स्वच्छ, सुरक्षित आणि भक्तीमय वारी बनवा! राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतला आषाढी वारीचा आढावा
18-Jun-2025
Total Views |
मुंबई : वारी काळात सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून ही वारी 'स्वच्छ वारी, सुरक्षित वारी, भक्तीमय वारी' बनवावी, असे आवाहन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले. बुधवार, १८ जून रोजी निर्मल भवन येथे आयोजित आषाढी वारीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
या बैठकीला संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन उपस्थित होते. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, "वारकऱ्यांसाठी वारी मार्गात कायमस्वरूपी सोई सुविधा उपलब्ध कराव्या. आजपासून सुरू होणाऱ्या आषाढी वारीत लाखो वारकरी सहभागी होणार आहेत. त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छता आणि आरोग्य यासह विविध सोई सुविधांसाठी प्रशासनाने दक्ष राहावे," अशा सूचना त्यांनी दिल्या.
"वारकऱ्यांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी आणि पुरेसे टँकर उपलब्ध राहावे. तसेच सर्व पाण्याचे स्रोत निर्जंतुकीकरण करण्यात यावे. महिलांसाठी हिरकणी कक्षांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा. पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना यासंदर्भात सूचना द्याव्यात. वारी काळात सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून ही वारी 'स्वच्छ वारी, सुरक्षित वारी, भक्तीमय वारी' बनवावी," असे आवाहन त्यांनी केले.
वारी मार्गावर आरोग्य सेवांचे बळकटीकरण करा!
"वारी मार्गावर आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यात यावे, औषधसाठा मुबलक ठेवावा आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत. काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाने सतर्क राहून योग्य तपासणी आणि खबरदारी घ्यावी. तसेच ऊर्जा विभागाने वीजवाहित तारा आणि वायरचे व्यवस्थापन योग्यरित्या करावे, अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी. यावर्षी अधिक पावसाची शक्यता असल्याने जलरोधक मंडप, जर्मन हँगरची व्यवस्था केली जावी. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी पोलीस आणि प्रशासनाने समन्वयाने कार्य करावे. मोबाईल नेटवर्क व्यवस्थित राहावे यासाठी संबंधित कंपन्यांना सूचना पाठविण्यात याव्या. वारकरी हे आपल्या श्रद्धेची शिदोरी घेऊन पंढरपूरकडे चालत येतात. त्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू देऊ नये, हीच आपली जबाबदारी आहे," अशाही सूचना त्यांनी दिल्या.