दहशतवाद्यांचा सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करणे ही पाकची परंपरा

- परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाकचा बुरखा फाडला

    09-May-2025
Total Views |

Foreign Secretary Vikram Misri on Pakistan
 
नवी दिल्ली: ( Foreign Secretary Vikram Misri on Pakistan ) खोटेपणाची पाकिस्तानची परंपरा गेल्या ७५ वर्षांपासूनची आहे. आपल्या जन्मापासूनच म्हणजे १९४७ सालापासून पाक तेच करत आहे. दहशतवाद्यांचा सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करणे ही पाकची परंपरा असावी, अशा शब्दात भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाकचा बुरखा गुरुवारी पत्रकारपरिषदेत फाडला.
 
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सोमवारी लष्कर-ए-तोयबा आणि जैस-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी गटांशी पाकिस्तानचे गुप्त संबंध उघड केले. गुरुवारी दिल्लीत ऑपरेशन सिंदूरवर पत्रकार परिषदेत बोलताना मिस्री यांनी प्रश्न उपस्थित केला की दहशतवादी कार्यकर्त्यांना लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राजकीय अंत्यसंस्कार का केले जात आहेत. नागरिकांचे अंत्यसंस्कार पाकिस्तानी ध्वजांनी लपेटून आणि राजकीय सन्मानाने केले जातात, हे देखील विचित्र आहे. त्यामुळे भारताच्या हल्ल्यात मारले गेलेले दहशतवादीच होते, याविषयी भारतास कोणतीही शंका नाही.
 
मात्र, अशाप्रकारे दहशतवाद्यांना राजकीय अंत्यसंस्कार देणे ही पाकिस्तानमध्ये एक पद्धत असू शकते, अशा शब्दात मिस्री यांनी पाकची लक्तरे वेशीवर टांगली आहे. पाक जन्मापासूनच खोटेपणा करत असल्याचा सणसणीत टोला परराष्ट्र सचिव मिस्री यांनी लगावला. पाकचे पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री व अन्य लोक खोटे बोलत असल्याचे त्यांना विचारले असता ते म्हणाले, यामध्ये आश्चर्य वाटण्यासारके काहीच नाही. पाक आपल्या जन्मापासूनच म्हणजे १९४७ सालापासून खोटे बोलत असून त्यांचा हा प्रवास ७५ वर्षांचा आहे. पाकने १९४७ साली जम्मू – काश्मीरमध्ये आपले सैन्य घुसवून ते टोळीवाले असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रसंघाकडे केला होता, याची आठवण मिस्री यांनी करून दिली.
 
पत्रकारपरिषदेत मिस्री यांनी तो फोटो दाखवला, जेथे अमेरिकेद्वारे घोषित जागतिक दहशतवादी आणि लष्कर-ए-तोयबाचा उच्चस्तरीय कमांडर हाफिज अब्दुल रौफ, भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांसाठी अंत्यसंस्काराचे नेतृत्व करत आहे. जागतिक दहशतवादी ओसामना बिन लादेन कोठे सापडला आणि त्याला कोणी शहीद म्हटले हे याची आठवण करून देण्याची गरज नाही. युएनएससीच्या निवेदनामधून पहलगाम हल्ला करणाऱ्या टीआरएफ या दहशतवादी संघटनेचा उल्लेख पाकनेच काढायला लावला होता.
 
पाकमध्ये संयुक्त राष्ट्रांनी आणि अनेक देशांनी प्रतिबंधित केलेले दहशतवादी राहतात हे उघड सत्य आहे. गेल्या काही दिवसांत पाकचे संरक्षण मंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्री अशा दहशतवादी गटांशी त्यांच्या देशाचा संबंध स्वीकारत आहेत, याचीही आठवण मिस्री यांनी करून दिली.
 
चिथावणी नव्हे, प्रत्युत्तर
 
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, भारताकडून चिथावणी दिला जात असल्याचा पाकचा दावा हास्यास्पद आहे. कारण, पहलगाम हल्ला ही पाकची चिथावणी होती आणि त्यास भारतातर्फे प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भारताने यापूर्वीही स्पष्ट केले आहे की टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबाशी जोडलेली संघटना आहे. भारत लवकरच संयुक्त राष्ट्रांच्या पथकाला भेटेल आणि अधिक माहिती सादर करेल. त्याचप्रमाणे पाकने भारताच्या धरणांसह अन्य आस्थापनांना लक्ष्य करण्याचा विचारही करू नये, अन्यथा त्याची जबाबदारी पूर्णपणे पाकची असेल.
 
संयुक्त चौकशी करण्याचा प्रश्नच नाही
 
पहलगाम प्रकरणाची संयुक्त चौकशी झाली पाहिजे असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. परंतु याबाबतीत पाकचा पूर्वेतिहास चांगला राहिलेला नाही. मग तो मुंबई हल्ला असो किंवा पठाणकोट हल्ला. अशा अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारताने फॉरेन्सिक पुरावे दिले. पाकिस्तानला चौकशीची संधी देण्यात आली आणि दोषींना न्याय मिळवून देण्यास सांगण्यात आले. पाकिस्तानने नेहमीच कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे.
 
पाकला पैसे देणाऱ्यांनी विचार करावा
 
परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, पाकिस्तानबाबतच्या प्रकरणाकडे त्या लोकांनी लक्ष दिले पाहिजे जे या देशाला वाचवण्यासाठी आपले खिसे उघडतात. आपले पॅकेजेस कोणत्या कामासाठी वापरले जातात, याचाही विचार करायला हवा. गेल्या तीन दशकांत पाकने असे अनेक पॅकेज दहशतवादासाठी वापरले आहेत. त्यामुळे अर्थसहाय्याविषयी निर्णय आयएमएफ बोर्ड सदस्यांना घ्यावा लागेल.