निफाडचे सुपुत्र अमित गडकरी यशस्वी उद्योजक, तसेच समाजशील कार्यकर्ताही आहेत. त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
ठाण्याचे अमित अरविंद गडकरी यांना रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती असताना त्यांच्या हस्ते ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम एक्सेलन्सी अॅवॉर्ड’ आणि ‘भारतगौरव’ या दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तसेच, त्यांना भारत सरकारचा ‘प्राईड ऑफ इंडिया’ हा सन्मानही प्राप्त आहे. इतकेच नव्हे, तर त्यांना नेपाळचे तत्कालीन राष्ट्रपती रामबरन यादव यांच्या हस्ते ‘इंडो-नेपाल एक्सलेन्स अॅवॉर्ड’नेही सन्मानित करण्यात आले आहे. हा सगळा सन्मान त्यांना त्यांच्या उद्योग-व्यवसाय कर्तृत्वासाठी मिळाला. रबाळे येथील ‘स्पार्क मोटर्स प्रा. लि.’ ही कंपनी आणि चीन शांघाय येथील ‘चाजांऊ सोयामोटर कंपनी लि.’चे ते संचालक आहेत. अमित गडकरी यांच्या जीवनाचा मागोवा घेताना जाणवले, ते म्हणजे प्रचंड कष्ट आणि पडेल ते काम करण्याची तयारी!
गडकरी कुटुंंब मूळचे निफाडचे. अरविंद आणि विद्या गडकरी हे दोघेही अत्यंत धार्मिक. अरविंद हे सिव्हिल कॉन्ट्रक्टर, तर विद्या या गृहिणी. या उभयंतांना दोन अपत्य. त्यांपैकी एक अमित. अरविंद हे प्रचंड समाजशील. 30 वर्षांपूर्वीची घटना. एक परिचित व्यक्ती अरविंद यांना म्हणाली, “माझ्या लेकीचे लग्न काढले आहे. पण, 35 हजार रुपये कमी पडतात. माझ्या घराचे कागदपत्र गहाण ठेवा आणि मला पैसे द्या.” त्याने घराचे कागदपत्र अरविंद यांच्यापुढे ठेवले. यावर ते म्हणाले, “मी पैसे देतो पण, तुझ्या घराचे कागदपत्र गहाण ठेवणार नाही.” असे म्हणून त्यांनी त्या माणसाला पैसे दिले. या घटनेनंतर अमित त्यांच्या बाबांना म्हणाले, “तो माणूस स्वतःहून घर गहाण ठेवत होता, तुम्ही का त्याला नकार दिला?” यावर ते म्हणाले, “आपण जे काही घडतो, जे काही मिळवतो, ते या समाजामुळेच. अडल्या-नडल्या वेळेत एकमेकांसोबत उभे राहायला हवे. ते आपले कर्तव्य आहे.” अशा संस्कारात अमित यांचे बालपण घडत होते.
असो. इयत्ता सातवीपासून तेही त्यांच्या बाबांसोबत बांधकाम स्थळी जायचे. सगळे ठीकच सुरू होते. अमित यांना कसलीच कमतरता नव्हती. मात्र, ते इयत्ता दहावीमध्ये शिकत असतानाच त्यांच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. सगळी जमापुंजी त्यांच्या उपचारावर खर्च झाली. आर्थिक चणचण सुरू झाली. या काळात अमित यांनी बाबांचा बंद पडण्याच्या मार्गावर असलेला ‘अमित कन्स्ट्रक्शन’ हा व्यवसाय पूर्ववत सुरू राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हा काळ संघर्षाचा होता. इतके की एक वही विकत घेण्यासाठीही अमित यांच्याकडे पैसे नव्हते.
अमित यांचे सर्व नातेवाईक शहरात राहायचे. सगळेच आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या संपन्न. त्यांच्याकडून मदत मागणे, हे त्यांना आणि आईबाबांनाही मान्य नव्हते. त्यामुळे अमित यांनी मागच्या वर्षीच्या वह्यांमधील उरलेल्या कोर्या कागदाची गावातल्या बुक बायंडरकडून भलीमोठी वही बनवून घेतली. त्या वहीचे सहा भाग केले आणि वर्षभर त्या एका वहीवर अभ्यास केला. या काळात त्यांना वाटले की, आपल्यावर अचानक अशी वेळ आली. पण, मुळातच गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी किती संघर्ष करावा लागत असेल? त्यामुळे त्यांचे नातेवाईक किंवा ओळखीचे त्यांना जेव्हा कधी मदतीसाठी विचारत, तेव्हा ते सांगत इयत्ता पाचवी ते दहावीची सगळी पुस्तके द्या. अशा प्रकारे त्यांनी प्रत्येक इयत्तेच्या पुस्तकांचे दहा-दहा सेट मिळवले. त्यांचे घर मोठे होते. त्यांनी पाचवी ते दहावीतील गरीब विद्यार्थ्यांसाठी घरी अभ्यासिका सुरू केली. दररोज 30 मुलंमुली या अभ्यासिकेत येत असत. त्यांनी पुस्तक घ्यायची आणि तिथेच अभ्यास करायचा असा शिरस्ता. त्यामुळे गावातल्या गरीब आणि इतर होतकरू मुलांनाही मोठी शैक्षणिक सोय झाली. हळूहळू या अभ्यासिकेमध्ये 1 हजार, 700 पुस्तके जमा झाली.
या सगळ्या काळात ते वडिलांचा व्यवसायही सांभाळत होते. त्यावर त्यांनी चांगली पकड जमवली. पुढे त्यांनी ‘मॅकेनिकल इंजिनिअरिंग’चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न केले. ठाणे येथे आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये कामही मिळाले. खर्च कमी व्हावा म्हणून ते निफाडहून दररोज ठाण्याला कामासाठी येत असत. पुढे मोटर्स (म्हणजे कार नव्हे, तर मशिनीमध्ये लागणारे छोटे यंत्र) बनवण्याचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा, असे त्यांनी ठरवले. ठाण्यालाच त्यांनी एक गाळा भाड्याने घेतला. तिथे मोटर्स बनवू लागले. सुरत येथे हिरे कटिंगचे काम करणारे अनेक व्यावसायिक होते. त्या मशीनमध्ये लागणारे यंत्र त्यांनी बनवले. तसेच ‘येलो पेजेस डायरी’तून व्यावसायिकांची नावे शोधली. त्यांच्याशी संपर्क केला. आठवड्यातून दोनदा ते ट्रेनने सुरतला जाऊ लागले. सोबत 100 मोटर्सनी भरलेली बॅग घेऊन जात. व्यावसायिकांच्या घरी मोटर्स देऊ लागले. पुढे ते औषधनिर्मिती, सुरक्षा आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रातील यंत्रासाठी मोटर्स पुरवू लागले. या व्यवसायात जम बसला. मग ते कुटुंंबासह बदलापूरला राहायला आले. व्यवसायातली सचोटी, प्रामाणिकपणा यामुळे त्यांची भरभराट होत गेली. दरम्यान त्यांचा विवाह शाल्मली यांच्याशी झाला.
पुढे व्यवसायातूनच अमित यांची ओळख चीनच्या बेन लू या व्यक्तीशी झाली. त्याचे रूपांतर मैत्रीत झाले. या दोघांनी मिळून चीनमध्ये कंपनी सुरू केली. ती कंपनी उभी करण्यासाठीही अमित यांनी प्रचंड मेहनत केली. त्यात यश आले. अमित सध्या ठाणे येथे स्थायिक आहेत. उद्योगानिमित्त देशभर भ्रमण करताना त्यांना अनुभव आला की, “लव्ह जिहाद’ आणि ‘आर्थिक जिहाद’ म्हणजे समाजासमोरचे आव्हान आहेत. या सगळ्यातून समाजाला रा. स्व. संघच बाहेर काढू शकतो.” ते म्हणतात, “हिंदू समाज जागृत करण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचे काम आयुष्यभर करेन. तसेच समाजात यशस्वी उद्योजक निर्माण व्हावे, यासाठी काम उभे करायचे आहे.” अमित यांच्यासारखे देश-धर्मभक्त उद्योजक हे समाजाचे वैभव आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे अनेक शुभेच्छा!