विदर्भात उबाठा गटाला धक्का! माजी आमदार शिवसेनेत दाखल

11 Jun 2025 15:15:00



मुंबई : अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे उबाठा पक्षाचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मंगळवार, १० जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी उबाठाचे उपमहानगरप्रमुख आणि नगरसेवक सुनील राऊत, उबाठा गटाचे बडनेरा युवासेना जिल्हाप्रमुख श्याम धाने पाटील, उपजिल्हाप्रमुख पवन दळवी, तालुका प्रमुख राहुल लांजेवर, निलेश तिवारी, संतोष मनोहर, निलेश पारवे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

हे वाचलंत का? - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे संजय शिरसाटांच्या भेटीला! भेटीचं कारण काय?

याप्रसंगी जलसंधारण मंत्री संजय राठोड, विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, आमदार दिपक केसरकर, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, कॅप्टन अभिजित अडसूळ, शिवसेना सचिव राम रेपाळे, उपनेत्या कला शिंदे, शिवसेना प्रवक्ते राहूल लोंढे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "काँग्रेस काळातील घोटाळ्यांनी बेजार झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले. २०१४ पूर्वी अकराव्या क्रमांकावर असणाऱ्या भारताने नुकतीच चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. लवकरच भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. मोदीजींच्या नेतृत्वात भारत आर्थिक महासत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे."

"२०१४ साली नरेंद्र मोदीजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली, त्यापूर्वी देशात काँग्रेसच्या घोटाळ्यांची मालिका सुरु होती. चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, टूजी स्पेक्ट्रम घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळ्यांनी अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. मात्र, मागील ११ वर्षांत मोदींजींवर एकही भ्रष्टाचाराचा डाग नाही, ही वस्तुस्थिती आहे. याकाळात मोदीजींनी भारताला विश्वगुरु करण्याचा प्रयत्न केला. भारताने चंद्राच्या दक्षिण धुव्रावर यशस्वीपणे यान उतरण्याची किमया करुन दाखवली, आता मंगळावर जाण्याची तयारी सुरु आहे. एकीकडे विकास तर दुसरीकडे अवकाश तंत्रज्ञानातील ऐतिहासिक कामगिरी करुन भारताची महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरु आहे," असेही ते म्हणाले.




Powered By Sangraha 9.0