...तर मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवलं? खासदार नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

    30-Jun-2025
Total Views |


मुंबई : उद्धव ठाकरे याचे मराठीचे प्रेम बेगडी आहे. मराठीबद्दल इतकेच प्रेम होते तर मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवले? असा सवाल खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. राज्य सरकारने हिंदी सक्तीसंदर्भातील दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंकडून विजयी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. यावरून नारायण राणेंनी त्यांचे कान टोचले.





खासदार नारायण राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरे याचे मराठीचे प्रेम बेगडी, राजकीय आणि स्वार्थापोटी आहे. मुख्यमंत्री असताना हे प्रेम कुठे गेले होते? मराठी माणसाच्या नोकरी, धंदा आणि पोटाच्या प्रश्नासाठी काय केले? मराठीच्या नावावर केवळ आपले कल्याण करून घेतले. पण मराठी माणसाच्या आणि मराठी भाषिकांच्या कल्याणाचे काय?" असा सवाल त्यांनी केला.


ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठी माणसाची टक्केवारी १८ टक्क्यांपर्यंत खाली आली याला जबाबदार कोण? मराठीबद्दल इतकेच प्रेम होते तर मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवले? सरकारने दोन जीआर रद्द केले म्हणून विजयी मेळावा काढणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असेच म्हणावे लागेल," अशी टीकाही नारायण राणे यांनी केली आहे.