महाभारतात ऐन रणभूमीवर हातपाय गाळणार्या अर्जुनाला भगवंतांनी उपदेश करत, त्याला युद्धास उद्युक्त केले. यानंतर अर्जुनानेही शत्रूचा निःपात केला. पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणाला खीळ घालण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनाही लष्करी कारवाईचा उपाय निरुपायानेच योजावा लागला. दुर्दैवाने राजकीय मजबुरीपोटी त्यावरही टीका करणारे बरेच ‘राज’कीय नेते आज दिसत आहेत.
दहशतवादावर असलेला एकमेव जालीम इलाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर केल्यापासून, भारतातील अनेकांच्या अंगाला नको त्या ठिकाणी मिरची झोंबली. पहलगाममधील हत्याकांडाला प्रत्युत्तर देण्यासाठी सुमारे 15 दिवस मोदी यांनी कसलीच हालचाल केली नाही अशी टीका करणारे, आता मात्र युद्धाच्या अनावश्यकतेवर प्रवचन देत आहेत. त्यातच या लष्करी कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे चपखल नाव दिल्यामुळे या संधिसाधू कपाळकरंट्यांचा फारच जळफळाट झाला. भारतातील बहुसंख्य जनतेने या नामकरणाबद्दल मोदी यांचे आभार मानल्याने, या लोकांच्या दुःखावर मीठच चोळले गेले.
‘ऑपरेशन सिंदूर’ हे अस्सल भारतीय संस्कृतीशी जोडलेले नाव असून ते पहलगाममधील पर्यटकांची ज्या पद्धतीने हत्या केली गेली, त्यासंदर्भात योजण्यात आले आहे. ज्या महिलांच्या पतींची ते हिंदू असल्यामुळे त्यांच्या देखत हत्या करण्यात आली आणि त्यामुळे त्यांच्या कपाळावरील सिंदूर (कुंकू) त्यांना पुसावे लागले, तो संदर्भ या कारवाईला आहे. त्याची निवड स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केल्याचे सांगण्यात येते. मोदी यांनी यापूर्वीही भारताच्या अंतराळ मोहिमांसाठी भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माशी संबंधित नावांची निवड केली आहे. ‘चांद्रयान मोहीम’ असो की चंद्रावर आपल्या उपग्रहाचे सुनियोजित अवतरण झालेल्या जागेला दिलेले ‘शिवशक्ती’ हे नाव असो, सर्व भारतीयांनी त्याचे मनापासून स्वागतच केले. मोदीद्वेषाने पछाडलेल्या आणि भारतीय संस्कृतीबद्दल दुषित दृष्टिकोन बाळगणार्या नेत्यांचा आणि कथित बुद्धिवाद्यांचा पोटशूळ मात्र त्यामुळे वाढतो. आताही पाकिस्तानवर केलेल्या लष्करी कारवाईपेक्षा त्या मोहिमेला दिलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावामुळे, या भंपक नेत्यांच्या अंगाची जळजळ होत आहे.
काँग्रेसच्या नेत्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावामुळे झटका बसला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावर टीका करताना, मोदी यांनी भावनिक आणि राजकीय लाभासाठी हे नाव निवडल्याची टीका केली. मोदी यांना कसला भावनिक लाभ होणार आहे, ते सांगण्याची तसदी मात्र पृथ्वीराजबाबा यांनी घेतली नाही. कारण खरी पोटदुखी तर सांस्कृतिक आहे. मुस्लीम मतपेढीच्या राजकारणाचा अखंड ध्यास घेऊन जी मानसिक गुलामगिरी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वीकारली आहे, त्याचा हा परिणाम आहे. अभिनयाच्या क्षेत्रातील पंचमस्तंभीयांची तर त्यामुळे वाचाच बसली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्व दिग्गज खान अभिनेत्यांनी अजूनही पहलगाम हत्याकांडाबद्दल संवेदना व्यक्त केली नसून, पाकिस्तानवर टीका केलेली नाही. एक किरकोळ, कनिष्ठ अभिनेत्री असलेल्या स्वरा भास्कर हिने समाज माध्यमावर युद्धविरोधी टीका केली आहे. युद्ध करणे हा मूर्खपणा असल्याचे मत तिने व्यक्त केले. जिचा राजकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण वगैरेंशी दूरान्वयाने संबंध नाही; तिने अशी प्रतिक्रिया देऊन आपल्या मनाचा कोतेपणाच उघड केला आहे.
ज्यांना जनतेने घरी बसविले आहे असे नेते आणि ज्युनिअर कलाकार इतपतच ओळख असलेल्या दीड दमडीच्या कलाकारांमध्ये, आपले अस्तित्व दाखवून देण्याच्या धडपडीमुळे ही सर्व टीका होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात झपाट्याने संदर्भहीन ठरत चाललेल्या एका नौटंकीबाज नेत्यानेही मोदींनी काय करावे आणि करू नये, यावर भाष्य केले आहे. मुंबईतून एखादा नगरसेवकही निवडून आणण्याची क्षमता नसलेला हा नेता मोदी यांना अक्कल शिकवितो आहे, हे पाहून जनतेची करमणूकच होते. त्यावरून अशा भंपक नेत्यांना जनतेने घरी का बसविले, तेही स्पष्ट होते.
काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानविरोधात होत असलेल्या जालीम कारवाईला विरोध करणे स्वाभाविकच आहे. त्यांची सत्ता होती, तेव्हा त्यांचे लाडके बाळ असलेल्या पाकिस्तानला त्यांनी खुले रान दिले होते. आता या नतद्रष्ट कार्ट्याच्या व्रात्यपणाबद्दल त्याच्या पेकाटात मोदी लाथा घालू लागल्यावर, त्याचे दु:ख त्यांना होणे स्वाभाविकच आहे. पृथ्वीराज चव्हाण हे कधीच जनतेचे नेते नव्हते. त्यांच्या नशिबाने त्यांना राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळाले, पण जनतेने त्यांना आता घरी बसविले आहे. आपली उपयुक्तता संपली आहे याची जाणीव ज्यांना होत नाही, ते अजूनही आपल्या टिप्पणीने प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची केविलवाणी धडपड करीत असतात, त्याचेच हे उदाहरण आहे. पण गेली 30-35 वर्षे भारताविरुद्ध सुरू केलेल्या दहशतवादाबद्दल पाकिस्तानला कसलीच शिक्षा करण्यात आलेली नाही. काँग्रेसने शांततेच्या नावाखाली पाकिस्तानच्या या अघोरी कृत्यांवर पांघरूण घातले. पण हा रोग खूपच चिघळल्याने, आता त्यावर शस्त्रक्रियेची गरज निर्माण झाली होती.
मोदी किंवा भारत सरकारलाही हे युद्ध नकोच होते. किंबहुना मोदी यांनीच रशिया-युक्रेनच्या युद्धाला प्रारंभ झाल्यावर ‘हा युद्धाचा काळ नसल्याचे’ वक्तव्यही केले. पण पाकिस्तानच्या अमानुष धोरणामुळे आपद्धर्म म्हणून मोदी यांना दहशतवादाविरोधावरील अखेरचा उपाय योजावा लागला. भारतातील त्यांच्या विरोधकांना ही गोष्ट समजत नाही असे नाही, पण प्रत्येक गोष्टीत राजकीय स्वार्थाचा विचार करण्याची गलिच्छ सवय लागल्याने, मोदी यांच्या प्रत्येक निर्णयावर केवळ टीकाच करण्याचे धोरण विरोधकांनी अवलंबिले आहे. सार्या जगाकडून भारताने केलेल्या या कारवाईला पाठिंबा मिळत आहे, ही गोष्टही हे विरोधक लक्षात घेत नाहीत हे खेदजनक आहे. हा ‘नो वॉर सिंड्रोम’ नावाचा रोग असावा. अजूनही भारताने पाकिस्तानच्या लष्करी आस्थापनांवर आणि निष्पाप नागरिकांवर हल्ले चढविलेले नाहीत. आपल्या सशस्त्र सेना अजूनही पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरच प्रहार करीत आहेत, हा संयमच आहे. उलट पाकिस्तानने सर्व नीतिनियम गुंडाळून ठेवले असून, भारतीय नागरिकांवर उखळी तोफांचा गोळीबार सुरू ठेवला आहे. शिवाय, नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि आंतरराष्ट्रीय सरहद्दीचे उल्लंघन करून, भारतीय भूमीवर क्षेपणास्त्रांचा माराही सुरू ठेवला आहे. ही सरळसरळ युद्धकृती आहे. भारताने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देतानाही विलक्षण संयम बाळगला आहे. तरीही जर पाकिस्तानने आपले वाकडे पाऊल टाकले, तर मात्र भारतालाही आपला रुद्रावतार धारण करावा लागेल. भारताच्या संयमाची परीक्षा न घेणेच पाकिस्तानच्या हिताचे आहे.