बुद्धस्मृतींचा चिरतरुण वारसा!

    09-May-2025   
Total Views |
बुद्धस्मृतींचा चिरतरुण वारसा!
एका बाजूला युद्धसदृश परिस्थिती असताना, भारताने दुसर्‍या बाजूला बुद्धांचा विचारसुद्धा तितक्याच समर्थपणे जपला. व्हिएतनाममध्ये बुद्धांच्या विचारांचा केलेला पुनरुच्चार असो किंवा हाँगकाँग येथे स्थगित केलेला बुद्धांच्या अवशेषांचा लिलाव, यांमुळे पुन्हा एकदा भारताचा सम्यक विचार प्रस्थापित झाला आहे. सोमवार, दि. 12 मे रोजीच्या बुद्धपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भारतातील बुद्धस्मृतींच्या या चिरतरुण वारशाविषयी!


दि. 7 मे 2025 ही तारीख इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकवर प्रहार केला आणि दहशतवादाच्या विरोधातील सर्वांत मोठ्या कारवाईचा प्रारंभ झाला. पाकपुरस्कृत दहशतवाद्यांचा खात्मा करत भारताने आपल्या सामर्थ्याचेच दर्शन जगाला घडवले. सीमेपलीकडे अजूनही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असल्या, तरी त्यांना भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. परंतु, याच दिवशी जागतिक स्तरावर घडणार्‍या आणखीन एका घटनेवर भारताने तीव्र हस्तक्षेप नोंदवला, ज्याची चर्चा फारशी झालेली नाही. ‘सोथबीज’ या आंतरराष्ट्रीय लिलाव कंपनीद्वारे हाँगकाँग येथे होणारा बुद्ध अवशेषांचा लिलाव, भारताच्या हस्तक्षेपामुळे स्थगित करण्यात आला. सदर लिलाव म्हणजे बौद्ध भाविकांचा अपमान आहे, असे म्हणत भारताने या लिलावावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

भारताने हस्तक्षेप नोंदवून हा लिलाव स्थगित करायला लावणे, हे भारताच्या सांस्कृतिक वारशाप्रति असलेल्या जागृकतेचे लक्षण आहेच, परंतु त्यापलीकडे एका व्यापक दृष्टिकोनातून या घटनेकडे आणि भारताच्या हालचालींकडे बघावे लागेल. हाँगकाँगच्या सोथबीज येथे जे बौद्घ अवशेष लिलावात निघाले होते, त्यांचा इतिहास तितकाच रोचक आहे. ब्रिटिश अधिकारी विल्यम क्लॅक्स्टन पेपे यांनी 1898 मध्ये केलेल्या उत्खननात हे अवशेष सापडले होते. या पिप्रहवा अवशेषांमध्ये भगवान गौतम बुद्धांच्या अस्थींचे तुकडे, वाळूच्या दगडी पेट्या, सोन्याचे दागिने, रत्ने यांचा समावेश आहे. यामध्ये एका पेटीवरील ब्राह्मी लिपीतील शिलालेखावरून हे शाक्य कुलाने जतन केलेले बुद्धाचे अवशेष आहेत, असे सिद्ध होते. यातील बहुतांशी अवशेष हे 1899 मध्ये कोलकाता येथील भारतीय संग्रहालयाकडे हस्तांतरित करण्यात आले. भारतीय कायद्यानुसार त्यांना ’अअ’ पुरातन वस्तू म्हणून वर्गीकृत करण्यात आले, ज्यामुळे ते काढून टाकायला अथवा त्याच्या विक्रीला मनाई आहे. या अस्थींच्या अवशेषांचा काही भाग सियामच्या राजाला (आताच्या थायलंड येथील) भेट म्हणून देण्यात आला होता. पिप्रहवा (लुंबिनीच्या दक्षिणेस) हे बुद्धांचे जन्मस्थान मानले जाते. इथे असलेला एक स्तूप विल्यम क्लॅक्स्टन पेपे यांनी उकरून काढले. ज्या स्थळावर हे अवशेष सापडले आहेत, तो पिप्रहवाचा भाग उत्तर प्रदेशमध्ये आहे. सोथबीजच्या संकेतस्थळावरसुद्धा ‘1898 साली हाती लागलेला महत्त्वाचा पुरातत्त्वीय शोध’ असे वर्णन करण्यात आले होते.

दि. 2 मे 2025 रोजी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाच्या महासंचालकांनी हाँगकाँगच्या महावाणिज्य दूतावासाला पत्र लिहून हा लिलाव तत्काळ थांबवण्याची विनंती केली. त्याच दिवशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान, सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी अवशेषांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वावर भर देत, इंग्लंडच्या सांस्कृतिक, माध्यम आणि क्रीडामंत्री लिसा नंदी यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला आणि तत्काळ कारवाई करण्याची विनंती केली. दि. 5 मे रोजी भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सोदबीज आणि ख्रिस पेपे (विल्यम पेपे यांचा नातू) यांना कायदेशीर नोटीस बजावून लिलाव थांबवण्याची मागणी करण्यात आली. तसेच लिलाव थांबवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला त्यांच्या युरोप पश्चिम आणि पूर्व आशिया विभागांद्वारे युके आणि हाँगकाँगमधील दूतावासांकडे पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली. केंद्र सरकारने वेगाने केलेल्या या हालचालींमुळे, सदर अवशेष भारतात परत आणण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.

व्हिएतनाममध्ये बुद्ध विचारांचा पुनरुच्चार!



केंद्रीय संसदीय कामकाज तथा अल्पसंख्याक व्यवहारमंत्री किरेन रिजिजू दि. 6 मे रोजी व्हिएतनाम येथील हो ची मिन्ह येथील व्हिएतनाम बौद्ध अकादमीमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्रांच्या ‘वेसाक दिन-2025’च्या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे आज भारतातून एका विशेष विमानाने हो ची मिन्ह येथे आगमन झाले. भारताचे सांस्कृतिक मंत्रालय तथा आंतरराष्ट्रीय बुद्ध महासंघाच्या सहकार्याने हे अवशेष दि. 21 मे 2025 पर्यंत प्रदर्शनासाठी मांडले गेले आहेत. यावेळी एका भव्य कार्यक्रमाअंतर्गत या अवशेषांची मिरवणूक काढण्यात आली. भगवान बुद्धांच्या जीवनावरील विशेष प्रदर्शनसुद्धा यावेळी भरवण्यात आले होते, ज्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील समान बौद्ध वारशाला अधोरेखित करणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमाचेदेखील यावेळी आयोजन करण्यात आले होते.

‘वेसाक दिना’च्या पार्श्वभूमीवर किरेन रिजिजू यांनी भगवान बुद्धांच्या शिकवणींच्या शाश्वत प्रासंगिकतेवर भर दिला. त्याचबरोबर समकालीन जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी बुद्धविचार का महत्त्वाचा आहे, यावरसुद्धा भाष्य केले. या भव्य समारंभाला व्हिएतनामच्या नेत्यांव्यतिरिक्त श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसनायकेसुद्धा उपस्थित होते. यावेळी बुद्धांच्या शिकवणींमध्ये अंतर्भूत असलेल्या करुणा, ज्ञान आणि शांतीच्या सामायिक आदर्शांना सहकार्य वाढवण्याच्या आणि पुढे नेण्याच्या दृष्टीतून आणखी एक सामंजस्य करार करण्यात आला. याअंतर्गत दोन्ही देशांमधील सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक देवाणघेवाण सोप्पी होणार आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या या दौर्‍यामुळे जागतिक स्तरावर भारताचा सम्यक विचार पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

या दोन घटना भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पुरेशा आहेत. एका बाजूला आपल्या देशाचा सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी भारत कटिबद्ध आहेच; दुसर्‍या बाजूला हाच वारसा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कामसुद्धा भारत समर्थपणे करत आहे.


वारसा जतन करणे महत्त्वाचे


भगवान बुद्धांच्या ज्या अवशेषांचा लिलाव करण्यात येणार होता, तो भारताचा अत्यंत महत्त्वपूर्ण वारसा आहे. त्याला केवळ आर्थिकच नव्हे, तर धार्मिक आणि भावनिक महत्त्वसुद्धा आहे. भारताच्या समृद्ध आणि सामर्थ्यशाली परंपरेचा तो एक अविभाज्य भाग आहे. त्याचा लिलाव थांबवून भारताने जगाच्या पाठीवर महत्त्वाचा संदेश दिला आहे. आपल्या या परंपरेचा, या वारशाचा अपमान आपण सहन करणार नाही, हे भारताने दाखवून दिले आहे.
 
- डॉ. सुरज पंडित, बौद्ध विद्या विभाग प्रमुख, साठ्ये महाविद्यालय

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.