षेत्रांची शिफारस करणे आणि पर्यावरणपूरक पर्यटन धोरण मांडणे.

स्थानिक सहभाग : स्थानिकांना नोकर्‍यांच्या संधी मिळाव्यात, यासाठी समुद्रवाचन, बोट सफरी, आणि शाश्वत होम-स्टे मॉडेल्स राबवणे. मासेमार, हॉटेल चालक, स्वयंसेवी संस्था, स्थानिक नागरिक आणि पर्यटक यांना प्रशिक्षण व माहिती देऊन रक्षणाच्या उपक्रमात सहभागी करणे.

स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन : किनार्‍यांवरील कचर्‍याची वर्गवारी, प्लास्टिक पुनर्वापर, ‘घोस्ट नेट्स’ (टाकलेली जाळी) गोळा करून पुनर्वापरासाठी पाठवणे.

भविष्यासाठी जबाबदारी


कोकणचा समुद्र केवळ एक पर्यटनस्थळ नाही, तर निसर्गाने बहाल केलेला एक अनमोल ठेवा आहे.
वाढत्या मानवी हस्तक्षेपाने ही परिसंस्था संकटात सापडली असली, तरी योग्य नियोजन, शाश्वत विकास आणि जबाबदारीने केलेले पर्यटन यांमुळे ही जैवविविधता आणि समृद्धता पुढील पिढ्यांसाठी जपता येईल.
स्थानिक समुदाय, प्रशासन आणि पर्यटक यांनी एकत्र येऊन हा सागरी ठेवा टिकवला, तरच कोकणची नैसर्गिक समृद्धी आणि सागरी सौंदर्य अखंड राहील.
डॉ. सायली नेरुरकर
(लेखिका सागरी जीवशास्त्रज्ञ आहेत.)
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121