'ऑपरेशन सिंदूर' देशाच्या सुरक्षेसाठी एक आवश्यक आणि अपरिहार्य पाऊल!

09 May 2025 14:09:07

RSS on Operation Sindoor

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (RSS on Operation Sindoor)
पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या समर्थक परिसंस्थेविरुद्ध भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून निर्णायक कारवाई करण्यात आली. त्याबद्दल भारत सरकार आणि सशस्त्र दलांच्या नेतृत्वाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कौतुक करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांवर, त्यांच्या पायाभूत सुविधांवर आणि समर्थन यंत्रणेवर केली जात असलेली लष्करी कारवाई ही देशाच्या सुरक्षेसाठी एक आवश्यक आणि अपरिहार्य पाऊल असल्याचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी म्हटले आहे.

हे वाचलंत का? : कराची हल्ल्याचे वास्तव काय? कराची पोर्ट ट्रस्ट ऑफिशिअलचे सूचक ट्विट!

भारतीय सीमेवरील धार्मिक स्थळे आणि नागरी वस्त्यांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यांचा संघाकडून निषेधही व्यक्त करण्यात आला आहे. तसेत हिंदू पर्यटकांच्या क्रूर हत्याकांडातील पीडित कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला न्याय मिळवून देण्यासाठी करण्यात येणाऱ्या कारवाईमुळे संपूर्ण देशाचा स्वाभिमान आणि धैर्य वाढल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. राष्ट्रीय संकटाच्या या काळात, संपूर्ण देश तन, मन आणि धनाने सरकार आणि सशस्त्र दलांसोबत उभा आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सर्व देशवासीयांना सरकार आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व माहितीचे पूर्ण पालन करण्याचे आवाहन संघाकडून करण्यात आले आहे. ते म्हणाले, "या प्रसंगी, आपले नागरी कर्तव्य बजावताना, सामाजिक एकता आणि सौहार्द बिघडवण्याचे देशविरोधी शक्तींचे कोणतेही षड्यंत्र यशस्वी होऊ देणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. सर्व देशवासीयांना विनंती आहे की त्यांनी लष्कर आणि नागरी प्रशासनाला आवश्यकतेनुसार सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार राहून आणि राष्ट्रीय एकता आणि सुरक्षा राखण्यासाठी सर्व प्रयत्नांना बळकटी देऊन त्यांची देशभक्ती प्रदर्शित करावी."


Powered By Sangraha 9.0