मालेगावचा कोहिनूर हिरा

    09-May-2025
Total Views |

मालेगावचा कोहिनूर हिरा


राष्ट्रनिष्ठ पिढी उभी राहण्यासाठी सातत्याने लिखाण व समाज प्रबोधन करत मालेगाव व परिसराच्या विकासासाठी झटणार्‍या अ‍ॅड. शिशिर शिवाजीराव हिरे यांच्याविषयी...


1971 साली डॉ. शिवाजीराव व लीलाताई हिरे यांच्या पोटी जन्म घेतलेल्या शिशिर यांचे प्राथमिक शिक्षण तत्कालीन मालेगाव नगरपालिकेच्या शाळेत झाले. या शाळेत शिक्षण घेण्यामागे त्यांचे वडील व सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवाजीराव हिरे यांचा असा हट्ट होता की, माझी मुले सर्वसामान्यांच्या मुलांबरोबरच वाढतील. त्यामुळेच अ‍ॅड. शिशिर व त्यांच्या दोन्ही भावंडांचे शिक्षण नगरपालिकेच्या शाळेत झाले. यामुळे अ‍ॅड. शिशिर यांची सामान्यांशी नाळ जोडली गेली. शिशिर यांचे बालपण झोपडपट्टी, मागासवस्त्या व नगरपालिकेच्या शाळेत गेले. त्यांना सामान्य माणूस व तथाकथित वरच्या वर्गात कधीच फरक करावासा वाटला नाही. आई-वडिलांकडून त्यांना समाजसेवेचा वारसा लाभला. त्यांच्या आईचे वडील भिला पाटील स्वातंत्र्यसैनिक, तर वडिलांचे वडील केवळ हिरे ‘निमगाव शिक्षण प्रसारक संस्थे’चे संस्थापक, जी पुढे ‘महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षण संस्थे’त रुपांतरित झाली. शिशिर यांचे माध्यमिक शिक्षण ‘मालेगाव एज्युकेशन सोसायटीज’ या शाळेत झाले. घराशेजारी राहणार्‍या बाळासाहेब चिंधड्यांच्या पुढाकाराने संघ संस्काराचे धडे त्यांनी बालवयापासूनच गिरविले. पुढे आपल्या काकांच्या प्रेरणेने त्यांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयात वकिली पूर्ण केल्यानंतर तेथे अनेक संधी असतानाही ते आपल्या मूळ गावी परतले. मालेगावला समाजाभिमुख काम करण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘शिवयुग सामाजिक संघटना’ स्थापन केली. मालेगावात वकिली व्यवसाय सुरू केल्यानंतर चार वर्षांतच उसळलेल्या भीषण दंगलीत अनेक हिंदू कार्यकर्त्यांची धरपकड झाली. हिंदू कार्यकर्त्यांसाठी अ‍ॅड. हिरे यांनी वकिलांची मोठी फौज उभी केली. 2001च्या या दंगलीच्या पार्श्वभूमीवर नेमलेल्या न्यायमूर्ती के. एम. पाटील चौकशी आयोगापुढे एक रुपयाही शुल्क न घेता, त्यांनी पोलिसांची बाजू मांडली. कोणताही ओरखडा उमटू न देता, पोलिसांना दंगलीच्या चौकशीतून त्यांनी सुखरूप बाहेर काढले. 2013 मध्ये ठाण्याच्या मुंब्रा परिसरात ‘लकी बिल्डिंग’ नावाची इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या 75 गरिबांसांठी त्यांनी न्यायालयात बाजू मांडली. येथूनच अ‍ॅड. हिरे यांची वाटचाल विधी व्यवसायातून समाजसेवेकडे सुरू झाली. याचदरम्यान प्रसिद्ध सिनेतारका ममता कुलकर्णी आणि मुंबई मनपाच्या रस्ते घोटाळ्याचा खटला लढवत धनदांडग्यांना धडा शिकवला. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या बहुतांशी चौकशी आयोगांसमोर पोलिसांची बाजू खंबीरपणे मांडण्याचे काम अ‍ॅड. हिरे यांनी केले. दि. 1 जानेवारी 2018 रोजी शहरी नक्षलवाद्यांच्या पुढाकारातून झालेल्या कोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शासनाने सखोल चौकशीसाठी न्या. जय नारायण पटेल व भूतपूर्व मुख्य सचिव सुमित मलिक आयोगाची स्थापना केली. आयोगापुढे पोलीस व प्रशासनाची बाजू मांडण्याची अ‍ॅड. हिरे यांच्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी त्यांनी लीलया पेलली. अनेक अडचणी, टीकाटिप्पणी, आरोप सहन करून अ‍ॅड. हिरेंनी शासनाची बाजू लावून धरण्याचे काम केले. पुणे कल्याणीनगरच्या पोर्शे कारअपघात प्रकरणात धनदांडगे आरोपी सुटण्याच्या परिस्थितीत तत्कालीन गृहमंत्र्यांनी अ‍ॅड. हिरे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली. यावेळी त्यांनी रक्तनमुने बदलण्याच्या प्रकाराची गांभीर्यता न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने अपघाताचा गुन्हा असूनही एकाही आरोपीची अजूनही जामिनावर मुक्तता झालेली नाही. पुढे मालेगावसह संपूर्ण राज्यात बांगलादेशी घुसखोर व रोहिंग्यांनी स्थानिकांना व भ्रष्ट प्रशासनाला हाताशी धरत बोगस व खोटे जन्मदाखले मिळविण्याचा देशविघातक प्रकार केला. या खटल्यांमध्ये अ‍ॅड. हिरे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली. कोणत्याही दडपणाला न झुगारता त्यांनी आपली चुणूक दाखवली. मालेगावच्या भुईकोट किल्ल्यावरील अतिक्रमण, बेकायदेशीर भूखंडविक्री, विद्युतचोरी असे प्रकार अ‍ॅड. हिरे यांनी वकिलीच्या बाहेर जाऊन लावून धरले.

याबद्दल त्यांचे म्हणणे आहे की, “आमची पिढी नशीबवान आहे. कारण, आम्हाला पारतंत्र्याची झळ बसली नाही. मग आज देशविघातक शक्तींच्या विरोधात एकजुटीने लढत थोडीतरी देशसेवा करण्याची ही धडपड आहे.” वकिली व्यवसायाबरोबरच सजग नागरिकाची भूमिका पार पाडत असताना समाजाकडे दुर्लक्ष होणार नाही, याची त्यांनी कायम काळजी घेतली. त्यामुळेच मालेगाव येथे विनामूल्य वृद्धाश्रम सुरू करत नैतिक मूल्यांची जोपासना केली. यासोबतच आपल्या मातोश्री लीलाताई हिरे यांच्या नावाने कार्डियाक रुग्णवाहिका मालेगावकरांसाठी उपलब्ध करून दिली. मालेगावात बेकायदेशीर वृक्षतोड होणार नाही, यासाठी ते सातत्याने काम करत आहेत. मालेगावात ‘रोटरी’सारख्या स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून अ‍ॅड. हिरे यांनी समाजकारणाचा पाया घातला. यासोबतच ते उत्कृष्ट लेखक असून, अनेक वर्तमानपत्र व पुस्तकांत त्यांनी लेखन केलेले आहे. प्रभू श्रीरामचंद्रांवर नितांत श्रद्धा ठेवत ‘माझा देवच मला सुरक्षित ठेवेल,’ असा ठाम विश्वास व्यक्त करणार्‍या बहुआयामी अ‍ॅड. शिशिर हिरे यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनंत शुभेच्छा.

विराम गांगुर्डे
9404687608