मुंबई: (Fake News alert from Govt amid India-Pakistan tensions) भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांसह इतर माध्यमांमधून खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. या बातम्यांमधून तथ्यहीन आणि चुकीची माहिती दिली जात आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या हल्ल्यांसंबंधित बनावट व्हिडीओ आणि फोटो प्रसारित करुन चुकीचे दावे केले जात आहे. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी आणि माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या माहितीच्या प्रचारावर अंकुश ठेवण्यासाठी सरकारकडून काही उपाय योजना केल्या जात आहेत.
सर्वसामान्य नागरिकांना खोटी आणि चुकीची माहिती देणारी बातमी किंवा फोटो, व्हिडीओ आढळून आल्यास त्याची तक्रार करण्यासाठी राज्य सरकारडून व्हॉट्सअॅप क्रमांक आणि ईमेल आयडी देण्यात आला आहे. तसेच दोन्ही देशांमधील तणावाच्या काळात एखादी माहिती शेअर करण्यापूर्वी सामान्य नागरिकांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या याबद्दल देखील सरकारने माहिती दिली आहे.
माहिती जबाबदारीपूर्वक सामायिक करा, राष्ट्रीय सुरक्षेला सहकार्य करा. कोणतीही चुकीची माहिती आढल्यास #PIBFact Check कडे तक्रार करा, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी 'पीआयबी फॅक्ट चेक'ला WhatsApp: +91 18799711259, ईमेल: socialmedia@pib.gov.in या क्रमांकावर किंवा इमेल आयडीवर संपर्क साधा असेही सांगण्यात आले आहे.