प्रेम म्हणजे नुसतीच एक भावना नसते, ती एक निस्सीम आर्तता असते, एक समर्पण असते, जे कुणासाठी तरी स्वतःला हरवून देणं शिकवतं. या भावना मनोरंजन क्षेत्रात अनेकदा मांडल्या जातात, पण प्रत्येकवेळी त्या नव्या रूपात प्रेक्षकांच्या मनात घर करतात. ’माझी प्रारतना’ हा चित्रपटही त्याच परंपरेतला एक तरल आणि भावनिक प्रवास आहे, ज्यात प्रेमाचं रूप वेगळं असलं, तरी त्याचा गाभा तोच निःस्वार्थ, निर्मळ आणि नितळ.
या चित्रपटाची कथा आहे, स्वातंत्र्यपूर्व काळातल्या एका छोट्याशा गावातली. या गावावर ब्रिटिशांचं राज्य आहे, लोक भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत. अशा या वातावरणात एका साध्या, निरागस मुलाचं गोळ्याचं आयुष्य उलगडतं. गोळ्या आपल्या आजीसोबत राहणारा प्रेमळ मुलगा. आजी म्हणजे त्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदू. ती त्याला फक्त नातवाप्रमाणे नव्हे, तर जणू स्वतःच्या मुलासारखं जपत असते, अगदी तळहाताच्या फोडासारखं. गोळ्याचं व्यक्तिमत्त्वही तसंच अल्लड, खेळकर, पण मनमिळावू आणि मेहनती. ’अल्लड’ या शब्दावरती विजय मिळवलेल्या गोळ्या मात्र वयाच्या वाढत्या आकड्यांच्या शर्यतीत हरला. पण, त्याचं प्रेम हे तितकंच निरागस आणि सच्चं. म्हणतात ना जिथे भावना मोठ्या असतात, तिथे शब्द अल्प. कोवळ्या मनावर रेखाटलेलं प्रेमाचं चित्र कथेप्रमाणे हळूहळू नाजूक, गहिरे आणि भावस्पर्शी वाटू लागतं.
चित्रपटाच्या सुरुवातीला कथा काहीशी विस्कटलेली, तुटक वाटू शकते. पण, नेमकं इथेच ’पण’ या शब्दाचा खरा अर्थ साकारतो. कारण, ही अर्धवट वाटणारी मांडणी हा दिग्दर्शकाचा विचारपूर्वक घेतलेला निर्णय असतो. कोणतीही कलाकृती जेव्हा सुरुवातीस पूर्णपणे स्पष्ट वाटत नाही, तेव्हा ती प्रेक्षकांना एका वेगळ्या प्रकारच्या प्रवासात घेऊन जाते. इथे उद्दिष्ट हेच असतं की, कथानकातील प्रत्येक प्रसंग जसजसा पुढे सरकत जाईल, तसतसा प्रेक्षक त्यात अधिक खोलवर गुंतत जावा. हे त्या प्रकारचं सिनेमॅटिक आवाहन असतं, जिथे शेवटच्या टप्प्याला पोहोचताना प्रेक्षकाला केवळ गोष्ट कळत नाही, तर ती समजते, भासते आणि स्पर्शून जाते. आज अनेक चित्रपट ठराविक चौकटीत बसवले असतात, सोपी कथा, तडजोडीतला ड्रामा, भपकदार ‘व्हीएफएक्स’ आणि शेवटी नायकाचा विजय. ही फॉर्म्युला आधारित मांडणी काही वेळा प्रभावीही ठरते. मात्र, काही कथांचा गाभा असतो साधा, तरी त्याची मांडणी वेगळी असते. त्या केवळ प्रेक्षकांसमोर गोष्ट उभी करत नाहीत, तर त्यांना त्या गोष्टीचा भाग बनवतात. प्रेक्षक मग केवळ बघणारे राहात नाहीत, ते त्या प्रत्येक प्रसंगात आपलं काहीतरी शोधू लागतात.
’माझी प्रारतना’ याच धाटणीचा चित्रपट आहे, जिथे कथा उलगडते थेट हृदयाच्या गाभ्यातून. ती नाटकी नाही, पण प्रभावी आहे. ती गोंधळात नाही, पण गुंतवणारी आहे. ती संथ आहे, पण प्रत्येक दृश्यात भावना खोलवर रुतवणारी आहे. या चित्रपटाचं सामर्थ्य हे त्याच्या सहजतेत आहे आणि त्या सहजतेच्या प्रवाहात वाहता वाहता प्रेक्षक शेवटी स्वतःला एका अशा टप्प्यावर उभं पाहतो, जिथे चित्रपट संपतो, पण त्याचं प्रत्ययकारी प्रतिबिंब मनात खोलवर उमटलेलं राहतं.
‘माझी प्रारतना’ या चित्रपटातली अभिनयशैली केवळ अभिनय म्हणून नाही, तर संवेदनांची एक सजीव यात्रा म्हणून अनुभवायला मिळते. विशेषतः पद्मराज नायर, उपेंद्र लिमये आणि अनुशा अदेप या त्रिकुटाचं काम पाहताना, रसिक प्रेक्षक नुसता पाहात नाही, तो त्या भावविश्वाचा भाग होतो. पद्मराज नायर यांनी साकारलेली ’गोळ्या’ ही भूमिका म्हणजे साचेबद्ध अभिनयाच्या बाहेर जाऊन स्वतःला पात्रात विरघळवण्याचा एक अद्वितीय नमुना आहे. संवादहीन असूनही त्यांच्या डोळ्यांतून, हालचालींतून, श्वासांच्या लयीतून पात्राची भाषा उमटते. गोळ्या बोलत नाही, पण त्याचे मौनच अधिक बोलके ठरते. अभिनय म्हणजे फक्त संवादाची देवाणघेवाण नसते, हे त्यांचं काम पुन्हा नव्याने अधोरेखित करतं. या पात्राच्या सखोल समजुतीसाठी आणि एकात्मतेसाठी त्यांनी घेतलेली मेहनत एका विशेष प्रसंगातून लख्खपणे जाणवते. गोळ्या शरीराने धष्टपुष्ट असला, तरी अंतःकरणाने प्रेमळ, आपल्या प्रेमासाठी सात जन्माचं धान्य गोळा करतो. हा प्रसंग ऐकायला जितका साधा वाटतो, तितकाच अनुभवताना तो अंतःकरण हलवणारा ठरतो. त्या प्रत्येक धान्यकणामागे उपाशीपणाचं, श्रमाचं आणि प्रेमाचं सोनं मिसळलेलं असतं. जेव्हा तो गोळ्या आपल्या कमावलेल्या अन्नाच्या राशीकडे पाहतो, तेव्हा त्याच्या चेहर्यावर उमटणारी समाधानी स्मितरेषा, थकवा आणि हळुवार आशा हे सगळं एकत्र मिसळून त्या दृश्याला अनंत अर्थ देऊन जातं. प्रेक्षक त्या क्षणी फक्त पाहात नाहीत, ते त्या गोळ्याचं जग जगू लागतात. जेव्हा दोन भुवया विस्फारल्या जातात आणि तोंडून सहज निघून जातं, ‘अरे बापरे!’ तेव्हा ते फक्त आश्चर्य नसतं. ते कलाकाराच्या मेहनतीचं यश असतं.
‘माझी प्रारतना’ या चित्रपटात उपेंद्र लिमये यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका ही केवळ भीतीदायक नाही, तर ती अंतर्मन हलवणारी आहे. गावाचा सरपंच, बाहेरून गावासाठी झटणारा, पण आतून विकृत वृत्तीने सडलेला माणूस अशी ही भूमिका उपेंद्र लिमये यांनी इतक्या ताकदीने साकारली आहे की, ते पडद्यावर दिसतात तेव्हा वातावरणात एक वेगळीच दडपणाची छाया पसरते. या पात्राचा एक विशेष प्रसंग प्रेक्षकांच्या मनात खोलवर कोरला जातो. गोळ्या, जो स्वतःच्या भावनांना शब्दांत नाही, पण कृतीत व्यक्त करतो, तो प्रार्थनाला काट्यांपासून वाचवण्यासाठी स्वतःहून चप्पल बनवतो. तिच्या वाटेतील त्रास आपल्या डोळ्यांनी पाहून त्या वाटेला मृदू करण्याची ही त्याची प्रेमळ चळवळ असते. पण, चप्पल लवकरच तुटते. मग गोळ्या थोड्या मिश्किल भावनेने, थेट सरपंचाची चप्पल आणतो आणि प्रेमानं ती प्रार्थनाला चढवतो. हा प्रसंग जसा गोड आहे, तसाच त्यानंतरचा भाग अंगावर काटा आणणारा. सरपंच हे पाहतो. त्याचा पुरुषी अहंकार डाचतो. तो आपली प्रतिष्ठा धुळीत गेली आहे, असे मानतो. मग तो गोळ्याला गाठतो आणि निर्दयतेच्या सीमांना पार करत, त्याच्या पायाला काट्याचं झाड बांधतो, तेही एका घोणीच्या तुकड्याने घट्ट गुंडाळून. गोळ्या वेदनेने विव्हळतो, पण त्याचं मौन कधीही शोकांतकी नाही, ते नेहमीच प्रतिकाराने भरलेलं असतं. ही क्रूरता पाहताना, उपेंद्र लिमये यांनी साकारलेला सरपंच मनात एक भीतीदायक ठसा उमटवतो. त्यांच्या चेहर्यावरची शांतपणा, आवाजातील संयम आणि हालचालींतील संथ पण निर्धारलेली भीषणता यांमुळे सरपंच केवळ एक खलनायक उरत नाही, तो हिंसेचं, वर्चस्वाचं आणि नैतिक अधःपतनाचं प्रतीक बनतो.
‘माझी प्रारतना’ हा चित्रपट केवळ अभिनय आणि कथानकाच्या बळावर प्रभाव टाकत नाही, तर त्याच्या संगीतानेही प्रेक्षकांच्या मनात खोलवर स्थान निर्माण केलं आहे. या चित्रपटाचं संगीत हे एक भावनिक प्रवास आहे, प्रत्येक सुरात, लयीत आणि शब्दात प्रेमाची, वेदनेची आणि मूक संवादांची अनुभूती मिसळलेली आहे. चित्रपटातील शीर्षकगीत ‘माझी प्रारतना’ हे केवळ एक गाणं नाही, तर ते एका आत्म्याच्या आर्ततेचं आणि समर्पणाचं संगीतमय रूप आहे. के. एस. चित्रा यांच्या सशक्त आणि हळुवार आवाजात सादर झालेलं हे गीत ‘तूच प्रकाश, तूच माझी प्रारतना’ या ओळींसह प्रेमाला एक पवित्र रूप देतं. मृदू सूर, शांत लय आणि हळव्या शब्दांनी युक्त असलेलं हे गाणं प्रेमातील निष्कलंक भावना प्रकट करतं. चित्रपटातील नायिका प्रार्थना ही जणू त्या गीताच्या प्रत्येक शब्दाशी जोडलेली आहे. एक अशी प्रार्थना, जी फक्त देवापाशी नाही, तर आपल्या प्रिय व्यक्तीकडेही केली जाते. दुसरं गाणं ‘तुझ्या प्रेमाची साथ मिळता’ हे गोळ्या आणि प्रार्थनाच्या नाजूक, अल्लड प्रेमाची सुंदर झलक आहे. के. एस. चित्रा यांचाच आवाज या गाण्यातही प्रेमातल्या नाजूकतेला साजेसा ठरतो.
‘माझी प्रारतना’ या चित्रपटाची एक महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे त्याचं छायाचित्रण जे फक्त दृश्यांची रचना न राहता, संपूर्ण कथानकाचा एक अविभाज्य भाग बनतं. छायाचित्रकार तनू बालक यांनी हा चित्रपट केवळ डोळ्यांनी पाहण्यासाठी नसून अंतर्मनाने अनुभवण्यासाठी असावा, अशी रचना केली आहे. त्यांनी कॅमेर्याच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचं संथ, पण सजीव चित्र रंगवलं आहे, जिथं प्रत्येक क्षण, प्रत्येक दृश्य काहीतरी सांगतं. चित्रपटाची पार्श्वभूमी ब्रिटिशकालीन आहे, त्यामुळे त्या काळातील जीवनपद्धती, मातीचा गंध, उन्हात खपणारी माणसं आणि भावनिक गुंतवणूक यांचं चित्रण हे अतिशय काटेकोरपणे करावं लागतं. तनू बालक यांनी यासाठी नैसर्गिक प्रकाशाचा सुंदर वापर केला आहे. सकाळच्या शुभ्र उजेडापासून ते संध्याकाळच्या करड्या छटांपर्यंत प्रत्येक रंगाच्या भावनेचा विचार करून त्यांनी प्रत्येक फ्रेम सजवली आहे. छायाचित्रणाची खरी ताकद दिसते, ती अशा क्षणांमध्ये जिथं संवाद नाहीत, जेव्हा गोळ्या आणि प्रार्थना एकमेकांशी केवळ नजरांनी बोलतात किंवा जेव्हा गोळ्याचा रडवेला चेहरा एकटाच काळोखातून झगडत घराकडे निघतो. कॅमेरा त्या भावना इतक्या जवळून टिपतो की प्रेक्षकाला त्या पात्रांच्या आत शिरल्यासारखं वाटतं.
‘माझी प्रारतना’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन पद्मराज नायर यांचे आहे आणि त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून एक प्रगल्भ आणि संवेदनशील कथा मांडली आहे. त्यांच्या लेखनात कधीही अतिशयोक्ती नाही, तर प्रत्येक संवाद, प्रत्येक दृश्य नैतिकतेचा आणि मनोभावनांचा अत्यंत गडद आणि स्पष्ट प्रकट करतो. पद्मराज नायर यांचे दिग्दर्शन एक शिस्तबद्ध आणि मार्मिक दृष्टिकोन दर्शवते. गोळ्या आणि प्रार्थना यांच्या प्रेमाची कथा सुरू होती, ती समुद्रापासून मात्र प्रेमाचा शेवट झाला, तो मृत्यूच्या किनारी. आता शेवट नक्की कोणाचा गोळ्याचा, प्रार्थनाचा की कथेचा... हे कोडं उलगडवण्यासाठी तुम्हाला पाहावं लागेल, ‘माझी प्रारतना.’
लेखक, दिग्दर्शक : पद्मराज नायर
कलाकार : पद्मराज नायर, उपेंद्र लिमये, अनुशा अदेप