सध्या जगात एकच चर्चा आहे ती म्हणजे, भारताने पाकिस्तानवर केलेल्या धडाकेबाज कारवाईची. इस्रायलने हमासविरोधात जी कारवाई केली आणि अत्याधुनिक शस्त्रप्रणालीने शत्रुचा नायनाट केला त्याच पद्धतीने, किंबहुना त्यापेक्षाही अधिक जोशात विचारपूर्वक आणि चतुराईने शत्रुविरोधात कारवाई करून भारताने जगात ‘आम्ही देखील एक सशक्त आणि बलवान राष्ट्र आहोत,’ हे अगदी तासाभराच्या दोन कारवायांनी गेल्या चार-पाच दिवसांत दाखवून दिले. यासाठी भारतीय लष्करातील तिन्ही दले अभिनंदनास पात्र तर आहेतच, मात्र ज्या धैर्याने आणि कुटनीतीने सरकारने हे सर्व घडवून आणले, त्याने भारतातील देशभक्त नागरिकांची छाती 56 इंच फुलली असणार हे वेगळे सांगायची गरज नाही. युद्ध म्हणजे भातुकलीचा खेळ नाही, त्यासाठी असावे लागते जिगर. जी आपल्या देशाच्या पंतप्रधानांपासून ते सीमेवर भारतभूमीच्या रक्षणार्थ लढणार्या आपल्या सैनिकांमध्ये दिसून आली. आपल्या भागातील आई-बहिणी आणि आप्तांना सोडून मायभूमीचे रक्षण करणार्या सैनिकांची ही कामगिरी बघितली की अभिमानाने छाती फुलून यावी, असे क्षण आपल्या देशातील नागरिक अनुभवत आहेत.
धडाकेबाज कारवाईची प्रशंसा केवळ भारताने शत्रुविरोधात लढा सुरू केला म्हणून केली जात नाही, तर पाकिस्तानात घूसून त्यांना नेस्तनाबूत करणार्या भारतीय सैनिकांनी अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून केलेल्या कारवाईबद्दलही भारतीयांना खरा आनंद वाटतो. आपला देश आता महासत्ता होण्याच्या मार्गावर असल्याचे हे द्योतक आहे. आर्थिक महासत्ता होण्यासाठी जपानला मागे टाकणार्या आपल्या देशाने, मग्रुरी आणि अत्यंत निर्लज्ज हल्ले दहशतवाद्यांकरवी करवून घेणार्या पाकची झोप उडवली असल्याचे संपूर्ण जग बघत आहे. पाकचा असाच हेकेखोरपणा भविष्यातदेखील कायम राहिला, तर आमचे सैनिक त्यांना पुरून उरतील, हा विश्वास आम्हाला गेल्या काही तासांत मिळाला आहे. शत्रुराष्ट्र पाकिस्तानकडून नियमांचे उल्लंघन करून नागरी भागात केलेल्या हल्ल्यांना अत्याधुनिक प्रणालीने आपल्या सैनिकांनी ज्या तर्हेने नष्ट केले, ते ‘काबिल-ए-तारिफ’च! भारतीय सैनिकांच्या या धडाकेबाज कारवाईला तोड नाही हेच खरे.
शत्रू आणि निर्दयी राष्ट्र म्हणून उदयास आलेल्या पाकिस्तानची जी फजिती आज सारे जग बघत आहे, ती इतिहासातील आणखी एका काळ्याकुट्ट इतिहासाच्या पानाची निर्मिती असेल. भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या भूमीत बेधडकरित्या घुसून त्यांची महत्त्वाची ठिकाणे आणि आपल्याला त्रास देणार्या दहशतवाद्यांची ठिकाणे, अचूकरित्या नष्ट केल्याचे सगळ्या जगाने बघितले आहे. यामुळे पाकिस्तान किती कमकुवत मात्र मुजोर राष्ट्र आहे, हेदेखील सार्या जगाला यानिमित्ताने कळून चुकले आहे. त्यामुळेच पाकचा थरथराट आणि थयथयाट होत आहे. एकीकडून भारतीय सैनिकांचे तुफानी हल्ले आणि जगाकडून होत असलेल्या छी-थू यामुळे पाकची आता भीतीने गाळण झाली आहे. रात्रीच्या झोपा हराम झाल्या आहेत, आधीच आर्थिकद्ृष्ट्या गलितगात्र झालेले हे राष्ट्र पिसाळलेल्या प्राण्यासारखा आव आणून आपल्यात जेवढी काही आहे, त्या शिल्लक क्षमतेचे बिभत्स असे प्रदर्शन घडवित आहे. कारण नसताना भारताशी खेटे घेणे हा स्थायीभाव राहिलेल्या पाकिस्तानची कशी जिरवायची, हे भारतीय सैन्याने काही तासांत दाखवून दिले आहे. त्यामुळे त्या राष्ट्रातदेखील आता मतभेद निर्माण झाले आहेत.
सध्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदींचे नाव घ्यायला, त्यांचा मुकाबला करायला घाबरतात, असे त्याच देशाचे लोकप्रतिनिधी तेथील संसदेत सांगत आहेत. दहशतवादाच्या आडून भारताविरोधात नेहमी कुरघोड्या करणार्या या राष्ट्राने जी आजातागायत दुष्कृत्ये केली आहेत, त्यांची जबर किंमत हे राष्ट्र आता मोजत आहे. भिकेचे डोहाळे लागलेल्या पाकिस्तानात आता यादवी होणार की काय, अशी शंकादेखील निर्माण होण्यास वाव आहे. बलुचिस्तान प्रांताने वेगळ्या राष्ट्राची मागणी करून पाकचे तुकडे पाडायला सुरुवात केली आहे. भयग्रस्त पाकिस्तानचा हा थरथराट आता जग बघत आहे. अन्य राष्ट्रांनीदेखील पाकला आता किंमत द्यायची नाही, हाच निर्धार केला आहे. भारतासारख्या अन्य राष्ट्रांसाठी संकटकाळात धावून जाणार्या देशावर वाकडी नजर ठेवणार्या पाकची कड घ्यायला भविष्यात कोणतेही राष्ट्र पुढे येईल, अशी शक्यता वाटत नाही. जे येतील, त्यांची वृत्ती पाकसारखीच मुजोर असेल, हे कोणीही सांगू शकेल.
अतुल तांदळीकर