आयपीएलचे पुढील सर्व सामने रद्द! बीसीसीआयची अधिकृत घोषणा
- भारत-पाकिस्तान तणावासंदर्भात महत्वाचा निर्णय
09-May-2025
Total Views |
मुंबई : ( All IPL matches cancelled ) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ असलेल्या बीसीसीआयने आयपीएलचे पुढील सर्व सामने रद्द करण्याची घोषणा केली आहे.
भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेला तणाव, सुरक्षा आणि खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानच्या रावळपींडी क्रिकेट स्टेडिअमवर भारताच्या ड्रोनने केलेल्या हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा बदला म्हणून भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले होते. पाकिस्तान सुपर लीग सुरू होण्याच्या काही तासांपूर्वी हा हल्ला झाला. याच पार्श्वभूमीवर भारतातील महत्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
दरम्यान, गुरुवार, दि. ८ मे रोजी सुरू असलेल्या धर्मशाला स्टेडिअमवर सुरू असलेला सामना सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला. आयपीएलच्या इतिहासात अशी वेळ पहिल्यांदाच आली आहे. तसेच संपूर्ण आयपीएल सामने रद्द होण्याची सुद्धा पहिलीच वेळ आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रेक्षकांना बाहेर काढले. बीसीसीआयने दिलेल्या निवेदनात, तांत्रिक कारणास्तव हा सामना रद्द केला जात असल्याचे सांगण्यात आले. यावेळी प्रेक्षकांमध्ये प्रचंड गदारोळ पहायला मिळाला होता.
चीअर लीडर्सचा व्हिडिओ व्हायरल!
या ठिकाणी सुरू असलेल्या घटनेचा एक व्हिडिओ चीअर लीडर्सनी शूट केला आहे. ज्यात आजूबाजूला प्रचंड तणाव दिसून येत आहे. पठाणकोटमध्ये हल्ला झाल्यानंतर अनेकांना घरून कॉल आले होते. विमानतळे बंद झाल्याचेही कळले होते. तेव्हा अनेकांना काहीतरी गडबड असल्याची चुणूक लागली होती. आयपीएल २०२५चा ५८वा हा सामना होता. “आम्ही प्रचंड तणावात आहोत. आम्हाला आयपीएल प्रशासन मदत करेल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.